अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं! उदात्त आणि उत्कट महत्वाकांक्षी गरुडझेपेपुढे आकाशही ठेंगणं ठरलेलं इतिहासानं पाहिलं। साडेतीनशे वर्षांपूवीर् या मराठी मातीवर नांगराला गाढवं जुंपून तो इथं फिरवला। आदिलशाही फौजा घोडे उधळीत चारही वेशींवरून पुण्यात घुसल्या. घरंदारं पेटली. किंकाळ्या उठल्या , सैरावैरा धावणाऱ्यांची प्रेतं पडली. शाही फौजांनी पुण्याचा कसबा बेचिराख केला. फुटक्या कवड्या आणि तुटक्या वहाणांची तोरणं लटकवून अन् एक भली मोठी लोखंडी पहार भर रस्त्यात ठोकून शाही फौजा विजापुरास परतल्या. उरलं कुत्र्यांचं रडणं अन् घारी , गिधाडांचं आभाळात भिरभिरणं. पुण्याचं स्मशान झालं. अशी सहा वर्षं लोटली. शहाजीराजे भोसल्यांच्या पुणे जहागिरीचा उकिरडा झाला आणि सहा वर्षांनंतर पुण्यात शहाजीराजांची राणी आणि मुलगा मावळी घोडेस्वारांच्या तुकडीनिशी प्रवेशले. (इ. स. १६ 3 ७ , बहुदा उन्हाळ्यात) पुणं भकासच होतं. दहा-पाच घरं जीव धरून जगत होती पुण्याची ही मसणावट झालेली पाहून आऊसाहेबांचं काळीज करपलं। पुण्याच्या मालकिणीला राहण्यापुरतीही स्वत:ची ओसरी उरली नव्हती. झांबरे पाटलांच्या वाड्यांच्या वळचणीला या राजगृहिणीला बिऱ्हाड थाटावं लागलं. पण त्या क्षणालाच जिजाऊसाहेबांच्या व्याकुळ काळजातून अबोल संकल्प उमलू लागले. या पुण्याचं आणि परगण्याचं रूपांतर आम्ही करू! चार दिस , चार रात्री उलटल्या आणि आऊसाहेबांनी सण साजरा करावा तशी पहिली ओंजळ वाहिली , ती पुण्यातल्या मोडून-तोडून गेलेल्या कसबा गणपतीच्या देवळात। पहिला जीणोर्द्धार सुरू झाला , तो या गणेशाच्या मंदिरापासून. पुण्यातली भाजून पोळून निघालेली आठ घरं अन् बारा दारं किलकिली झाली. त्यांची आशा पालवली. घरातली माणसं रस्त्यावर आली. कसबा गणपती दुर्वाफुलांनी प्रथमच इतका सजला- पुजलेला पाहून आयाबायांना नक्कीच असं वाटलं की , ही मायलेकरं म्हणजे गौरीगणपतीच पुण्यात आले. जिजाऊसाहेबांनी आज्ञा करावी अन् सर्वांनी हौसेनं ती झेलावी , असा भोंडला पुण्यात सुरू झाला। पुणं पुन्हा सजू लागलं. आऊसाहेबांच्या खास नजरेखाली एकेक नवानवा सजवणुकीचा डाव मुठेच्या वाहत्या काठावर रंगू लागला. पुण्यातली लोखंडी शाही पहार केव्हाच उखडली गेली आणि एक दिवस हलगी-ताशांच्या कडकडाटात नांगराने बैल सजले. नांगर जुंपण्यात आला. नांगराला फाळ लावला होता , सोन्याचा. खरं खरं सोनं बावनकशी. आणि पुण्याच्या भुईवर सोन्याचा नांगर पाचपन्नास पावलं नांगरण्यासाठी फिरला. याच भुईवर सहा वर्षांपूवीर् विजापूरच्या वजीर खवासखानाच्या हुकुमानं गाढव जुंपलेला नांगर फिरला होता. तरुणांच्या महत्वाकांक्षा जणू ढोल-लेझिमीच्या तालावर सहा वर्षांच्या शिवबाच्या आणि आऊसाहेबांच्या सोन्याच्या नांगराभोवती फेर धरून उसळत नाचत होत्या. ती सुखावलेली मराठी जमीन जणू म्हणत होती , ‘ पोरांनो मनांत आणा , तुम्ही वाट्टेल ते करू शकाल. या मातीत मन मिसळलंत की , मोती पिकतील ‘. अन् खरंच पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं। माणसं आपण होऊन कामाला लागली. बारा बलुतेदार अन् गावकामगार स्वत:चा संसार सजवावा तसं घाम गाळीत काम करू लागले. न्यायनिवाडे करायला स्वत: आऊसाहेब जातीनं सदरेवर बसू लागल्या. न्याय अगदी समतोल. तराजूच्या काट्यावर माशीही बसत नव्हती. आऊसाहेबांनी या काळात दिलेल्या न्यायनिवाड्याचे दस्तऐवज गवसलेत! पुण्याच्या पर्वती गावालगतचा आंबिल ओढा फारच बंडखोर। पावसाळ्यात असा तुफान भरून वाहायचा की , अवतीभवतीची शेती अन् झोपड्या , खोपटं पार धुवून घेऊन जायचा। हे दुखणं पुण्याला कायमचंच होतं. आऊसाहेबांनी पर्वतीच्याजवळ (सध्याच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याच्या पश्चिमेस) या ओढ्याला बांध घातला. चिरेबंदी , चांगला सहा हात रुंद , सत्तर हात लांब अन् पंचवीस हात उंच. आंबोली ओढ्याचा प्रवाह कात्रजच्या घाटातून थेट उत्तरेला पुणे शहराला खेटून नदीला मिळत असे. हा प्रवाह या बांधामुळे वळवून घेऊन पश्चिमेकडे ( सध्याच्या दांडेकर पुलाखालून) मुठा नदीत सोडण्यात आला. पुण्याच्या अवतीभवती सगळे मावळी डोंगर। जंगल अफाट। गेल्या सहा वर्षांत वाघांचा , बिबट्यांचा अन् लांडग्या- कोल्हांचा धुमाकूळ बादशाही सरदारांच्यापेक्षाही थैमान घालीत होता. ही रानटी जनावरं मारून काढून शेतकऱ्यांना निर्धास्त करायची फार गरज होती. आऊसाहेबांच्या लालमहालानं लोकांकरवी ही कामगिरी करवून घेतली. रानटी जनावरांचा धुमाकूळ थांबला. पण प्रतिष्ठित गावगंडांचा धुमाकूळ थांबविणं जरा अवघडच होतं. आऊसाहेबांच्याच हुकुमानं कृष्णाजी नाईक , फुलजी नाईक , बाबाजी नाईक पाटील , इत्यादी दांडग्यांना जबर शिक्षा करून जरबेत आणलं , कुणाकुणाचे हातपायच तोडले. काय करावं ? प्रत्येकाला कुठे अन् किती शहाणं करीत बसावं ? तोही मूर्खपणाचं ठरतो. लालमहालातील मायलेकारांची स्वप्न आणि आकांक्षा गगनाला गवसण्या घालीत होत्या.!
संजीवनी लाभू लागली… आदिलशहाने पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांच्या नावाने दिली होती.शहाजीराजांना दक्षिण कर्नाटकातही आदिलशहाने जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी दक्षिणेकडे केली.त्याचवेळी शहाजीराजांनी पुणे जहागिरीचा सर्व कारभार ‘शिवाजीराजे यांसी अर्जानी मोकास' दिला.शिवाजीराजे पुणे जहागिरीचे पोटमोकासदार झाले.म्हणजेच प्रत्यक्ष कारभार जरी शिवाजीराजांच्या नावाने झाला,तरी वडीलकीच्या नात्यानं तो कारभार जिजाऊसाहेब पाहू लागल्या.त्यांची मायाममता मोठी. जरबही मोठी.स्वप्नही मोठे.जी माणसं कारभार पाहण्याकरता म्हणून पुणे जहागिरीकडे शहाजीराजांनी नेमून दिली तीही फार मोठ्या योग्यतेची दिली. शिस्तीनं,काटेकोरपणे हुकुमांत वागणारी.कारभार चोख करणारी.निष्ठावंत आणि प्रामाणिक.अशी माणसं असली की,उत्कर्षच होत असतो.मग ते छोटे संसार असोत की मोठी साम्राज्ये असोत.उत्तम अनुशासन ही हुकमी शक्तीच असते. पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहणारे सगळेच कारभारी अनुभवी,भारदस्त,वयानेही बहुतेक साठी-सत्तरी ओलांडलेले. बाजी पासलकर,दादोजी कोंडदेव,गोमाजी नाईक , पानसंबळ नूरखानबेग,बंकीराव गायकवाड,येसबा दाभाडे,नारोपंत मुजुमदार आणि असेच तजरुबेकार आणखी काही. ‘ज्यास जे काम सांगितले, ते त्याने चोख करावे' ऐश्या ताकदीचे आणि युक्तीबुद्धीच्या ऐपतीचे हे सारे होते. जिजाऊसाहेबांची तडफ वेगळीच होती.कर्तबगारीचे आणि समतोल न्यायबुद्धीचे संस्कार त्यांच्यावर नेमके कुणी केले ? इतिहासाला त्यांची नावे माहीत नाहीत.पण कथा कीर्तनातील पौराणिक स्त्रियांची चरित्रं सर्वांप्रमाणे त्यांच्याही मनावर नक्कीच संस्कार करीत होती.प्रत्यक्ष नजिकच्या काळात शाही घराण्यात कर्तृत्व गाजविलेल्या स्त्रियांची एकेक हकीकत जुन्या लोकांकडून त्यांच्याही कानांवर जात असणारच.आदिलशाहीतील बेगम बबुवाजीखानम,अहमदनगरची शाहजादी चाँदबिब्बी अन् त्यापेक्षाही प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळमुलुखातील कितीतरी मराठ्यांच्या लेकीसुना त्यांना दिसत होत्या ना ! कारीच्या कान्होजी जेध्यांची आई अनसाऊ जेधे ही त्यातलीच. आसवलीच्या ढमाळपाटलांची आई रुपाऊ अन् अशा अनेक कितीजणी यमदूतांच्या नजरेला नजर भिडवून जगत आलेल्या बायका आऊसाहेबांना दिसत होत्या.आपणहून माणसांनी शिकायचं असतं ते हेच!असंच. मराठी रक्तात जन्मता:च असणार शौर्य आणि धैर्य आऊसाहेबांच्या रक्तात होत.एका बखरकारांनी लिहून ठेवलंय की,‘जिजाऊ सारखे कन्यारत्न ईश्वरानेच निर्माण केले' कितीही कठीण संकटं पुढं आली,तरी तिळमात्रही न डगमगता धैर्यानं तोंड देणारी होती ही मराठ्याची मुलगी. आऊसाहेबांना आपला शिवबा उदात्त,उत्कट आणि उत्तुंग यशाचा मानकरी करायचा होता.याचं द्योतक म्हणजे शिवाजीराजांची तयार झालेली राजमुद्रा प्रतिश्चंदालेखे वधिर्र्ष्णुविश्ववंदिता साहसूनो शिवस्येषा मुद्रा भद्राय राजते केवढा उत्तुंग आणि उदात्त ध्येयवाद सांगितलाय या राजमुद्रेत!सदैव प्रतिपदेच्या चंदासारखी विकसित होत जाणारी ही शिवमुद्रा विश्वाला वंद्य आणि लोककल्याणकारी ठरो. संजीवनी नावाचा एक विलक्षण मंत्र विश्वाच्या कल्याणासाठी कचाने मिळविला म्हणे! तोच हा मंत्र असेल का?शिवाजीराजांच्या आज्ञापत्रांवर हाच मंत्र राजमुद्रा म्हणून झळकू लागला आणि शिवाजीराजांचा वावर सुरू झाला.मावळातल्या शेतकरी सवंगड्यात कुणी मराठा,कुणी माळी,कुणी साळी,कुणी तेली , कुणी रामोशी,कुणी महार, कुणी धनगर, कुणी ब्राह्माण तर कुणी मुसलमानही.अन् आदिलशहाच्या कानाशी कुजबुजत तक्रारी जाऊ लागल्या की, हा शहाजीराजाचा पोरगा हलक्या लोकांच्यात वावरतो. मुहम्मद आदिलशहाने ही कुजबुज हसण्यावारी नेली. त्याचा विश्वासच बसेना की,शहाजीराजाचा एवढासा पोरगा मावळी डोंगरात बंड पुकारील!या आदिलशाही विरुद्ध ? कसं शक्य आहे ? पण ते सत्य होतं. खरोखरच बंडाची राजकारणं शिवबाच्या डोक्यात घुमत होती. पण खरंच शक्य होतं का ? अशक्यच होतं.शिवाजीराजांच्या समोर केवळ आदिलशाही होती का ? नाही.दीडदोन लाखाची फौज सहज उभी करू शकणाऱ्या आदिलशहाशिवाय पलीकडे गोवळकोंड्याचा कुतुबशहाही होता.भीमा नदीच्या उत्तरेला भीमेपासून थेट हिमालयापर्यंत प्रचंड साम्राज्य आपल्या तळहातावर नाचवणारा मुघल बादशहा शाहजहान दिल्लीत होता. कोकणच्या किनाऱ्यावर खाली पोर्तुगीज होते. वर जंजिऱ्याचा सिद्दी होता.अन् शिवाय इथल्या कुठल्याही चांगल्या कामाल कडाडून विरोध करीत या सर्व शत्रूंना मदत करणारे आमचे लोकही होतेच. एवढ्या मोठ्या बळाला तोंड देण्याइतका शिवाजीराजांपाशी काय होतं? सैन्य?तोफखाना ? आरमार?खजिना?काहीच नव्हतं. पण या सर्वांहुनही एक बलाढ्य गोष्ट त्यांच्या काळजांत होती. कोणती?आत्मविश्वास! कठोर ध्येयनिष्ठा!अन् नितांत श्रद्धा! अंधश्रद्धा नव्हे.भाबडी अश्रद्धाही नव्हे.बुध्दीनिष्ठ श्रद्धा.अभ्यासपूर्ण श्रद्धा.अन् याच भावनांनी भारावलेली मावळी भावंडे. अशाच असंख्य भावंडांना ते हाका मारीत होते.न बोलत्या शद्बांत.कारण त्यांचे शद्ब इतिहासाच्या कागदपत्रांवर फारसे उमटलेच नाहीत.पण ते नक्की एकेकाला बोलावत होते.त्यांचा एकेक शब्द मंतरलेला होता. महाराजांचं मनुष्यबळ बोटं मोजावीत इतक्याच मोजमापात वाढत होतं.शत्रू परातभर होता. मावळे चिमूटभर होते.पण वडिलांनी वापरलेला अन् सह्यादीने शिकवलेला एक महामंत्र महाराजांच्या मस्तकात सदैव जागा होता.कोणता ? गनिमी कावा! शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीतकमी फौजेनिशी आणि कमीत कमी युद्धसाहित्यानिशी, कमीतकमी वेळांत पूर्ण पराभव करण्याची शक्ती होती या गनिमी काव्यात। वराज्य हवे की बाप हवा? जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुरास गेले। शहाजीराजांचा मुक्काम तिथं होता। तेथूनच ते आपल्या कानडी मुलुखातील जहागिरीचा कारभार पाहात होते। पुण्याहून ही मायलेकरे बंगळुरास आली। शहाजीराजांचे सर्वच कुटुंबीय एकत्र येण्याचा आणि सुमारे दोन वषेर् एकत्र राहण्याचा हा योग होता. हाच शेवटचा योग. या दोन वर्षातच हंपी विरुपाक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटकी स्वराज्याची राजधानी विजयनगर पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. विरुपाक्ष हे तीर्थक्षेत्र होते. विजयनगर हे उद्ध्वस्त झालेले एका हिंदवी स्वराज्याचे राजधानीचे नगर होते. या प्रवासात शिवाजीराजांना खूपच पाहायला अन् शिकायला मिळाले. एवढे बलाढ्य साम्राज्य एका राक्षसतागडीच्या लढाईत धुळीला कसे काय मिळाले ? हा शेवटचा रामराजा कुठे चुकला ? त्याच्या राज्यकारभारात आणि लष्करात अशा कोणत्या जबर उणिवा झाल्या की अवघ्या एका मोठ्या पराभवाने त्याचे साम्राज्यच भुईसपाट व्हावे ? या साऱ्या गोष्टींचा शोध आणि बोध शिवाजीराजांच्या मनात घुसळून निघत होता। त्यातून मिळालेले विवेकाचे नवनीत राजांना आपल्या भावी उद्योगात उपयोगी पडणार होते. पडले. हे वैचारिक समुदमंथन राजांच्या मनात या दोन वर्षात (इ.स १६४० ते ४२ ) घडले. राजे आणि जिजाऊसाहेब पुन्हा पुण्याकडे परतले , ( इ. स. १६४२ ) ते मराठी स्वराज्य सह्यादीच्या हृदयात निर्माण करण्याच्या निश्चयानेच! आणि शिवाजीराजांनी कानद खोऱ्यातील प्रचंड सह्यशिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला. हा गड तोरणा. लगेच पुढे कोरीगड , सुभानमंगळ आणि कोंडाणा राजांनी कब्जात घेतला. आदिलशाही थक्कच झाली. एक मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो ? कुठून आलं हे बळ ? हे मोडलंच पाहिजे. या विचाराने महंमद आदिलशहाने एक अत्यंत धूर्त डाव सहज टाकला. या शिवाजी भोसल्याच्या बापालाच जर आपण अचानक छापा घालून कैद केलं तर हे बंड जागच्या जागी संपले. शिवाजी रुमालाने हात बांधून आपल्यापुढे शरण येईल. अन् मग पुन्हा कुणीही बंडाचा विचारही करणार नाही. याकरिता शिवाजीवर फौजही पाठवायची. जरूर तेवढा रक्तपात आणि बेचिराखी करायचीच. बस् ठरलंच. पण याचवेळी शहाजीला कैद करायचं गरज पडली तर ठारही मारायचं। ठरलं आणि दिनांक २५ जुलै १६४८ या दिवशी शहाजीराजांवर वजीर मुस्तफाखानाचा विश्वासघातकी छापा पडला. आपल्यावर काही तरी घातकी संकट येणार आहे , आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असूनसुद्धा शहाजीराजे गाफील राहिले. झोपले. आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले. हातापायात बेड्या ठोकल्या. राजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरास झाली. ही घटना तामिळनाडमध्ये मदुरेजवळ घडली. शहाजीराजांना अपमानास्पदरीतीने विजापुरात आणण्याची कामगिरी अफझलखानाने केली. राजांना ‘ सत्मंजिल ‘ या हवेलीत आदिलशहाने कैदेत ठेवले. या बातम्या पसरायच्या आतच आदिलशहाने पुण्याकडे मोठी फौज दिमतीला देऊन फत्तेखान या सरदारास रवानाही केले। शिवाजीराजा आणि त्याचं लहानसं नवं राज्य कब्जात घेण्याकरता. राजगडावर शिवाजीराजांना ही भयंकर बातमी समजली की , तीर्थरूप साहेब शाही कैदेत पडले आणि आपल्यावर फत्तेखान चाल करुन येतोय। बादशहाचा आता उघड उघड सवाल होता की , बोल पोरा , स्वराज्य हवे की बाप हवा ? शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो। तरी मुकाट्याने शरण ये। जे बळकावलं आहे ते तुझं नखाएवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग. तर बाप सुटेल. नाहीतर अवघं भोसल्यांचं खानदान मुरगाळून टाकू. हा सवाल भयंकर होता वडलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण ? काय वाचवायचं ? आईच सौभाग्य की स्वराज्य ? दोन्हीही तीर्थरुपच! मग दोन्हीही वाचवायचे। हा शिवाजी महाराजांच्या मनातला विचारही तेवढाच क्रांतीकारक होता. असा विचार करणारा विचारवंत योद्धा इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरांच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी प्रथमच मराठी मातीत उगवत होता. येणाऱ्या शाही फौजेशी झंुज द्यायची असा ठाम निश्चय राजांनी केला. राजांच लष्करी बळ चिमूटभर होतं. आक्रमण परातभरून येत होतं. नक्कीच श्ाी तुकारामांचे विचार युवा शिवाजी राजांच्या मनात दुमदुमत होते. ‘ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग! अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ! ‘ राजे अतिशय विचारपूर्वक आणि योजनाबद्ध आराखडा आपल्या आखाड्यात रेखित होते. शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी पूर्ण पराभव करायचा हाच डाव , हाच संकल्प आणि हाच क्रांतीसाठी सिद्धांत.🚩 झडप बहिरी ससाण्याची… विजापूरचा आदिलशाही सरदार फत्तेखान हा मोठ्या फौजेनिशी कऱ्हेपठारात (पुरंदर तालुका) शिरला। त्याचा तळ जेजुरीजवळच्या बेलसर गावाजवळ पडला। त्याला खात्रीच होती की , शिवाजीराजांचं बंड आपण लौकरात लौकर साफ मोडून काढू। त्यांनी आपल्या सैन्याचा एक विभाग शिरवळवर पाठविला. नीरा नदीच्या काठी शिरवळला एक भुईकोट किल्ला नव्या स्वराज्यात राजांनी कब्जा केलेला होता. त्याचं नाव ‘सुभानमंगळ ‘. शाही फौज मोठी होती. तिने सुभानमंगळ एका घावातच जिंकला.मराठ्याचा हा स्वराज्यातील पहिला पराभव. शहाजीराजे विजापुरात कैदेत पडलेले.कोणत्याही क्षणी बादशहा शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती.पुर्वी असे सगळ्याच बादशहांनी अनेक लोक मारून टाकल्याच्या आठवणी ताज्या होत्या. कोणाचाही पाठिंबा नाही.अशा परिस्थितीत शिवाजीराजांची आणि जिजाऊसाहेबांची मन:स्थिती कशी झाली असेल ? लक्षात येते ती एकच गोष्ट की, इतक्या भयंकर आणि भीषण मृत्युचे तांडव दिसत असूनही ही मायलेकरं थोडीसुद्धा कचरली नाहीत। त्यांचा आत्मविश्वास जबर होता.राजे राजगडावर आपला डाव आखीत होते.त्यांनी फार-फार तर हजारभर मावळी सैन्यानिशी पुरंदरचा किल्ला गाठला.तो दिवस होता ८ ऑगस्ट १६४८ पावसाचे दिवस.नीरेला पाणी.पुरंदरपासून अवघ्या बारा कि.मी.वर इशान्येला बेलसर गावाजवळ फत्तेखानाची छावणी होती.याच पुरंदरच्या दक्षिणेला दहा कि.मी. वर सुभानमंगळ होता.हा किल्ला अगदी नुकताच, कालपरवा एवढ्यात फत्तेखानी सैन्याने जिंकून घेतला होता. त्यावर आदिलशाही निशाण लागले होते. शिवाजीराजांनी रात्रीच्या काळोखात बेलसरजवळच्या शाही छावणीवर अचानक छापा घालण्याचा आणि शिरवळच्या सुभानमंगळावरही हल्ला करून तो किल्ला जिंकून घेण्याचा डाव आखला। प्रथम हल्ला सुभानमंगळवर,कावजी मल्हार या सरदाराबरोबर थोडं सैन्य देऊन त्याला पुरंदारावरून थेट शिरवळवर राजांनी सोडलं.या पावसाळ्यात कावजी वाटेत आडवी येणारी नीरा नदी ओलांडून सुभानमंगळवर हल्ला चढविणार होता.नदीला पूल नव्हता,नावा नव्हत्या.पोहूनच दक्षिणतीरावर जायचे होते.गेले सुसरीसारखे मराठे गेले.किल्ला बेसावध होता,नव्हे निर्धास्त होता. कावजीने या किल्यावर मावळ्यांनिशी हल्ला चढविला. ते तटावर चढले,घुसले. प्रतिकार होत होता,पण मराठ्यांचा जोश आणि उग्र निर्धार किल्ल्यावरच तुटून पडला होता.युद्ध पेटले. हलकल्लोळ उसळला.मराठ्यांचा मारा भयानक होता.युद्धात शाही किल्लेदारच कावजी मल्हारने कापून काढला.आदिलशाही फौजेची अक्षरश: दाणादाण उडाली.मध्यरात्रीच्या अंधारात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळविला.पुन्हा भगवा झेंडा सुभानमंगळवर फडकला.आधी झालेल्या पराभवानं खचून न जाता मावळ्यांनी शत्रूवर आग पाखडली.अचानक केलेल्या हल्ल्याचा हा परिणाम किल्ला मिळाला. कावजी मल्हार किल्याचा बंदोबस्त करून पुन्हा पुरंदरावर आला। सारं मराठी सैन्य या विजयानं अधिकच पेटून उठलं. शिवाजीराजांनी पुढच्याच मध्यरात्री बेलसरवर असाच थोड्याशा मावळ्यानिशी लपतछपत जाऊन एकदम हल्ला चढविला.यावेळी भगवा झेंडा एका मावळी तुकडीबरोबर होता. योजनेप्रमाणे राजांनी या मावळी तुकडीला हुकुम दिला होता की , तुम्ही ऐन लढाईत घुसू नका. आम्ही गनिमांवर हल्ला करतो. अजूनही फत्तेखानाचं सैन्य जे आहे ते आपल्यापेक्षा जास्तच आहे.जमेल तसा आम्ही त्यांचा फडशा पाडतो.पण छावणीत झोपलेले शाही हशम जर आमच्यावर मोठ्या बळांनं चालून आले तर आम्ही माघार घेऊ. तुमच्या झेंड्याच्या तुकडीच्या रोखाने येऊ.आपण सारेच पुन्हा पुरंदरवर पोहोचू. हे छापेबाजीचं म्हणजेच गनिमी काव्याचं तंत्र कायम विजय मिळेपर्यंत चालूच राहणार होतं। राजांनी बेलसरच्या छावणीवर या योजनेप्रमाणे एकदम छापा घातला.कापाकापी एकच कार्यक्रम,अत्यंत वेगानं मावळ्यांनी सुरू केला.शाही छावणीत गोंधळ उडाला. फत्तेखान जातीनं उठून मराठ्यांवर तुटून पडला. मराठे ठरल्याप्रमाणे माघार घेऊ लागले. हा पराभव नव्हेच ही युद्धपद्धती होती.गनिमी काव्याचं युद्ध एकाच लढाईत संपत नसतं. ते विजय मिळेपर्यंत महिनोन महिने सुद्धा चालूच राहतं. मराठी फौजा माघार घेत दौडीत सुटली। काही मराठेही युद्धात पडले। मराठे परत फिरले पण दुसऱ्या बाजूनं भगव्या झेंड्याची मराठी तुकडी उत्साहाच्या भरात शाही छावणीवर तुटून पडली.ही तुकडी नेमकी शाही सैनिकांच्या तडाख्यात सापडली.खुद्द झेंडेवाल्यावरच घाव पडला. त्याच्या हातातील भगवा झेंडा कोसळण्याचा क्षण आला.झेंडा पडणार ? नाही,नाही! कारण तेवढ्यात याच तुकडीतल्या बाजी कान्होजी जेधे या तरुण पोरानं एकदम पुढे सरसावून तो पडत असलेला झेंडा स्वत:च पकडला. बाकीचे मावळे लढतच होते. बाजी जेध्यानं त्यांना माघार घेण्याचा इशारा देत देत लढाई चालूच ठेवली होती. या शथीर्च्या धुमाळीत काही मावळे पडले. पण झेंडा सावरीत बाजी यशस्वीपणे माघारी फिरला. अन् आपल्या साथीदारांच्यानिशी अंधारात गुडूप झाला. ही झेंड्याची तुकडी रक्ताळली होती. पण झेंडा हातचा न जाऊ देता पुरंदर किल्यावर दाखल झाली. अपेक्षेप्रमाणे हा हल्ला राजांना चांगला जमला होता. झेंडा जात होता,तोही परत आलेला पाहून राजे हर्षावले.फत्ते झाली. राजांनी बाजी जेध्याचं शाबासकी गर्जून कवतिक केले.त्यांनी तिथेच त्याचा उल्लेख ‘सर्जाराव' असा केला.हीच बाजी जेध्यांची पदवी ठरली.आता खासा फत्तेेखान तुडवून काढण्याचा राजांचा निर्धार दसपटीनं वाढला. आत्मविश्वास वाढला.पुरंदर किल्ला मराठी युद्धघोषणांनी दणाणत होता. यह तो पत्थरों की बौछार है! बेलसरच्या फत्तेखानी छावणीवर अचानक छापा घालून शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांनिशी पसार झाले। ते पुरंदरावर आले. झेंड्याची तुकडी खरं म्हणजे साफ कापली जाणार होती. भगवा झेंडा शत्रूच्या हातात पडणार होता.पण बाजी जेध्यांच्या बहादुरीमुळे तुकडी आणि झेंडा बचावले.ते ही गडावर आले.रात्रीची वेळ,पूर्ण विजय नव्हे,पण एक यशस्वी धडक महाराजांनी आक्रमक शाही छावणीवर मारली होती. महाराजांनी लगेच आपल्या सगळ्याच सेनेला हुकुम दिला की,पुरंदर गडाच्या उत्तर तटावर जास्तीत जास्त धोंड्यांचे ढीग जागोजागी गोळा करून ठेवा। मावळे त्वरित कामाला लागले. डोंगरावर धोंड्यांना काय तोटा! उत्तर बाजूच्या तटावर धोंड्याचे लहानमोठे ढिगारे घडीभरात जमले. महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हटले, आता मार बसल्यामुळे चिडलेला तो फत्तेखान आपल्या या पुरंदरावर याच उत्तर बाजूवर सकाळी चाल करून येईल। तो वर येत असताना आमची इशारत होईपर्यंत तुम्ही कुणीही त्याच्यावर कसलाही मारा करूनका। येऊ द्यात त्याला वर। आम्ही इशारत करू अन् मग तुम्ही शत्रूवर या मोठ्यामोठ्या धोंड्यांचा मारा करा. सोप्पं काम। स्वस्थ काम. शत्रूच्या सुसज्ज सैन्यावर दारुगोळ्यांचा हल्ला करणं स्वराज्याच्या या शैशववयात महाराजांना परवडणारं नव्हत.युद्ध साहित्यही कमी.मावळी सैन्यही कमी. त्यावर महाराजांनी ही दगडधोड्यांची लढाई अचूक योजली. बिनभांडवली धंदा.पसाभर धोंड्यापासून मिठीभर धोंड्यापर्यंत वेगवेगळ्या आकारांचे,सह्याद्रीतील हे दगडी सैनिक महाराजांनी तयार ठेवले होते. महाराजांचा अंदाज अचूक ठरला। उजाडत्या उजेडात फत्तेखान आपलं सार सैन्य घेऊन पुरंदरच्या उत्तर पायथ्याशी दौडत आला.तुफान,प्रचंड पुरंदर त्याच्यासमोर उभा होता. आधीच्या मावळी तडाख्याने खान चिडला होता आणि त्याने आपल्या फौजेला घोड्यावरून पायउतार होऊन एकदम एल्गार करण्याचा हुकुम दिला. सुलतानढवा! म्हणजेच एकदम हल्ला.शाही फौज एकदम पुरंदरावर तुटून पडली.त्यांच्या युद्धगर्जना दणाणू लागल्या. पुरंदरगड आणि पुरंदरगडी एकदम शांत होते,चिडीचिप्प,ते दडलेले होते.फत्तेखानाची फौज गडावर धावून निघाली होती. गडाच्या निम्यापर्यंत चढलीही. अन् ऐन टप्प्यात शत्रू आलेला दिसताच महाराजांनी गडावरच्या मावळ्यांना इशारा केला.अन् गर्जना सुरूझाल्या.शिंगे धुत्कारूलागली.अन् मग ते लहानमोठे धोंडे गडावरून उतारावर धाड् धाड् धाड् उड्या घेत फत्तेखानच्या सैन्यावर तुटून पडले.एका का दोन! पाउसच. शाही सैन्य तो दगडांचा वर्षाव पाहून चकीतच झालं.थडाथडा मार बसू लागला.कुणी मेलं, फारजण जखमी होऊ लागले. हा मारा सोसण्याच्या पलिकडचा होता. फत्तेखानालाही खालून हा दगडांचा येणारा वर्षाव दिसत होता। तो थक्कच झाला। अन् म्हणाला,‘यह तो पत्थरों की बौछार है!'आता ? मावळ्यांना चेव आला होता। केवळ दगड धोंड्यांची पुष्पवृष्टी करून मावळ्यांनी गनिम हैराण केला होता.गनिम आरडत ओरडत तोंड फिरवून गडाच्या पायथ्याकडे त्या उतारावरून धावत सुटला होता. उड्या मारीत,पडत,घसरत,दगडांचा मार खात हे शाही सैन्य उधळलं गेलं होतं.जणू वादळातला पालापाचोळा.या फत्तेखानाची आता फळी फुटली होती. महाराज आपल्या सैन्यानिशी गडावरून बाहेर पडले आणि गनिमावर तुटून पडले.अखेर फत्तेखान सासवडच्या दिशेने पळत सुटला.येथून सासवड फक्त १० कि.मी.वर गनिम सासवड गावात आश्रयाला घुसला. मावळ्यांनी पाठलाग करून त्यांना झोडपून काढले.फत्तेखान कसाबसा ओंजळभर सैन्यानिशी धूम पळत होता.विजापूरच्या दिशेनं! त्याचं सैन्य आणि स्वप्न मराठ्यांनी एकाचवेळी पार उधळून लावलं होतं. फत्तेखानाच्या त्या मोठ्या थोरल्या सैन्याचा आपल्या लहानशा सैन्यानिशी कमीतकमी वेळात, कमीत कमी युद्धसाहित्यानिशी, पूर्ण पराभव केला होता.कोणची ही जादू? कुणाचा हा चमत्कार ? हा गनिमीकाव्याच्या शक्तीयुक्तीचा परिणाम,जादू,चमत्कार. विचारपूर्वक आपल्या लहानशा शक्तिनिशी प्रचंड शाहीशक्तीला कसं हरवायचं याचं महाराजांचे चिंतन इथं दिसून येतं. तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला! शहाजीराजे पकडले गेले होते, त्यांच्या हातापायात बेड्या होत्या. त्यांना मदुराईहून विजापूरला आणलं अफझलखानानं शहाजीराजांना मकई दरवाजाने विजापूर शहरांत आणलं.अन् भर रस्त्याने त्यांना हत्तीवरून मिरवित नेलं.त्यांच्या हातापायात बेड्या होत्याच.या अशा अपमानकारक स्थितीतच अफझलखान शहाजीराजांची या भर वरातीत कुचेष्टा करीत होता.तो मोठ्याने शहाजीराजांना उद्देशून म्हणत होता.‘'ये जिंदाने इभ्रत है!' खान हसत होता,केवढा अपमान हा! राजांना ते सहन होत नव्हतं. पण उपाय नव्हता.राजे स्वत:च बेसावध राहिले अन् असे कैदेत पडले.जिंदाने इभ्रत! म्हणजे मोठ्या मानाचा कैदी. शिवाजीराजे स्वराज्य मिळविण्याचा उद्योग करीत होते. त्यांनी बंड मोडले होते.म्हणून त्यांचे वडील हे मोठ्या मानाचे कैदी!आता शिक्षाही तशीच वाट्याला येणार.हे उघड होतं. सत् मंजिल या एका प्रचंड इमारतीत राजांना कडक बंदोबस्तात मोहम्मद आदिलशहाने डांबलं.आता भविष्य भेसूर होतं.मृत्यू! आणि उमलत्या कोवळ्या स्वराज्याचाही नाश! जिजाऊसाहेब यावेळी राजगडावर होत्या। शहाजीराजांच्या कैदेची बातमी त्यांना समजली,त्याक्षणी त्यांच्या मनात केवढा हलकल्लोळ उडाला असेल!गुन्हा नसतानाही अनेक कर्तबगार मराठ्यांची मुंडकी शाही सत्तांनी उडविलेली त्यांना माहीत होती.प्रत्यक्ष त्यांचे वडील आणि सख्खे भाऊ एका शाही सत्ताधीशाने असेच ठार मारले होते.आता शहाजीराजांना जिवंत सोडवायचं असेल,तर एकच मार्ग होता. आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं! स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं.नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू.स्वराज्याचा नाश आणि शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं.! शिवाजीराजांनी स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता.सुभानमंगळ,पुरंदर गड, बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या.सह्याद्रीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं. (दि. ८ ऑगस्ट १६४८ ) अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते. कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता,नाही का ? पण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती,अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता.राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला. कशाकरता?मुघल बादशाहशी संगनमत करून मोघली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी,असा आदिलशाहला शह टाकण्याकरता. राजांचा डाव अचूक ठरला. दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की,शहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील! वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं. हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वषीर्चं कृष्णकारस्थान होतं.अचूक ठरलं,विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल! शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा डाव अक्षरश: उधळला गेला.नव्हे, त्याच्याच अंगाशी आला.कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला.त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची.चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती. मुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना.त्याने दि. १६ मे १६४९ या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली.अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली. मनगटातलं पोलादी सार्मथ्यही प्रत्ययास आलं.वडीलही सुटले. स्वराज्यही बचावलं.दोन्हीही तीर्थरुपचं.किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं.अन् ही सारी करामत पाहून इतिहासही चपापला.इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या. तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ! विजापूरच्या बादशाही विरुद्ध झडलेल्या पहिल्याच रणधुमाळीत शिवाजीराजांनी अस्मानी यश मिळविलं,पण राजे वडिलांच्यावर रागावले,चिडले अन् संतापलेसुद्धा का?कारण शहाजीराजे बेसावध राहिले, पकडले गेले अन् भयंकर संकट स्वराज्यावर आले.जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांना मानसिक यातना असह्य झाल्या. हे सारं शहाजीराजांच्या गाफिलपणामुळं झालं. खरंच होतं ते,याची खंत शहाजीराजांना स्वत:लाही निश्चितच होती.पण पेच सोडविण्यासाठी शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या हाती असलेला स्वराज्यातला कोंढाणा किल्ला आणि कर्नाटकातील शहाजीराजांचं महत्त्वाचं ठाणं शहर बंगळूर हे बादशहाला देऊन टाकायचं कबूल केलं.आणि हे पाहून शिवाजीराजे रागावले. राजकारणात अक्षम्य ठरणारी गाफिलपणाची चूक स्वत: महाराजसाहेब शहाजीराजे यांनी केली.परिणाम मात्र या लहानग्या स्वराज्याला भोगायची वेळ आली.तळहातावरती भाग्याचा तीळ असावा तसा कोंढाणागड बादशहाला फुकट द्यावा लागतोय,याचं दु:ख राजांना होत होतं.स्वराज्यातील तळहाताएवढी भूमीही शत्रूला देताना यातना होण्याची गरज असते! कोंढाणा आदिलशाहीत परत देऊन टाकण्याची आज्ञापत्रं राजगडावर आली आणि महाराज व्यथीत झाले.ते गडावर कुठंतरी एकांतात एकटेच अस्वस्थ होऊन बसले. मिळालेल्या यशामुळे राजगड आनंदात होता एकटे शिवाजीराजे खिन्न होते.कोंढाण्यावर राजे कुठंतरी जाऊन एकटेच बसले आहेत ही गोष्ट वयोवृद्ध सोनो विश्वनाथ डबीर यांच्या लक्षात आली.सोनोपंत म्हणजे आजोबा शोभावेत अशा वयाचे वडिलधारे मुत्सद्दी.भोसले घराण्यावर त्यांची अपार माया.ते चरण चालीने शिवाजीराजांकडे गेले.महाराज गंभीर आणि उदास दिसत होते.सोनो विश्वनाथांनी वडिलकीच्या सुरात त्यांना पुसलं.महाराज,आपण चिंतावंत का?आता काळजी कशाची? तीर्थरुपसाहेब शहाजीमहाराज शाही कैदेतून मुक्त झाले.आपले राज्यही आपण वाचविले.मग चिंता कशाची ? ‘राजांनी गंभीर शब्दात म्हटलं', काय सांगावं! आमचे तीर्थरुपसाहेब बेसावध राहिले आणि शाही जाळीत अडकले. आम्ही हरहुन्नर करून त्यांस सोडविण्यास आदिलशहास भाग पाडले.सुटले,पण वडिलांनी बादशहाच्या मागणीवरून आपला स्वराज्यातील कोंढाणागड परत देऊन टाकण्याचे कबूल केले. काय म्हणावं या गोष्टीला? आमच्या कामाचे मोल वडिलांस समजलेच नाही.ते स्वत:स मोठे जाणते म्हणवितात.पण वर्तन मात्र अजाणते केले. ‘हे शब्द शिवाजीराजे व्याकुळतेने बोलत होते,पण ते ऐकताच सोनो विश्वनाथ अधिकच गंभीर होऊन जरा कठोर वडिलकीचे शब्दात म्हणाले, ‘महाराज,काय बोलता हे?वडिलांच्याबद्दल असं विपरित बोलणं आपणांसारख्या सुपुत्रांस शोभा देत नाही. ‘ शिवाजीराजे अधिकच गंभीर होऊन ऐकू लागले!‘महाराज वडील चुकले तर खासच.शंकाच नाही.पण वडिलांबद्दल असं बोलणं बरं नव्हे.कोंढाण्यासारखा मोलाचा गड विनाकारण हातचा जातोय.खरं आहे पण वडिलांच्याकरिता हे सोसावेच महाराज!वडिलांचा मान राखावा. ‘शिवाजीराजे एकदम स्वत:स सावरीत बआदब म्हणाले,‘नाही, आमचं चुकलं! वडिलांचा अपमान करावा म्हणून आम्ही बोललो नाही.स्वराज्याचे नुकसान,मनाला मानवले नाही म्हणून बोललो.कोंढाणा गेला म्हणून बोललो. ‘महाराज कोंढाण्याचे काय एवढे वडिलांपुढे? हा अतिमोलाचा गड देऊन टाकावा!महाराज,आपण तर अवघा मुलूख काबीज करा. उदास होऊच नका.‘महाराजांना हा विवेक फार मोलाचा वाटला. पटला.त्यांनी जरा तीव्र शब्दांत म्हटलं. ‘होय' जरुर.पण वडिलांचा झालेला हा अपमान ती कैद.त्या अफझलखानाचं वागणं बोलणं आम्हाला सहन होत नाही.ज्यांनी ज्यांनी आमच्या तीर्थरुपांचा असा हीन अपमान केला,त्यांचा त्यांचा सूड आम्ही आमच्या हातानं घेऊ. तो अफझलखान,बाजी घोरपडे, ते वझीर मुस्तफाखान,मनसब ई कार ई मुलकी या साऱ्यांचे वेढे आम्ही घेऊ. ‘सोनो विश्वनाथ या राजवचनांनी सुखावले!अवघं पावलं असं वाटलं असावं त्यांना.आई आणि वडिलांच्याबद्दल आमचा राजा असं पोटतिडीकेनं बआदब वागतो.साऱ्या मराठी मुलुखापुढं सूर्यफुलाचा आदर्श ठेवतो.एक चारित्र्यसंपन्न करारी पण नम्रही नेतृत्त्व मराठ्यांच्या मुलुखाला लाभलेलं पाहून कोणाच्याही डोळ्यांत अभिमानाचे आनंदाश्रू तरळावेत असंच बोलणं राजा बोलला. हा सारा संवाद पुढे कवी परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहून ठेवला.त्याचा हा आशय. कोंढाणागड आदिलशाहीत राजांनी देऊन टाकला. बादशहाच्या हुकुमावरून नव्हे. वडिलांच्या आज्ञेवरून! ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस!’ शहाजीराजे विजापूरात स्थानबद्धच होते.(दि. १६ मे १६४९ पासून पुढे) या काळात शिवाजीराजांना आदिलशाहच्या विरुद्ध काहीही गडबड करणं शक्य नव्हतं.त्यांच्या महत्त्वाकांक्षा थबकल्या होत्या.पण गप्प बसणं हा त्यांचा स्वभावधर्मच नव्हता. त्यांनी ओळखलं होतं की,आदिलशाह,जंजिऱ्याचा सिद्दी,गोव्याचे फिरंगी,अन् दिल्लीचे मोघल हे आपले वैरी. पण यांच्यापेक्षाही दोन भयंकर शत्रू आपल्या जनतेच्या मनात घुसून बसलेले आहेत.त्यांना कायमचं हुसकून काढलं पाहिजे. त्यातील एका शत्रूचं नाव होतं आळस.आणि दुसऱ्याचं नाव होतं अज्ञान. या दोन्ही शत्रूंना शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्याच्या सीमापार पिटाळलं होतं.ते स्वत: अखंड परिश्रम करीत होते.विश्रांती म्हणजेच आळस.ती त्यांना सोसवतच नव्हती.त्यांचे हेर कोकणातील दऱ्याखोऱ्यांत आणि सागरी किनाऱ्यावर हव्या आणि नको अशा गोष्टींचा शोध घेत होते.कारण पुढची मोठी झेप कोकणावर घालायची होती.याच काळात त्यांचं लक्ष पुण्याच्या आग्नेयेस अवघ्या दहा मैलांवरती असलेल्या कोंढवे गावावर गेले. कोंढाणा ते भुलेश्वर या डोंगररांगेच्या उत्तरणीवर हे कोंढवं वसलेलं होतं.तेथूनच बोपदेव घाटातून कऱ्हे पठारात जाण्याचा प्राचीन रस्ता होता.या घाटाच्या पायथ्याशीच कोंढवे गावाला प्यायला पाणी नाही अशी ल्हायल्हाय अवस्था उन्हाळ्यात कोंढण्याची होत होती. शिवाजीराजांनी या कोंढव्याच्या जवळ अचूक जागा शोधून धरण बांधायचं ठरविलं.जो काही पाऊस थोडाफार पडतो.त्याचं पाणी बंधारा घालून अडवायचं. कमीतकमी खर्चात अन् उत्तम अभ्यासपूर्वक केलं,तर हे होतं. राजांनी तसंच करायचं ठरविलं. स्वत: जाऊन धरणाच्या जागेची पाहणी केली.जागा निवडली. उत्तमच पण जिथं बंधारा घालायचा तिथंच एक प्रचंड धोंड उभी होती.ही धोंड फोडणं आवश्यकच होतं.हे अतिकष्टाचं काम राजांनी कोंढाण्यातल्याच येसबा कामठे नावाच्या एका तरुण मराठ्याला सांगितलं आणि त्यानं ही धोंड फोडून काढली. धरणाचं काम सुकर झाले.खर्चही बचावला.राजे स्वत: धरणाच्या जागी आले आणि निहायत खूश झाले.येसबानं जीव तोडून धोंड फोडली होती.राजांनी येसबाला कौतुकाची शाबासकी दिली. कौतुकानं ते येसबाला रोख रक्कम बक्षिस म्हणून देऊ लागले. राजा सुखावला होता.माझ्या स्वराज्यातली तरुण पोरं जीवापाड कष्ट करीत आहेत याचा त्याला आल्हाद वाटत होता. पण तो येसबा! राजांची रोख बक्षिसी घेईचना.तो म्हणाला, पैसे खर्च होऊन जातील. मला कायमची धान्य पिकवायला जरा जमीन द्याल का ? ‘राजे अधिकच भारावले, येसबाला आलेली ही दृष्टी फारंच चांगली होती.घरसंसार चांगला फुलावा यासाठी चार दिवसांची चंगळबाजी न करता कायम कष्टाचं साधन येसबा पसंत करीत होता.राजांनी ताबडतोब होकार दिला.त्यांनी येसबाला चारवीत जमीन दिली.येसबाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मनात एक नवाच अभिमान फुलला की, माझ्या स्वराज्यात,माझ्या राजानं , माझ्या कुटूंबाच्या कायम हितासाठी मला वावर दिलं.आता कष्ट करू.भरल्या कणगीला टेकून पोटभर हक्काची भाकर खाऊ. राजा अशा नजरेचा होता. दिवाळीत उटणं लावून आंघोळ घालावी अन् मळ धुवून काढावा तसा राजानं कोणाला काही, कोणाला काही काम सांगून त्यांचा आळस आणि अज्ञान धुवून काढायचा दिवाळसणच मांडला.राजानं माणसं कामाला लावली.ज्यांना ज्याची गरज असेल,त्यांना राजानं ‘ऐन जिनसी' मदत चालू केली.रोख रक्कम उधळली जाते.ज्या कामासाठी रक्कम घ्यायची ते काम करण्याऐवजी माणसं नको तिथं उधळपट्टी करतात.कामं बोंबलतात.अविवेकी माणसं उगीच लगीन करतात.उगीच देवळं बांधत सुटतात.देवाला काय हे असलं आवडतंय व्हय ? राजांनी रोकड कर्ज आणि वतनं इनामं देणं कधी सुरूच केलं नाही. जिजाऊसाहेबांनी पुण्यात प्रथम आल्यावेळी गरजवंतांना आपले संसार आणि उद्योगधंदे सजविण्यासाठी ‘ऐन जिनसी' मदत केली.तोच हा पायंडा राजे चालवित होते. रहाटवड्याच्या रामाजी चोरघ्याला शेतात विहीर बांधायला नाही का अशीच मदत केली.यातनं रयतेत कुणाकुणाच्या पूर्वीच्या जखमा राजे भरूनही काढीत होते. तुम्हास्नी ठाऊ नसल.मी सांगतो, कोंढण्याच्या या येसबा कामठ्याच्या संसाराला फार मोठी जखम झाली होती ती कशी ? पूर्वी कोंढाण्याच्या किल्लेदारानं बादशाहीत या येसबाच्या थोरल्या भावावर खोटे नाटे आळ घेऊन त्याला ठार मारलं होतं. कामठ्यांच्या घरातली लक्ष्मी विधवा झाली होती.काही गुन्हा नसताना असं आभाळ कोसळलं. कसं सावरायचं?कुणी सावरायचं ? शिवाजीराजांनी सावरायचं. येसबा कामठ्याचं कोसळलेलं घरकुल शिवबानं सावरलं.हे असं सावरलं किसनदेवानं गोवर्धन पर्वत सावरला तसं सावरलं. आपल्या बोटावर सावरलं.पण अवघ्या गवळ्यांच्या काठीचा आधार त्या पर्वताला मिळालाच की! चंद्रग्रहण शहाजीराजे प्रत्यक्ष तुरुंगातून सुटले,तरीही ग्रहणकाळ संपला नाही.मोहम्मद आदिलशाहने शहाजीराजांना कैदेतून मुक्त केलं. पण त्यांना हुकूम केला की, आमची परवानगी मिळेपर्यंत तुम्ही विजापूर शहरातच राहायचं. बाहेर कुठेही अजिबात जायचं नाही. अतिशय धूर्तपणानं आणि सावधपणानं शहानं हा हुकूम दिला.म्हणजे शहाजीराजांना त्यानं विजापुरात स्थानबद्ध केलं. याचा परिणाम शिवाजीराजांच्या उद्योगांवर आपोआप झाला. शहानं या मार्गानं शिवाजीराजांना धाकच दाखविला की बघ,तुझा बाप मुक्त असला तरीही विजापूरात तो आमच्याच पंजाखाली आहे.जर तू सह्याद्रीच्या पहाडात गडबड करशील,तर अजूनही तुझ्या बापाचे प्राण जातील याद राख. धूर्त शहाने शिवाजीराजांच्या हालचाली साखळबंद करून टाकल्या.पण गप्प बसणं हा शिवधर्मच नव्हता.ते एक तुफान होतं. त्यांच्या महत्त्वाकांक्षेला विजेचे पंख होते.राजांचं भीमा नदीच्या उत्तरेकडे थेट दिल्लीपर्यंत लक्ष होतं.आज ना उद्या पण लवकरात लवकर आपल्याला भीमा ओलांडून मोगलाई सत्तेवर नक्कीच चढाई करायची आहे,हे लक्षात घेऊन महाराज वागत होते.भीमेच्या उत्तरेला थेट काश्मीरपर्यंत शहाजहानचं मोगली साम्राज्य होतं.तसंच केव्हातरी सह्याद्री ओलांडून मावळतीला असलेल्या कोकणपट्टीवर आपल्याला उतरायचं आहे आणि कोकणचा समुद्र आपल्या ओंजळीत घ्यायचाय हीही महत्त्वाकांक्षा त्यांची होतीच.कोकणात सत्ता विजापूरकरांची होती.पण त्यातही सिद्दीनं आपली जबरदस्त सत्ता जंजिऱ्याच्या सागरी किल्ल्यावर थाटली होती.एखाद्या बेटांवर आणि गोमांतकात पोर्तुगीज फिरंगी जुलूम गाजवत होते. एकूण अवघं कोकण काबीज करणं म्हणजे सुसरी-मगरींशी झुंज देण्याइतकं अवघड काम होतं.अशक्यप्राय! महाराजांची सावध महत्त्वाकांक्षा सह्यादीवरून पश्चिम पायथ्याशी पसरलेल्या कोकणावरती डोकावून डोकावून फिरत होती. झडप घालयाची होती.पण शहाजीराजे जोपर्यंत विजापूर शहरात शाही पंजाखाली स्थानबद्ध आहेत,तोपर्यंत काहीही करता येत नाही.याची जाणीव त्यांना होती.गप्प बसवत नव्हतं. पण काहीच करता येत नव्हतं. पण आपल्याच लहानग्या स्वराज्याचं बळ ते वाढवित होते. पायदळ,घोडदळ, हेरखातं, परराष्ट्रवकील खातं,जमीन महसूल, रयतेच्या अडीअडचणी इत्यादीत ते अविश्रांत गुंतले होते. हेरगिरी करणारं नजरबाज खातं, बहिरी ससाण्यासारखं स्वराज्याभोवती शत्रूच्या मुलखांत भिरभिरत होतं.नानाजी विश्वासराव दिघे ,बहिर्जी नाईक जाधव आणि असेच चतुर हेर त्यात होते.पुढे सुंदरजी प्रभुजी आणि वल्लभदास या नावाचे दोन चतुर गुजराथी हेरागिरीसाठी महाराजांना गवसले.निवडून निवडून आणि पारखून पारखून महाराज माणसं मिळवत होते. घडवत होते.यात जातीधर्माचं बंधन नव्हतं.सामान्य माणसांतून असामान्य माणसं घडविण्याचा हा शिवप्रकल्प होता अत्रे, बोकील,पिंगळे,आर्वीकर राजोपाध्ये,हणमंते,पत्की अन् अशाच कुळकर्णी करीत खर्डेघाशी करणाऱ्या किंवा हातात दर्भाची जुडी अन् पळीपंचपात्री घेऊन गावोगांव श्राद्धपक्षाची पिंडं पाडणाऱ्या वा लग्नमुंजीच मंगलाष्टक तारस्वरात ओरडत हिंडणाऱ्या…. पण तल्लख बुद्धी,काळजात हिम्मत आणि मनगटात तलवारीची हौस असलेल्या निवडक भटाभिक्षुकांचे गुण अचूक हेरून त्यांनाही राजकारणाच्या आणि रणांगणांच्या आखाड्यात उतरविणारे महाराज अठरापगड अवघ्या मऱ्हाठी जातीजमातीलाही आपल्या हृदयाशी धरीत होते; स्वराज्याच्या कामाला गुंफीत होते.हे राज्य एक आहे,आम्ही सारे एक आहोत अन् श्रींच्या इच्छेप्रमाणे हे राज्य आम्ही वैभवशाली करणार प्रतिपद्चंदलेखेव आहोत ही गगनालाही ठेंगणी बनविणारी महत्त्वाकांक्षा धरीत होती. महाराजांचा पहिला पायदळ सेनापती होता नूरखान बेग सरनोबत,बहिर्जी नाईक जाधव हा रामोशी होता.महार,प्रभू ,धनगर,सोनार, शिकलगार,कहार,चांभार,भांग, किती जाती जमातींची नावं घेऊ ? शहाण्णव कुळीच्या मराठ्यांपासून ते चंदपूर गोंडवनातील उघड्यावाघड्या गोंडांपर्यंत अवघ्यांचा भोंडला सह्यादीच्या भोवती महाराज मांडीत होते. त्यांना ‘अवघ्या मऱ्हाठी यांचे गोमटे करावयाचे ‘ होते.त्यासाठी हा स्वराज्याचा मनसुबा त्यांनी मांडला होता. शहाजीराजांच्या स्थानबद्धतेमुळे ते सह्यादीच्या शिखरांपाशीच थबकले होते.खोळांबले होते. कोकणात डोकावून डोकावून बघत होते.त्यांना कोकणचं वैभव दिसत होतं.अन् गरीब रयतेचे हालही दिसत होते.कोकणात आंबा पिकत होता.रस गळत होता,कोकणचा दर्या राजा झिम्मा खेळत होता.शेतकरी राजा अर्धपोटी राहत होता,तरीही जगत होता. हबश्यांच्या अन् फिरंग्यांच्या अत्याचारांचे फटके खात होता तरीही नवी आशेची स्वप्न पाहत, दु:ख उशाखाली झाकून झोपत होता.कोकणातल्या त्या आगरी , कुणबी,कोळीभंडारी,मालवणी अन् गांवकर ‘मंडळीना' पहाटेच्या स्वप्नात शिवाजीराजे दिसत असल्यास काय ? अन् याच काळात (इ.स.१६४९ -१६५२ ) महाराजांच्या चाणाक्ष हेरांनी कोकणपट्टी हेरली.सुख,दु:ख,अपमान, अत्याचार आणि आशेचे किरणही हेरले. समिंदर हेरला,किनारा हेरला. लबाड हेरले,वैरी हेरले. इमानी अन् कष्टाळूही हेरले. महाराजांची झेप पडणार होती.कोकणपट्टीवर उद्या ? परवा? ते अवलंबून होतं. शहाजीराजांच्या पुढच्या परिस्थितीवर.पण याच काळात महाराजांचं बळ त्यांच्या तळहाताएवढ्या स्वराज्यात सुपाएवढं वाढत चाललं होतं. पण नियती मोठी द्वाड.एका बाजूनी पंखात बळ वाढवित होती,तर दुसऱ्या बाजूनी तीच नियती पंखांवर भयंकर आघात करीत होती.याच काळात (इ. स. १६४९ फाल्गुन) जगद्गुरू तुकाराम महाराज अचानक हे जग सोडून गेले. क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते. मोहम्मद आदिलशाहची प्रकृती चांगली नव्हती.शाह अर्धांगवायूसारख्या विकारानं लुळापांगळा झाला होता.त्याची तबियत ढासळत होती.त्याचवेळी गोलघुमट या प्रचंड इमारतीचं बांधकाम उंचउंच चढत होतं. लवकरच ते पूर्ण होणार होतं. आपल्याला हे माहिती आहे ना ? की गोलघुमट ही इमारत म्हणजे याच मोहम्मद आदिलशाहची कबर.मोहम्मद आदिलशाह तक्तनशीन बादशाह झाला त्याचवेळी त्यानं स्वत:साठी स्वत:च हे कबरस्तान बांधावयास सुरुवात केली.निष्णात वास्तुकारागिरांनी ही इमारत बांधली.उच्चारलेल्या वा उमटलेल्या ध्वनीचे अनेक प्रतिध्वनी या घुमटात घुमत होते. पण आजारी बादशाहच्या मनात एकच ध्वनी आणि असंख्य प्रतिध्वनी उमटत होते मऱ्हाठ्यांच्या बंडाचे.बादशाह बेचैन होता. एक गोष्ट त्यानं केली त्याने चार वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर शहाजीराजांची मुक्तता केली. शहाजीराजे दक्षिण कर्नाटकात आपल्या जहागिरीवर रवानाही झाले. म्हणजेच शिवाजीराजांच्यावरचं असलेलं दडपण आणि चिंता एकदम भिरकावली गेली.स्वैर संचार करावयास हे ‘शिवाजीराजे‘ नावाचे वादळ मुक्त झाले अन् सुसाट सुटले.गेल्या चार वर्षांत राजांनी आदिलशाही विरुद्ध बोटही उचलले नव्हते.ते एकदम पाच हजार स्वारांचं लष्कर घेऊन स्वराज्यातून म्हणजेच राजगडावरून थेट कर्नाटकाच्या दिशेनं सुटले.कर्नाटकाच्या उत्तर भागात मासूर या नावाचं एक जबर लष्करी ठाणं होतं.शिवाप्पा नाईक देसाई हा शाही ठाणेदार मासूरच्या किल्ल्यात होता. शिवाजीराजांचा भयंकर वादळी हल्ला या मासूरवर अचानक धडकला.त्या शिवाप्पा नाईकाला स्वप्नातही कल्पना नसेल की ,ही मराठी चित्त्यांची झडप आपल्यावर येईल.कारण मासूरपायून शिरवळपर्यंत सर्व मुलुख आदिलशाहीचा होता.या एवढ्या मोठ्या प्रदेशात सर्वच ठाणी आदिलशाहीची.सातारा, कराड,मिरज,कागल,चिकोडी, तेरदळ इत्यादी सर्व ठाण्यांना टाळून शिवाजीराजांनी थेट मासूर गाठलं होतं.शिवाप्पाची अक्षरश: दाणादाण उडाली.त्याची फौज उधळली गेली.तो पळून गेला आणि महाराज हा तडाखा देऊन तेवढ्याच झपाट्यानं पुण्याकडे पसार झाले.मासूर त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलं नाही?लुटलं नाही ?मधल्या कोणच्याही ठाण्यावर हल्ला किंवा कब्जा केला नाही ? नाही!नाही! का ? राजांना आदिलशाहीस हे दाखवून द्यायचं होतं की,हा शिवाजीराजा भोसला विसरभोळा नाही,गाफिल नाही, बावळट नाही.वडिलांच्या स्थानबद्धतेच्या काळात माझं बळ आणि माझी तरबेजी किती आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो आहे. माझ्या वडिलांचा झालेला अपमान मी विसरलेलो नाही. मासूरवरच्या हल्ल्याने आदिलशाही दरबार थक्क झाला. आता दरबारला चिंता होती पुढे काय काय होणार याची. महिने उलटत गेले.महाराजांचे हेर मोगलाईतूनही खबरा आणीत होते.दिल्लीचा शाह शहाजहान आग्ऱ्याच्या किल्ल्यात आजारपण भोगीत होता.त्याचा थोरला शाहजादा दारा दिल्लीत होता. दुसरा पुत्र मुराद हा गुजराथेत सुभेदार होता.तिसरा पुत्र औरंगजेब हा दक्षिणेत बिदरला होता.आणि चौथा बंगालच्या बाजूस होता.त्याचं नाव सुजा. शाहजानला इतर कोणच्याही वैऱ्यांपेक्षा आपल्याच मुलांची भीती वाटत होती.त्यातला थोरला पुत्र दारा हा सुसंस्कृत होता. बाकीचे सगळे क्रूर श्वापदाहूनही क्रूर प्राणी होते.सगळे टपले होते दिल्लीच्या तख्तावर.बहुतांशी सर्व राजपूत सरदार औरंगजेबाला अनुकूल होण्याची शक्यता होती. शाहजहान मरण्याचीही कुणी वाट पाहणार नव्हता.बंडासाठी जो तो तोफा बंदुका ठासून तयार होता. खरं म्हणजे परिस्थिती अशी होती की,दारूगोळ्याचं कोठारच उडवावं तसं बंड करून राजपुतांना दिल्लीच ताब्यात घेता आली असती. क्रांती! पण या राजपुतांना क्रांतीपेक्षा बादशाहाशी असलेली आपली नाती जास्त मोलाची वाटत असावीत.राजपुतांच्या मनात क्रांतीचे म्हणजेच स्वातंत्र्याचे विचार येतच नव्हते.त्यांच्या अंत:करणात क्रांतीचे विचार प्रेरित करणारी एकही जिजाबाई राजस्थानात जन्माला आलेली नव्हती.इतर कुठून ही क्रांती यावी?क्रांतीची आयात आणि निर्यात कधी करता येत नाही. ती उगवावी लागते स्वत:च्याच मेंदूत मग ती उतरते हृदयात,मग ती शिरते मनगटात,अन् मग ती प्रकट होते तलवारीच्या पात्यातून. शिवाजीराजांना ही उत्तरेची ओळख पुरेपूर झालेली होती. राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे! शिवाजीराजे फार बारकाईने अभ्यास करून योजना आखीत असत,असे ठाईठाई दिसून येते. लहानमोठ्या कामात त्यांना येत गेलेलं यश पाहिलं की लक्षात येतं,की या राजानं या प्रश्नांचा सर्वांगीण अभ्यासपूर्वक आराखडा तयार केला होता. योजनाबद्धता हा शिवकार्याचा आत्मा.हा अभ्यास त्यांनी कोणत्या साधनांनी केला हे सांगता येत नाही.पण महाभारतातील श्रीकृष्णापासून ते शकुनीपर्यंत साऱ्या राजनीतीवाल्यांची त्यांना अगदी दाट ओळख होती असे वाटते. कृष्णाच्या राजनीतीचा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम होता यांत शंका नाही.कृष्णनीतीचा राजकारणात अचूक उपयोग करणारा हा शेवटचा राजा. बाकीचे सारे कृष्णाचं भजन करणारे,देवळं बांधणारे , अन् नवस करणारे भाबडे भक्त! यावेळी (इ.स. १६५६ अखेर) मोगल राज्याची स्थिती उगीचच चिंताजनक झाली होती.सार्मथ्य प्रचंड होतं.पण राजपुत्रांच्या स्पधेर्मुळे आणि शाहजहानच्या नाजूक प्रकृतीमुळे सर्व दरबारी संभ्रमात पडले होते.भयंकर पाताळयंत्री आणि महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच ढोंगी औरंगजेब दक्षिणेत बीदर-नांदेड या महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील भागात ससैन्य होता.त्याचे लक्ष बापाच्या आजारपणाकडे अन् म्हणूनच त्याच्या मरणाकडे अत्यंत आस्थेने लागलेले होते.कोणत्याहीक्षणी दक्षिणेतून दिल्लीकडे दौडावे लागेल हे औरंगजेब ओळखून होता.आणि हेच औरंगजेबाचे वर्म शिवाजीराजांनी अचूक हेरले होते. राजांना उत्तरेतून शाहजहानच्या तब्येतीच्या बातम्या येत होत्या. अशाच गंभीर बातम्या राजांना मिळाल्या.त्यांना खात्रीच पटली की,हा औरंगजेब आत्तापासूनच दिल्लीकडे जाण्याच्या अधीर तयारीत आहे.आपल्याला हीच संधी आहे या मोगलांवर झडप घालण्याची! शिवाजीराजांनी गंमतच केली. त्यांनी आपले वकील सोनो विश्वनाथ डबीर यांना बीदरकडे औरंगजेबाच्या भेटीसाठी नजराणे देऊन पाठविले.हेतू कोणाचा ? औरंगजेबाला बनविणे! सोनोपंत औरंगजेबाला दरबारी रिवाजाप्रमाणे अदबीने भेटले. खरं म्हणजे अजूनपर्यंत राजांनी मोगली सत्तेला लहानसा ओरखडाही काढला नव्हता , भांडण तर नाहीच ते शक्यही नव्हते.मग सोनोपंतांचा नेमका मनसुबा कोणता? ते औरंगजेबाशी साळसूदपणे बोलले की,‘कोकणातील आणि देशावरील विजापुरी आदिलशाहीचा जो मुलूख आमच्या कब्जात आम्ही घेतला आहे,त्याला तुमची राजकीय मान्यता असावी. ‘म्हणजे राजांनी मुलुख घेतला होता आदिलशाहचा अन् ते मान्यता मागत होते मोगल औरंगजेबाची! फुकटची निष्ठा राजे औरंगजेबापाशी वकीलांमार्फत व्यक्त करीत होते। औरंगजेबाचं यात काय जाणार होतं? फुकटचं मोठेपण!सोनोपंत हा जणू मैत्रीचाच बहाणा करीत होते. यातील मराठी डाव औरंगजेबाच्या लक्षात आला नाही.त्याने ही मैत्री मंजूर केली. या दिवशी तारीख होती २३ एप्रिल १६५७ .सोनोपंत बिदरहून परतले.राजगडला पोहोचले. राजांशी बोलले आणि फक्त सातच दिवसांनी शिवाजीराजांनी आपलं भरधाव घोडदळ घेऊन , भीमा ओलांडून मोगली मुलखांत मुसंडी मारली.त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील जुन्नर ठाण्यावर एकदम झडप घातली. गडगंज खजिना,शेकडो घोडे आणि युद्धसाहित्य पळविले. (दि३० एप्रिल १६५७ ) सोनोपंतांनी मैत्रीच्या तहाचं लग्न सातच दिवसांत पार उधळलं. तड्क तड्क तड्क… लगेच राजांनी श्रीगोंदे,पारनेर आणि प्रत्यक्ष अहमदनगर या ठिकाणी असलेल्या मोगली ठाण्यांवर भयंकर घाव घातले.भरपूर लूट मिळविली. या साऱ्या बातम्या औरंगजेबाला बिदरला समजल्या.त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली.या मराठी कोल्ह्यांनी आपल्याला निष्ठेची हूल दाखवून आपल्यावर उघडउघड हल्ले केले याचा अर्थ काय?आपण तहानं गाफील झालो.सिवानं लोणी पळविलं.गाफील का जो माल है, वो अकलमंदका खुराक है! पण औरंगजेब यावेळी स्वत: काहीही करणार नाही याची अचूक खात्री राजांनी ठेवूनच त्याला निष्ठेच्या तहाचे आमिष दाखविले अन् डाव साधला. औरंगजेबाला घाई होती दिल्लीकडे जाण्याची.कारण बाप अतिशय गंभीर आजारी होता. केव्हा ना केव्हा महाराष्ट्रातून ही मोगलाई सत्ता आपल्याला उखडून काढायचीच आहे. नक्कीच.आत्ता हीच संधी आहे , हे ओळखून ही संधी अचूकपणे राजांनी टिपली. पण पुढची धूर्त नाटकबाजी पाहा.राजांनी हे छापे घालीत असतानाच रघुनाथ बल्लाळ कोरडे या आपल्या बिलंदर वकिलाला औरंगजेबाकडे नजराण्याची चार ताटे देऊन रवानाही केले होते. कशाकरता?जुन्नर,नगर,श्रीगोंदे इत्यादी मोगली ठाण्यांवर आमच्याकडून ‘चुकून' झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरिता! या वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन भरपूर पश्चाताप व्यक्त केला.केलेल्या गोष्टीची खोटी माफी मागितली.हेतू असा की , दिल्लीची घाई लागलेल्या औरंगजेबानं जाताजातादेखील शिवाजीराजांवर लहानमोठासुद्धा घाव घालू नये. ही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत नव्हती काय ? होती!पण तो अगतिक होता. शत्रूच्या अगतिकतेचा असाच फायदा घ्यायचा असतो,हे कृष्णानं शिकविलं. शिवाजीराजांनी सतराव्या शतकात ओळखलं.ज्या दिवशी आम्ही भारतीय कृष्णनीती विसरलो,त्या दिवसापासून आमची घसरगुंडी चालू झाली. शिवाजीराजांच्या दिशेने संतापाने पाहात अन् फक्त हात चोळीत औरंगजेबाला दिल्लीकडे जाणे भागच होते. पुढचे पाऊल पुढेच पडेल. शिवाजीराजांनी यावर्षी (दि.२३ ते ३० एप्रिल १६५७ ) एका अत्यंत अवघड अशा धाडसी राजकारणात हात घातला. मोगलांसारख्या दैत्य बळाच्या सत्तेविरुद्ध पहिला हल्ला केला. मोगली ठाणी मारली. औरंगजेबानं सर्व पाताळयंत्री डाव आणि ढोंगबाजी करून दिल्ली कब्जात घेतली.त्याने बापाला आग्ऱ्याला कैदेत ठेवले. तो ‘आलमगीर' बनला.म्हणजे जगाचा सत्ताधीश! या त्याच्या आलमगीर पदवीचा शिवाजीराजांवर काय परिणाम झाला? राजांवर दहशत बसली का? छे! पण ते खिन्नतेने बहुदा हसले असावेत राजपुतांच्या राजनिष्ठेला. पण इराणच्या बादशाहवर मात्र परिणाम झाला.याचे नाव होते शहा अब्बास सानी.त्याला औरंगजेबाचा राग आला. तिरस्कार वाटला आणि कीवही. पण त्याने एक पत्र औरंगजेबाला लिहिले. त्यांत शहा अब्बास लिहितो : ‘अरे! तू आलमगीर केव्हा झालास ? जगाचा सत्ताधीश! आलमगीर ? तो दक्षिणेकडे ( म्हणजे महाराष्ट्रात) असलेला शिवाजी तुला हैराण करतोय. त्याचा बंदोबस्त तुझ्याने होईना आणि तू आलमगीर ?’ म्हणजे या आणि पुढच्या काळात शिवाजीराजांच्या धुमाकुळाची रणधुमाळी इराणच्या तेहरान राजधानीपर्यंत पोहोचली. शिवाजीराजांच्या राज्यकराभारात आणि रणकारभारात एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने दिसून येते.ती म्हणजे स्वावलंबन.कुठेही , कुणाकडेही मदतीच्या-भिक्षेच्या आशाळभूतपणाने ते बघत नाहीत.अन्नधान्य, युद्ध साहित्य , गडकोटांची बांधणी,दारूगोळा आणि आथिर्क खजिना सदैव समृद्धच असला पाहिजे,हा त्यांचा कडक आग्रह होता.स्वराज्याला कधीही आथिर्क कर्ज काढण्याची वेळ आलीच नाही.यात अनेक गोष्टी प्रकर्षानं नजरेत भरतात. आवश्यक तेवढा खर्च,आवश्यक ती काटकसर,उधळपट्टीला पुरता पायबंद,शिस्त चिरेबंद ,भ्रष्टाचारी , गुन्हेगारी पक्की जेरबंद.एकदा का सरकारी सेवकांना लाच खायची सवय लागली की, रयतेची दु:खे आणि तेवढेच शाप राज्यर्कत्याला सोसावे लागतात हे राजांनी पक्कं जाणलं होतं. ‘रयतेस आजार देऊ नये. रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये. रयत दु:खी झाली तर म्हणू लागेल की,यापेक्षा मोगल बरे! मग मराठीयांची इज्जत वाचणार नाही. हा महाराजांचा राज्यकारभार. राज्यसंसार.एखाद्या दक्ष पण तेवढ्याच प्रेमळ अशा गृहिणीसारखा राज्यकारभार महाराज करीत होते.न्याय चोख होता.अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा होत होत्या.कामगिरी करणाऱ्यांना ते पोटाशी मायेनं घेऊन कौतुक करीत होते. म्हणूनच जुन्या पत्रांत राजांच्याबद्दल शब्द येतात बेलाफुलासारख्या भक्तीचे , तुळशी- दवण्यासारख्या अन् चाफा-बकुळीसारख्या सुगंधांचे। हे बघा ना! ‘राजश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी,' ‘हे श्रींचे राज्य आहे', ‘हे श्रींच्या वरदेचे राज्य आहे. शिवाजी महाराज फार फार प्रेमळ होते. गुणी आणि कष्टाळू परमार्थवंत आणि चारित्र्यवंत संतसज्जनांचे ते नम्र भक्त होते. कोणत्याही धर्माच्या, पंथांच्या वा जातीच्या ईश्वरभक्तापुढे ते हात जोडून होते.पण कोणत्याही राजकारणात वा राज्यकारभारात त्यांनी या संतांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही.त्याही संतांनी फक्त देवभक्ती,लोकजागृती आणि लोकसेवाच केली. यात कोणीही सरकारी संत नव्हताच. शिवाजीराजा एक माणूस होता. तो अवतार नव्हता. आपण शिवाजीराजांच्या दैदिप्यमान पराक्रमी कृत्यांनी आणि उदात्त आचरणाने दिपून जातो.आपले डोळे भक्तीभावाने मिटतात. नको! ते डोळे उघडण्याची आवश्यकता आहे. शिवाजीमहाराजांनी अचूक संधी साधून,आपल्या कर्दनकाळासारख्या महाभयंकर असलेल्या सत्तेवर जुन्नर,नगर, श्रीगोंदे इत्यादी ठाण्यांवर हत्यार चालविले,हे पाहून औरंगजेबाचे डोळे खाडकन उघडले.वटारले गेले.तो या गोष्टीचा बदला नक्कीच घेणार होता.पण दिल्ली ताब्यात आल्यावर स्थिरस्थावर व्हायला वेळ लागणार होता. त्यावेळचाही फायदा घेणार होते. शिवाजीराजे! त्यांनी औरंगजेबी सत्तेखालचे कोकणातले उत्तर ठाणे जिल्ह्यातले काही किल्ले घेतलेच.राजांच्यासारखा अचूक संधीसाधू राष्ट्राला नेहमीच हवा असतो. याचवेळी ( इ. स. १६५७ उत्तरार्ध) राजांनी कोकणात आपला घोडा उतरविला.कारण त्यांना संपूर्ण कोकण समुदासकट स्वराज्याच्या कब्जात हवे होते.राजांनी दादाजी रांझेकर आणि सखो कृष्ण लोहोकरे यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर कल्याण आणि भिवंडी जिंकावयास रवाना केले,जिंकले. या दोघांनीही एकाच दिवशी कल्याण,भिवंडी काबीज केली. या दिवशी दिवाळीतील वसुबारस होती. (दि. २४ ऑक्टो. १६५७ ) दुर्गाडी किल्ल्यावर झेंडा लागला. इथे भूमीगत धन हंडे भरून राजांना मिळाले.लक्ष्मीपूजन सार्थ झाले.कल्याणच्या खाडीत मराठी आरमाराचा शुभारंभ झाला. आगरी,भंडारी आणि कोळी जवान सागरलाटेसारखे महाराजांच्याकडे धावत आले. आरमार सजू लागले.पैशात किंमतच करता येणार नाही, हिऱ्यामाणकांनी तुळा करावी अशी ही कोकणची जवान आगरी,कोळी,भंडारी माणसं आरमारावर दाखल झाली. कोकणची किनारपट्टी हळूहळू स्वराज्यात येऊ लागली.आंबा पिकत होता,रस गळत होता पण कोकणचा राजा उपाशीपोटीच झोपत होता.आता स्वराज्यात आमराया बहरणार होत्या.नारळी सुपारी चवरीसारख्या डुलणार होत्या.कोकणचा हा उष:काल होता. कल्याण भिवंडीपासून दक्षिणेकडे कोकणवर महाराजांची मोहीम सुरू झाली.एकेक ठाणं भगव्या झेंड्याखाली येऊ लागलं. आलं उधाण दर्याला. मोगली ठाण्यांवर शिवाजीराजांनी अचानक हल्ले केल्यामुळे औरंगजेब संतापलेलाच होता. पण आत्ता यावेळी काहीच करता येत नाही. हे लक्षात घेऊन तो दिल्लीला गेला.पण त्याच्या मनात शिवाजीराजांचा पुरेपूर काटा काढायचा हे नक्कीच झालं. विस्मय वाटतो,तो राजांच्या कमालीच्या धाडसाचा.एका कर्दनकाळ सत्तेच्या विरुद्ध आपणहून बेमुर्वत हे असलं लष्करी राजकारण करायचं राजांनी साहस केलं ही अत्यंत मोठी झेप होती.पण ती अतिशय विचारपूर्वक म्हणजेच अभ्यासपूर्वक होती.तो वेडेपणा नव्हता.तो मिळत असलेल्या संधीचा अचूक अन् हमखास फायदा घेणं होतं.तो फायदा राजांना झालाच. अशा अनेक संधी पुढच्या इतिहासात पेशव्यांना लाभल्या. पण त्याचा फायदा क्वचितच एखाद्या प्रसंगी घेतला गेला.तसा प्रत्येक संधीचा फायदा इंग्रजांनी आमच्याविरुद्ध अचूक टिपला. लहान वयात आणि आपल्या लहानशा सैन्यानिशी राजांनी अनेकदा अवघड डाव धाडसानं जिंकले.ज्याला नेतृत्त्व करायचं आहे,त्याने शिवचरित्राचा बारकाईने अभ्यास करावा. काळजांत अचूक कल्पनेची कळ येईल.बुद्धीत बळ येईल अन् पदरात फळ पडेल.आता आपण शिवाजीराजांचा नुसताच जयजयकार जरा कमीच करावा! दि. २४ ऑक्टोबर १६५७ या दिवशी शिवाजीराजांनी कल्याणपासून दक्षिण कोकणात सावंतवाडीपर्यंत वादळी स्वारी मांडली.महिनोन्महिने राजा स्वारीवर आहे,त्याला विश्रांती सोसतच नाही.या कोकण मोहिमेत संपूर्ण कोकण महाराजांच्या कब्जात आलं असं नाही.पण किनाऱ्यावरचे अनेक किल्ले आणि काही जलदुर्ग महाराजांनी सुसरीनं शेपटाचा फटकारा मारून एकेक भलामोठा मासा मारावा,तसा एकेक जलदुर्ग राजांनी मटकावला.हरणेचा किल्ला,जयगड,घेरिया,देवगड, रेडी अन् थेट तेरेखोल शिवाय सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरती असलेले अनेक गिरीदुर्ग महाराजांनी काबीज केले.केवढं प्रचंड वादळ आहे हे!आमच्या तरुण मनात असंच काही अचाट कर्तृत्त्व,आजच्या हिंदवी स्वराज्यात आपणही गाजवावं असं येतंच नाही का? का येत नाही?आळस?अज्ञान ? बेशिस्त?अभिमानशून्यता? आत्मविश्वासाचा अभाव? अल्पसंतुष्टता?सगळंच काही! याच काळात इंग्लिश टोपीवाले व्यापारी,बंदुकवाले लष्करी पोर्तुगीज अन् सारेच अठरा टोपीकर फिरंगी हजारो मैलांवरून सागरी मार्गाने भारतात येत होते. उंदराच्या कानाएवढे आणि विड्याच्या पानाएवढे यांचे देश. नकाशावर लौकर सापडतही नाहीत.पण त्यांची महत्त्वाकांक्षा लाटेवर स्वार होऊन आम्हाला लुटायला आणि कुटायला येत होती. कोकणातील या स्वारीत ( इ.स. १६५७ ते ५८ ) शिवाजीराजांच्या नजरेस अनेक गोष्टी आल्या. काही सुखावणाऱ्या तर काही मिरचीसारख्या झोंबणाऱ्या त्यात राजांना जी कोकणी मनं आणि मनगटं गवसली,ती फारच मोलाची होती.मायनाक भंडारी, बेंटाजी भाटकर, दौलतखान, सिदी मिस्त्री, इब्राहिमखान, तुकोजी आंग्रे,लायजी कोळी सरपाटील आणि असे अनेक. आगरी भंडारी,कोळी, कुणबी, प्रभू,सारस्वत मंडळी महाराजांच्या या जागर-गोंधळात कर्तृत्त्वाचे पोत पेटवून राजांच्या भोवती हुकूम झेलायला अधीरतेन गोळा होऊ लागली.हे सारेच समाजगट खरोखर गुणी होते. शौर्य,धाडस,कल्पकता,निष्ठा पराक्रमाची हौस आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षा या तरुणांच्या रोमरोमात उसळत होती.राजांनी या कोकणी चतुर काळसुंद्यांचा अचूक उपयोग करायच्या योजना आखल्या.कृतीतही आणल्या. या आगरी,कोळी,भंडारी पोरांचं काय सागरी अप्रूप सांगावं ? जन्मल्यावर यांना आधी समुद्रात पोहता येत होतं.अन् मग जमिनीवर रांगता येत होतं. एकच पुढच्या काळातील इतिहासातील साक्ष सांगू का ? शिवाजीराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबानं मराठी राज्य गिळून टाकण्याकरता अमाप दळवादळ घेऊन इथं स्वारी केली.पंचवीस वर्ष तो मराठी देशावर थैमान घालत होता.पण कोकणात किनारपट्टीचा एकही सागरी किल्ला अन् कोकणची वीतभर जमिनही औरंगजेबाला पंचवीस वर्षात जिंकता आली नाही. अजिंक्य! कोकण अजिंक्य , भंडारी अजिंक्य,आगरी अजिंक्य,कोळी अजिंक्य ,समुद्र अजिंक्य ,मराठी राज्य आणि मराठी ध्वज अजिंक्य.हे कर्तृत्त्व कोणाचं?हे या कोकणी मर्दांचं. आणि आज याच माणसांना आम्ही मुंबईत ‘रामागाडी‘ म्हणून भांडी घासायला लावतोय. मॅक्सी अन् साड्या धुवून वाळत घालायला लावतोय.हॉटेलात कपबश्या विसळायला लावतोय. वास्तविक यांचा मान भारताच्या आरमारी नौकांवरून शत्रूवर तोफा बंदुकांनी सरबत्ती करण्याचा आहे.ही सारी मार्शल रेस आहे.शिवाजीमहाराजांनी तीनशे वर्षांपुर्वी हे ओळखलं. कोकण अजिंक्य बनवलं. आमच्या लक्षात केव्हा येणार ? ब्रिटीश विल्यम पिप्ससारखा एखादा कान्होजी आंग्रा,मायनाक भंडारी किंवा एखादा मराठी दौलतखान आम्हाला आज लाभेल का ? मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला याच कोकण स्वारीतून (इ. स. १६५७ -५८ ) शिवाजीराजे कुडाळपर्यंत समुद्र आणि भूमी कब्जात घेत पोहोचले होते. देशावरीलही लोणावळ्याजवळच्या अनेक किल्ल्यांचा कब्जा राजांनी घेतला होता. राजमाची, लोहगड, तुंगतिकोना आणि पूर्वी शहाजीराजांच्यासाठी बादशाहच्या ताब्यात देऊन टाकलेला कोंढाणा राजांनी काबीज केला होता.कोकणातील पण सह्यादीवर असलेले माहुली,कोहजगड ,सिद्धगड, मलंगगड ,सरसगड ,इत्यादी गडही जिंकले होते. स्वराज्य वाढलं होतं. विजापूरचा अर्धांगवायू झालेला बादशाह मोहम्मद आदिलशाह चार नोव्हेंबर १६५६ रोजी मृत्यू पावला होता आणि त्याचा मुलगा अली आता बादशाह झाला होता. हा अली वयाने १७ -१८ वर्षांचाच होता. त्याची आई ताजुल मुख्खदीरात उर्फ बडीसाहेबा हीच सर्व कारभार पाहत होती. क्वचितच एखाद्या झटापटीत स्वराज्याच्या मावळी सेनेचा पराभव होत होता. नाही असं नाही. पण उल्लेख करावा असा एकही विजय या काळात आदिलशाही सेनेला कुठेही मिळाला नाही.सर्वत्र विजयाचाच घोष उठत होता मराठ्यांचा. त्यामुळे आधीच हादरून गेलेल्या विजापूरच्या शाही दरबारची अवस्था चिंताक्रांत झाली होती. खरं म्हणजे ही विजयाची गगनभेदी गर्जना साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर एकदम उठली होती.हीच शिवक्रांती सगळीकडेच परकीय शत्रू विस्मित आणि बेचैन झाले होते. स्वकीय शत्रूंना काय तोटा?त्यांचं पोट सततच दुखत होतं.राजांच्या या सुसाट कोकण स्वारीमुळे (इ. स. १६५७-५८ ) आदिलशाही गलबलून गेली होती. शिवाजीविरुद्ध काय करावं हेच बड्या बेगमेस आणि शाहास समजत नव्हतं.विचार करीत बसायलाही सवड नव्हती.सतत मराठी वादळाच्या बातम्या येत होत्या. या मराठी विजयांचं मर्म कोणचं होतं? का जय मिळत होते? असं कोणचं ‘मिसाईल' महाराजांना गवसलं होतं?आम्ही तरुणांनी आज याचा अभ्यास केला पाहिजे.महाराजांनीच अनेक प्रसंगी स्वत: उद्गारलेल्या शब्दांत ते मर्म सापडले. ते आपल्या मावळ्यांना म्हणताहेत. ‘आपापले काम चोख करा', ‘हे राज्य श्रीच्या आशीर्वादाचे आहे','पराक्रमाचे तमाशे दाखवा', या राज्याचे रक्षण करणे हा आपला फर्ज (कर्तव्य) आहे, त्यांस चुकू नका.सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघा मुलूख आपला.तो मुक्त करावा,ऐसा मानस आहे. आणि असेच कितीतरी वर्मी भिडतील असे शब्द महाराजांनी आपल्या जिवलगांच्या पाठीवर हात ठेवून आयुष्यभर उच्चारले. हे शब्द हृदयी कोरूनच मावळ्यांनी स्वराज्याकरता सर्वस्व पणाला लावले. अनुशासन, शिस्त, निस्वार्थ सेवा, स्वच्छ राज्यकारभार आणि नेत्यांवरती नितांत विश्वास हे शिवशाहीच्या यशाचे मर्म होते. म्हणूनच हरघडी,हरदिवशी, नित्यनवा दिन जागृतीचा उगवत होता. मावळ्यांच्या आकांक्षापुढति गगन रोज झुकत होतं, ठेंगणं ठरत होतं.त्यातूनच भरत होतं स्वराज्य आणि बहरत होते स्वाभिमानी संसार. आळस,अज्ञान अन् अहंकार यांची हकालपट्टी झाली होती. अन् लाचारी,फितुरी आणि हरामखोरी यांना स्वराज्यात जागा नव्हती.असं सारं घडलं तरच राष्ट्र उभं राहत असतं.फुलत असतं. शिवकालात तसं पाहिलं तर रणांगणावर होणाऱ्या जखमांमुळे कण्हण्याचेच क्षण रोज आणि अखंड उठत होते.पण पोरं हसत हसत कण्हत होती.अभिमानानं कण्हत होती,अन् मग कोणी एखादा शाहीर डफावर थाप मारून गर्जत होता. ‘मराठियांची पोरं आम्ही,भिणार नाही मरणाला' ‘ अन् मग माझ्यासारख्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भिरभिरणाऱ्या गोंधळ्याला सुचू लागतं की,मऱ्हाठियांची पोरे आम्ही नाही भिणार मरणाला! सांगुनि गेला कुणी मराठी शाहीर अवघ्या विश्वाला. तीच आमुची जात शाहीरी मळवट भाळी भवानिचा. पोत नाचवित आम्ही नाचतो. दिमाख आहे जबानिचा! कठीण नाही ते व्रत कसलं? अगदी प्रारंभापासून जिजाऊसाहेब,शिवाजीराजे आणि राज्यकारभारी यांनी एक अत्यंत महत्त्वाची पद्धत स्वराज्यात सुरू केली. प्रधानमंडळांपासून ते अगदी साध्या हुजऱ्यापर्यंत प्रत्येक स्वराज्य-नोकराला रोख पगार, वेतन. हे वेतनही प्रत्येकाला अगदी नियमितपणे मिळावे , अशी व्यवस्था कोणालाही नोकरीच्या मोबदल्यात वतन किंवा मिरासदारी दिली जात नसे. संपूर्ण राज्यकारभाराची आथिर्क व्यवस्था वेतनावरच योजिली होती.सरंजामशाही आणि वतनशाही याला इथेच प्रतिबंध घातला गेला. कोणत्याही बादशाहीत हा असा वेतनबद्ध राज्यकारभार दिसत नाही.सामान्य नोकरांना पगार असतील.पण बाकीच्या मोठ्यांना नेमणुका सरंजाम,जहागिऱ्या आणि वतनदाऱ्या होत्या.यामुळे अनुशासन राहतच नव्हते. शिवाजीराजांपाशी हुकमी शक्ती सतत सुसज्ज होती,यातील हे एक प्रबळ कारण होते.पगारी पद्धतीवरती राज्यकारभार करणारा शिवाजीराजा हा अर्वाचीन युगातला एकमेव राज्यकर्ता.त्यामुळे सरंजामशाहीतील दुर्गुण राजांनी अस्तित्त्वातच येऊ दिले नाहीत. आत्तापर्यंत बुडालेल्या बादशाह्या आणि विजयनगरचे राज्य का बुडाले याचा अचूक वेध शिवाजीराजांनी निश्चित घेतला होता.यात शंका नाही. त्या चुका आपल्या स्वराज्यात होता कामा नयेत.याकरिता ते अखंड सावधान होते. माणसांची परीक्षा होते ती कठोर संकटाच्या आणि भरघोस स्वार्थाच्या वेळी ती वेळ सामोरी आलीच.कमालीच्या अस्वस्थ आणि संतप्त झालेल्या आदिलशाही दरबारने एक प्रचंड निर्णायक मोहीम राजांच्या विरुद्ध योजिली. इ. स. १६४७ पासून ते आत्ता इ. स. १६५९ प्रारभापर्यंत आदिलशाहीला शिवाजीराजे सतत पराभवाचे फटके देत होते. स्वराज्याचा मुलूख वाढत होता. कोकणातील फार मोठा प्रदेश, बंदरे आणि किल्ले राजांनी काबीज केले होते.स्वराज्याचं आरमार दर्यावर स्वार झालं होतं. आरमाराकडे म्हणजेच सागरी सरहद्दीकडे यापुर्वी वाकाटक राजांपासून ते यादव राजांपर्यंत अगदी शिलाहार आणि कदंब राजांपर्यंतही कोणी महत्त्व ओळखून लक्षच दिले नव्हते. कुणाकुणाचे थोडीशीच गलबते दर्यावर तरंगत होती.पण ती लुटुपुटीच्या पोरखेळासारखीच. पोर्तुगीज आणि अरबांसारख्या महामहत्त्वाकांक्षी शत्रूला अन् चाचेगिरी करणाऱ्या कायमच्या शत्रूला धडक देण्याइतकी ताकद आपल्यात असली पाहिजे हे शिवाजीराजांनी अचूक ओळखलं.त्यांनी आरमार उभे करण्यास गतीने सुरुवात केली. खरं म्हणजे ही आरमाराची परंपरा शालिवाहनांपासूनच चालू राहिली असती, तर पुढे शिवाजीराजांनी आपले आरमार असे जबर बनवले असते की,खरोखरच मराठ्यांचे लष्करी आणि व्यापारी जहाजे थेट इराणी,अरबी,युरोपी आणि आफ्रिकी किनाऱ्यांपर्यंत जाऊन धडकली असती. खऱ्या अर्थाने रुमशाम पावेतो आमचे आथिर्क आणि लष्करी साम्राज्य निर्माण झाले असते. पण ‘सागरी पंचक्रोशी ओलांडली तर आपला धर्म बुडतो' अशी खुळचट कल्पना आमच्या धर्मपंडितांनी इथे रुजविली अन् वाढविली.आता शिवाजीराजांना आरमाराच्या श्रीगणेशापासून सुरुवात करावी लागत होती.स्वराज्याचे भाग्य असे की,कोकणातील साऱ्या दर्यावदीर् जमातींनी राजांना काळजापासून मदत केली.हा हा म्हणता दर्यावर दरारा बसला. आरमार हा एक स्वतंत्र लष्करी विभाग झाला.आरमारी सेनापती म्हणजे सरखेल म्हणजे सागराध्यक्ष हे पद राजांनी निर्माण केले. आता विजापुराहून निघाला होता अफझलखान आदिलशाहीने आणि राजमाता बड्या बेगमेने या खानाला अगदी स्पष्ट शब्दात हुकूम दिला की, ‘हम लढाई करना चाहते नही।', ‘ऐसा बहाना बनाकर सिवाको धोका देना।' स्वराज्यासकट शिवाजीमहाराजांचा आणि त्यांच्या सर्व साथीदारांचा ‘निर्मूळ फडशा' पाडण्याकरिता ही प्रचंड मोहीम खानासारख्या सर्वार्थाने प्रचंड सेनापतीच्या नेतृत्त्वाखाली निघाली. (इ. स. १६५९ मार्च) एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडदळ,पायदळ, तोफखाना आणि अपार युद्धसाहित्य विजापुराहून निघाले.सार्वभौम मराठी राष्ट्र उभी करण्याची महाराजांची कल्पना आणि महत्त्वाकांक्षा मुळासकट पार पार चिरडून टाकण्याकरता आदिलशाहने मांडलेला हा डाव होता. जास्तीतजास्त दक्षतापूर्वक आणि योजनापूर्वक खानाने आराखडा आखला.शिवाजीला डोंगरी किल्ल्यांच्या गराड्यातून बाहेर, पूवेर्कडील सपाटीच्या प्रदेशावर यायला भाग पाडावे असा त्याचा पहिला प्रयत्न होता.म्हणूनच त्याने आदिलशाही हद्दीतील देवदेवस्थानांत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.तेथे त्याला कोण अडविणार?त्याच्या स्वत:च्या सैन्यातही आमचीच माणसे मोठ्या संख्येने होती.जणू त्यांच्याच अध्यक्षतेखाली खान या देवस्थानांचे धिंडवडे काढत होता. यात त्याचा हेतू एकच होता. शिवाजीराजांना चिडविणे. त्यांच्या धामिर्क भावना कमालीच्या दुखविणे.हे केले की, राजा चिडेल.भावनाविवश होईल आणि आपल्या विरुद्ध तो चाल करून येईल,मोकळ्या मैदानी मुलुखात! यातच शिवाजीराजांच्या राजकीय विवेकाला आणि लष्करी मुत्सद्देगिरीला आव्हान होते. खबरा मिळत होत्या.यावेळी महाराज कुडाळहून राजगडास आले.खान म्हणजे मूतिर्मंत मृत्यूदूतच.राजगडावर साक्षात यमाचे दूत घिरट्या घालीत होते. राजांची अतिशय लाडकी राणी सईबाई क्षयाने अत्यवस्थ होती. खानाच्या बातम्यांनी स्वराज्य अस्वस्थ होते. अन् मग शिवाजीराजांची मन:स्थिती कशी असेल? स्वराज्याचं व्रत म्हणजे अग्निदिव्यच कठीण! कठीण नाही,ते व्रत कसलं ? हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्यावर प्राणांतिक संकट येत असलेले पाहून भारतातील कोणकोण राजांच्या मदतीकरता येणार होते?राजपूत? जाट?बुंदेले? गढवाल?डोग्रा?शीख? कोणीही नाही. जे काही करायचं होतं ते राजांना आपल्या साध्यासुध्या गरीब मावळ्यांच्या जिवावरच करायचं होतं.साधी सहानुभूतीसुद्धा मिळण्याची वानवा होती.पण राजांचा पूर्ण विश्वास होता या आपल्या भावांवर आणि भवानीवर. दरमजल खान फौजेनिशी पुढे सरकत होता.महाराजांना धार्मिक भावनेने चिडविण्याचा आणि सह्यादीतून मोकळ्या मैदानावर काढण्याचा डाव पूर्णपणे फसला. वासरू जसं गाईपासून दूर जात नाही.तसंच महाराजांचं प्रेम सह्यादीच्या गडकोट दऱ्याखोऱ्यांवर होतं.ते त्याला बिलगून होते. याचवेळी दिल्लीत बादशाह बनलेला औरंगजेब काय विचार करीत होता?हा दख्खनचा आखाडा त्याला दिसत होता.तो शिवाजीराजांवरही भयंकर चिडलेला होता आणि अफझलखानाशीही म्हणजेच विजापूरच्या आदिलशाहीशीही त्याचं शत्रूत्त्वच होतं.त्याने साधा सरळ विचार केला की,आपले हे दोन्हीही शत्रूच आहेत. आदिलशाह आणि सीवा.हे दोघेही आपसांत झुंझणार आहेत. यातील जो कोणी शिल्लक उरेल त्याच्याविरुद्ध नंतर आपण पाहू काय करायचं ते! बहुतेक उरणार अफझलखान.शिवाजी संपणार. हरगीज संपणार! गोव्याचे पोर्तुगीजही अलिप्तच राहिले.जंजिऱ्याच्या सिद्दीची हौस मराठी राज्य कोकणातून मुरगाळून काढण्याचीच होती. पण यावेळी महाराजांच्या विरुद्ध फार मोठी गडबड करण्याची कुवत त्याच्यात नव्हती.जी गडबड थोडीफार सिद्दीने केली ती महाराजांच्या मराठी सरदारांनी उधळून लावली.सिद्दी गप्प बसला. आता सरळसरळ डाव होता अफझलखान विरुद्ध शिवाजीराजे.शिवाजी डोंगरातून बाहेर पडत नाही हे खानाला दिसून आले तरी तो प्रयत्न करीत होता.वाईत आल्या आल्या (इ. स. १६५९ मे) त्याने स्वराज्याच्या पूर्व कडेवर असलेली चार ठाणी सात हजार फौज पाठवून एकदम जिंकली.ठाणी अगदीच लष्करी बाबतीत लहानशी होती. शिरवळ,सासवड, सुपे आणि पुणे. या झडपेचा मराठी रयतेवर नक्कीच दहशती परिणाम होईल. लोक घाबरतील,आपल्याकडे येऊन सामील होतील अशी त्याची अपेक्षा होती. या दहशतीच्या जोडीला लोकांना धनदौलतीचे आमिष दाखविले तर ही खेडवळ मावळी माणसं नक्कीच आपल्या पायाशी येतील अशी खानाला खात्री वाटली.त्याने मावळच्या देशमुख सरदारांना आदिलशाहीच्या शिक्कामोर्तबीची फर्माने पाठविली.त्या फर्मानात शाहने या सरदारांना फर्मावले होते की , शिवाजीची बाजू सोडा आणि नामजाद सरदार अफझलखान यांस सामील व्हा. जर सामील झालांत तर तुमचं कोटकल्याण करू.पण जर शिवाजीच्याच बाजूला राहून बादशाहीविरुद्ध वागलांत तर तुमचा साफ फडशा उडवू.याद राखा!आम्ही शिवाजाचा मुळासकट फडशा पाडणार आहोत ! हे असलं भयंकर जरबेचं पण तेवढंच गोड आमिषाचं फर्मान महाराजांच्या सर्व मावळी सरदारांना खानानं पाठविले. पहिलंच फर्मान वाईपासून अवघ्या पाच कोसावर असलेल्या कान्होजी नाईक जेधे यांना मिळालं.कान्होजी नाईक ते फर्मान घेऊनच राजगडावर शिवाजीमहाराजांकडे आले. आपल्या पाचही तरुण पुत्रांसह आले आणि त्यांनी महाराजांना आभाळाएवढ्या विश्वासानं सांगितले की,‘आपण अजिबात चिंता करू नका.मावळच्या सर्व सरदारांच्यानिशी मी तुमच्या पायाशी आहे.मी माझ्या घरादारावर पाणी सोडतो! केवडा प्रचंड विश्वास हा! आणि कान्होजींनी मावळच्या सर्व देशमुखांना सांगाती घेऊन महाराजांकडेच धाव घेतली.फक्त उतवळीकर खंडोजी देशमुख हा एकमेव सरदार आधीच अफझलखानाला जाऊन मिळाला होता.बाकीचे सर्व जिवलग स्वराज्याच्या झेंड्याखाली! खानाला वाटलं होतं की,लाचार भित्र्या भिकाऱ्यासारखे हे मावळे माझ्या छावणीत सेवा करायला येतील.त्याची पूर्ण निराशा झाली. तरीही त्याने एक गंमत केली.या शिवशाही सरदारांच्या घरात नव्या पिढीतील पोरं होती.कुणाचा मुलगा,कुणाचा पुतण्या,कुणाचा भाऊ इत्यादी या तरुण पोरांच्या नावानं.खानानं नवी अशीच आमिषाची फर्मानं पाठविली.पण एकही पोरगा खानाला जाऊन मिळाला नाही.सारं स्वराज्यच महाराजांच्या पाठीशी खडं झालं. महाराजांनी हे निर्माण केलं. आजच्या भाषेत त्याला म्हणतात राष्ट्रीय चारित्र्य,राष्ट्रीय निष्ठा.हे जर आपल्यापाशी असेल तर आपण शत्रूचे पॅटन रणगाडे ही उलथून पाडू शकतो.कान्होजींसारखे परमवीर अब्दुल हमीद आमच्यात तळपू शकतात.आमच्या आकांक्षांचे झेंडे गगनात चढू शकतात. महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव. शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वी आम्हाला केवढं मोलाचं लेणं दिलं! राष्ट्रीय चारित्र्य! नॅशनल करेक्टर!हे असेल तर यशकीतीर्चे गगनच काय पण सूर्यमंडळ गाठता येईल.शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींनी औरंगजेबासारख्या कर्दनकाळ वैऱ्यालाही दाखवून दिलं की, हा शिवाजीराजा मरण पावला तरीही इथं हजारो शिवाजीराजेच उभे असतील ते न वाकता,लाचारीने न झुकता, भगीरथ कष्टांनीही न थकता महाराष्ट्र स्वराज्यासाठी अखंड पंचवीस-पंचवीस वर्ष झुंजत राहतील.ते सारे शिवाजी वाकणारही नाहीत,अन् मोडणारही नाहीत.त्यांच्या त्यागानं दिल्लीचं तख्त दुभंगेल. हेच शिवराष्ट्रीय अन् महाराष्ट्रधर्मीय आमचं कर्तृत्त्व आणि आमची आकांक्षा,पुढच्या इतिहासात साक्षात,प्रत्ययास आली नाही का? आलीच! हे लेणं आम्ही कधीही गंजू देता कामा नये.हे लेणं आम्ही कधीही हरवून बसता कामा नये.माझ्या कुमार नातवंडांनो, मी हे महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे' हे सदर मांडतोय, ते केवळ केवळ या एकमेव हेतूनेच. छत्रपती शिवाजीमहाराजांचे असंख्य,उदात्त, उत्कट आणि उत्तुंग सद्गुण जर आम्ही सतत हृदयात जागे ठेवले तरच या चरित्राचा उपयोग.नुसतेच पुतळे अन् नुसत्याच पूजा व्यर्थ आहेत. निजीर्व आहेत. अफझलखानच्यास्वारीमुळे महाराजांचे शतपैलू नेतृत्त्व आणि त्यांच्या शिलेदारांचे शतपैलू कर्तृत्त्व आपल्याला या एकाच मोहिमेत प्रत्ययास येतेय.या मोहिमेत महाराजांनी राजधानी राजगड युद्धासाठी न निवडता त्यांनी प्रतापगडसारखा गड निवडला.प्रतापगड म्हणजे जणू विधात्यानेच रचून ठेवलेला सह्यादीतील अत्यंत बिकट चक्रव्यूहच.महाराजांचा सह्यादीच्या नैसगिर्क रचनेचा , म्हणजेच भूगोलाचा अभ्यास किती सूक्ष्म आणि अचूक होता हे लक्षात येते.अर्थात केवळ जावळी प्रतापगडच काय,पण अवघ्या कोकण,सह्याद्री,समुद्र,मावळपट्टा किंबहुना अवघा महाराष्ट्रच त्यांनी सूक्ष्मतेने हेरला होता.येथील नद्या, निबिड अरण्ये,दऱ्याखोरी,पश्चिम समुद्र,पठारे आणि अशा अवघ्या मराठी मुलुखातील माणसंही त्यांनी अचूक हेरली होती.त्यांच्या सैन्यात कोकणातील जवान होते अन् त्या दूरवरच्या चंदपुरी गोंडवनातील गोडंही होते.सारेच होते उघड्या शरीराचे,निधड्या छातीचे,अन् कडव्या इमानाचे। अफझलखान प्रयत्न करीत होता अशा या निबिड चक्रव्यूहातून महाराजांना मोकळ्या मैदानावर हुसकून आणण्याचा.त्याचे याबाबतीतील सर्व डाव वाया गेले. महाराजांच्या मनात या मोहिमेचा तपशीलवार आरखडा आखला जात होता.प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणानं महाराज टाकीत होते.विजापुराहून निघाल्यापासून वाईत येऊन पोहोचेपर्यंत खानाने अनेक पेचदार डाव टाकले.भावनेला डिवचले.चार ठाणी काबीज केली पण महाराजांनी या काळात कुठेही प्रतिहल्ले केले नाहीत. ठाणी जाईपर्यंत ती राखण्याची शिकस्त केली.पण गेल्यानंतर ती परत घेण्यासाठी अजिबात प्रतिहल्ले केले नाहीत.उलट ठाणी गेल्यावर महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांना त्यांनी सांगितले,ही गेलेली ठाणी परत घेण्याचा आत्ता अजिबात प्रयत्न करू नका. या काळात महाराजांच्या सैन्यानं खानाच्याविरुद्ध कुठेही लहानसाही हल्ला केला नाही. खानाला या काळात महाराजांनी कधीही पत्र वा राजकारणी बोलणी करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दूत पाठविला नाही. अगदी गप्प राहिले. झडप घालण्यापूवीर् चित्ता जसा दबून बसतो,डरकाळ्या फोडत नाही, तसे यामुळे खान बुचकळ्यातच पडला होता.या शिवाजीच्या मनांत आहे तरी काय याचा त्याला थांगपत्ताही लागत नव्हता. पावसाळ्याचे चार महिने उलटल्यावर प्रथम खानानेच आपला वकील कृष्णाजी भास्कर कुलकणीर् यांस वाईहून महाबळेश्वराच्या पर्वताच्या पलिकडे दरीत असलेल्या प्रतापगडावर पाठविले. महाराजांना डोंगरातून बाहेर काढण्याचा खानाचा हा शेवटचा प्रयत्न. त्याने वकीलाबरोबर पत्रही दिले होते.खानाची अशी दरडावणी होती अन् वकीलाची गोडगोड बोलणी होती की, ‘प्रतापगडाहून आम्हांस वाईत भेटण्यासाठी हुजुरदाखल व्हा ,’ म्हणजे आमच्या पंजात या! आमच्या घशात येऊन पडा. हेही खानाची गोडगोड अर्जवणी अन् कठोर दरडावणी महाराजांनी अतिशय कुशलतेने अन् खानालाच प्रतागडाच्या खाली येणे भाग पाडले अगदी नम्रतेने. शरणागतीच्या भाषेत. या काळात स्वराज्याच्या हेरांनी आपली कामगिरी अतिशय उत्कृष्ट कौशल्यानी आणि तत्परतेने केली.याचवेळी राजापूरच्या बंदरात,कोकणात आदिलशाहीची तीन लष्करी गलबते येऊन थांबली होती.जर युद्ध भडकले आणि कोकणात पसरले तर अफझलखानाला या गलबतातील युद्धसाहित्याचा उपयोग व्हावा हा आदिलशाही हेतू होता.गलबते सुसज्ज होती. पण त्यांवरील शाही माणसे पूर्ण गाफील होती.इतकेच नव्हे तर खानाची छावणी पुणे , सातारा , कोल्हापूर आणि सांगली या भागातील आदिलशाही ठाणी आणि प्रत्यक्ष खानही वाढत्या प्रमाणात गाफीलच बनत होता. ही किमया महाराजांच्या वकीलाची,हेरांची आणि प्रत्यक्ष महाराजांच्या बोलण्याची. या साऱ्याचा परिणाम? पराभव कुणाचा? सश्रद्ध,पण सावधान असावे! स्वत: पूर्ण सावध राहून शत्रूला गाफील बनवायचं आणि त्याच्या गाफीलपणाचा पुरेपूर फायदा उठवायचा हा शिवाजीराजांचा डाव.हाच त्यांच्या बुद्धीबळाचा डाव.आपल्या वकीलाच्या मार्फत महाराज खानाला आपल्या चक्रव्यूहात गुंतवित चालले होते. खानाने प्रतापगडच्या पायथ्याशी यायचं मान्य केलं. खरं म्हणजे इथं जावळीच्या जंगलात गडाच्या वाटेवर खान यायला कबूल झाला ही खानाची चूकच नाही का? नाही, खानाला येणं भागच होतं.नाहीतरी तो दुसरं काय करू शकत होता?त्याला शिवाजीराजा आपल्या मगरमिठीत हवा होता.त्याकरीता अखेर त्याला प्रतापगडावर हल्ला करण्याकरता तरी यावच लागलं असतं.त्याने सरळ विचार केला की,शिवाजी आपल्या भेटीसाठी गडावरून खाली यायला तयार होतोय.म्हणजेच आपण गडापर्यंत युद्ध न करताच,विना अडथळा जाऊन पोहोचू शकतोय तेही आपल्या फौजेसह.म्हणून खानाने ही फार मोठी अनुकूल गोष्ट घडणार आहे हे लक्षात घेऊन प्रतापगडाखाली यायचं ठरविलं. यात त्याची काहीच चूक नाही. तो चुकला स्वत:च्याच गाफीलपणामुळे.राजकारण, दारुगोळ्याचं कोठार आणि तपोसाधना यांत किंचितही गाफील राहून चालत नाही. तपोभंग करायला केव्हा एखादी अप्सरा येईल याचा नेम नसतो. दारुगोळ्याचं कोठार उडवायला कुठून ठिणगी येईल याचाही नेम नसतो अन् राजकारणात एखादा चाणक्य,कृष्ण किंवा शिवाजीराजा केव्हा समोरच्याला उलथंपालथं करून टाकील याचाही नेम नसतो.खान याबाबतीत अत्यंत बेसावध राहीला.तेही स्वत:च्या मनात शिवाजीराजाचा विश्वासघाताने जीव घेण्याची इच्छा धरून. खान वाईवरून महाबळेश्वराकडे निघाला. राजांना जिवंत किंवा ठार मारून कब्जात घ्यायचं अन् विजापुरला न्यायचं हे त्यानं अगदी निश्चित ठरविलं होतं. या प्रतापगड कालखंडात महाराजांना अनेक मानसिक यातनांना तोंड द्यावे लागले होते. ते प्रतापगडावर राजकारणात व्यग्र असतानाच तिकडे राजगडावर त्यांच्या राणीसाहेब सईबाई या मृत्यू पावल्या. (दि. ५ सप्टेंबर १६५९ ) हे दु:ख सामान्य होतं का?त्यांचा पुत्र संभाजीराजा हा अवघा दोन वर्षाचा होता. जिजाऊ साहेबांना चिंता आगीसारखी भाजून काढीत होती.आईची चिंता ही महाराजांना केवढी असहनीय होत होती.आईवर कमालीचं प्रेम करणारा हा पुत्र होता. एक गोष्ट सर्वात चिंतेची होती,ती महाराजांच्यावर अपरंपार पेम करणाऱ्या मावळ्यांच्या मनस्थितीची. हे मावळे महाराजांवर रामायणातल्या हनुमंतासारखे अन् वानरदळासारखे प्रेम करीत होते. त्यांचा महाराजांना प्रथमपासूनच आग्रह होता की,‘महाराज, खानाला जातीने भेटू नका,धोका आहे.तो घात करील या डोंगरदऱ्यात खानाशी आम्ही झुंजतो.वर्षनवर्ष ही झुंजतो.पण तुम्ही त्या आगीत शिरू नका. मावळ्यांचे आणि सरदारांचे हे प्रेम अलौकीक होते. पण महाराजांचा डाव त्यामुळे अडखळत होता.शत्रूच्या जास्तीतजास्त फौजेचा आपल्या कमीतकमी फौजेनिशी,कमीतकमी वेळेत पूर्ण पराभव करण्याचा डाव महाराजांनी आखला होता.यावर हे सवंगडी म्हणत होते,हे जमलियास ठीक.पण न जमलियास कैसे होईल ? महाराजांचा जबरदस्त आत्मविश्वास आणि मावळ्यांचे जबरदस्त प्रेम यांचा हा संघर्षच होता. आणि महाराजांनी एका मध्यरात्री अर्धवट झोपेतून खडबडून उठून आपल्या या सरदारांना आपलं स्वप्नच सांगितलं. महाराजांचे शब्द असे,श्री भवानी आमच्या स्वप्नात आली.श्री आम्हांस बोलली की, लेकरा,त्याने (खानाने) माझा अपमान केला.त्वा काम काळजीने करावे.तुजला यश लाभेल.मीतर तुझी तलवारच होऊन राहिली आहे.श्री आम्हांस प्रसन्न झाली. अन् मग अवघ्यांना पटलेचकी आता यश मिळणार. महाराजांनी जनतेच्या श्रद्धेचा केलेला हा अचूक उपयोग.श्रद्धा हे सार्मथ्य आहे.अंधश्रद्धा हे दौर्बल्य आहे. महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही अंधश्रद्धा ठेवली नाही. पण योग्य श्रद्धेचा आत्मबळ वाढविण्यासाठी असा उपयोग केला. महाराजांनी खरोखरच आपल्या तलवारीचे नाव ‘भवानी' असे ठेवले. खरंच महाराजांना स्वप्नात भवानीदेवी दिसली की?ती बोलली का? श्रीचं जाणे! पण स्वराज्यावर आलेलं भयंकर संकट या श्रीवरच्या सश्रद्धेनेच उधळलं गेलं. राज्य वाचलं,राजा वाचला.ध्वज वाचला हे मात्र सत्य.ज्याने त्याने आपल्या बुद्धीने आणि भावनेने निवाडा करावा. मात्र महाराजांचे आणि सरदारांचे सर्व काम अत्यंत सावधपणे, शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध चालूच होते.खान महाबळेश्वरपर्यंत येऊन दाखल झाला होता. आकांक्षांना पंख विजेचे. अफझलखानाशी कसा प्रसंग घडणार आहे,याची कल्पना कुणालाच करता येत नव्हती.पण जो काही ‘प्रसंग' होणार आहे त्यात काहीही घडो; विजय,पराजय वा मृत्यू ,तरीही कोणीही हाती घेतलेलं स्वराज्याचं काम थांबवू नये,हाच महाराजांचा आपल्या जिवलगांना कळकळीचा आदेश होता. त्याप्रमाणे ‘प्रसंगा' नंतरच्या साऱ्या योजना महाराजांनी आधीच निश्चित केलेल्या होत्या.महाराजांचेच शब्द आहेत, आम्हांस काही दगाफटका झाला तरी नेताजी पालकरांचे हाताखाली तुम्ही सर्व झुंजत राहा. गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला असंच सांगितलं आहे नाही ? कर्मण्ये वाधिकारस्ते! दि. १० नोव्हेंबर १६५९, गुरुवार या दिवशी तो 'प्रसंग‘ घडणार होता.नेमका कसा?ते विधात्यालाच माहीत.पण स्वराज्याचा राजा आणि प्रत्येक सैनिक ठरल्याप्रमाणे आपापल्या जबाबदारीत गर्क होता.या दिवशी पहाटेपर्यंत सर्व सरदार आणि मावळे आपापल्या ठरलेल्या मोर्चावरती टपून बसले होते. महाराजांनी यथासांग श्रींची पूजा केली.कुलोपाध्याय प्रभाकर भट्ट राजोपाध्ये यांनी पूजामंत्र म्हटले. महाराजांनी पूजा केली? होय पण, संपूर्ण योजना दक्षतापूर्वक आखूनरेखून सिद्ध केल्यानंतर ते पूजेस बसले होते.एखादा विद्याथीर् पूर्ण अभ्यास केल्यानंतर वडीलधाऱ्यांचा नमस्कारपूर्वक आशीर्वाद घेतो तसे.म्हणजेच महाराज तपश्चर्या करणारे होते.नवस करणारे नव्हते.नवस करणारे लोक देवाशी ‘कॉन्ट्रॅक्ट' करतात.माझं अमुक काम होऊ दे,म्हणजे देवा मी तुझ्याकरता तमुक करीन. अन् अजूनपर्यंत तरी शिवाजी महाराजांबद्दलच्या ऐतिहासिक विश्वसनीय कागदपत्रांत कोणत्याही कामाकरता किंवा हेतूकरता महाराजांनी कोणत्याही देवदेवतेला नवस केल्याची एकही नोंद सापडलेली नाही. ते नवसबाज नव्हते. दुपार झाली.महाराज खानाच्या भेटीसाठी निघाले.जिवा महाला, सकपाळ,संभाजी कावजी कोंढाळकर,संभाजी करवर , सिद्धी इब्राहीम,येसाजी कंक वगैरे दहा जिवलग महाराजांचे सांगाती होते.तेच ठरले होते.तेच येणार होते.पण बालेकिल्ल्यावरून उतरताना गडाच्या खालच्या परिसरात जे मावळी सैन्य ठेवले होते, त्यांनी महाराजांना बालेकिल्ल्याच्या पायऱ्या उतरून येताना पाहिलेच.या मावळ्यांचा किल्लेदार होता गोरखोजी काकडे.हे सारेच मावळे महाराजांना पाहून भारावले आणि त्यांना गराडा घालून म्हणू लागले, महाराज ,तिथे (खानाचे भेटीचे जागी) धोका आहे. आम्हाला तुमच्या सांगाती घ्या. ठरलेल्या योजना जशाच्या तशाच पार पाडल्या पाहिजेत हा महाराजांचा कटाक्ष होता. कोवळ्या मायेच्या पोटी डाव बिघडणं योग्य नव्हतं.महाराज तरीही न रागावता त्यांना मायेने म्हणाले,दादांनो,जे ठरले तेच येतील. आणि महाराज ठरल्याप्रमाणेच भेटीच्या जागी शामियान्यापाशी आले.सर्वबाबतीत महाराज अतिशय सावध होते,दक्ष होते. शामियान्याच्या दाराशी महाराज पोहोचले.खानाने तंबूच्या बाहेर न येताच आतच महाराजांना म्हटले , तू अपनी हिम्मत बहादुरीकी शेखी बधारता है!बेआदब से बुरी राहपर क्यूं चलता हैं?मेरा मातहत बन जा!अपनी सारी शेखी छोडकर इस अफझलखानको गले लगाओ! आणि खानाने महाराजांना मिठी मारली. अन् क्षणातच त्याने महाराजांचे मस्तक आपल्या डाव्या बगलेत जोरात डाव्या हाताने करकचले.अन् आपली कट्यार काढून महाराजांच्या कुशीवर तडाखून घाव घातला.तो घाव नुसताच खरखरला.कारीगार झाला नाही. कारण महाराजांच्या अंगात पोलादी चिलखत होते.त्याच्या हे लक्षात आले असावे.कारण त्याने लगेच दुसरा घाव घालण्याकरता कट्यार उगारली अन् तो घाव घालणार ,एवढ्यात महाराजांनी आपल्या डाव्या बाहीतील बिचवा खानाच्या पोटात खुपसला. किंकाळी फुटली.दग्याने महाराजांचा घात करावयास आलेला खान स्वत:च गारद झाला. जर महाराज प्रत्येक निमिषाला सावध राहिले नसते,तर तेच गारद झाले असते.हा साराच प्रसंग आता जगाला तपशीलवार माहीत आहे.या शामियान्यातील ती भेट म्हणजे या प्रतापगड प्रकरणाचा सूर्यबिंबाप्रमाणे केंदबिंदू आहे. पण सूर्यबिंबाचे ते किरण जसे दूरवर पसरलेले असतात,तसे या प्रकरणातील महाराजांच्या अलौकिक नेतृत्त्वाचे किरण दूरवर पसरलेले होते.त्याचा अभ्यास युवकांनी बारकाईने केला पाहिजे. महाराज गडावरून खानाच्या भेटीसाठी उतरले तेव्हा,देवाला नमस्कार करून आणि तीर्थ घेऊन निघाले.त्याचवेळी वडीलधाऱ्या,स्वराज्यसेवकांचा अतिशय आस्थापूर्वक सल्ला आणि निरोप घेऊन ते निघाले. कुलोपाध्यायाला त्यांनी आदरपूर्वक वंदन केले. पण तंबूतील प्रत्यक्ष भेटीच्या त्या प्रसंगानंतर काही क्षणात खानाबरोबर आलेल्या त्याच्या वकिलाने,म्हणजेच कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने खानाची तलवार उचलली आणि महाराजांच्यावर तो घाव घालण्यासाठी धावला.महाराज निमिषभरही बेसावध नव्हते. त्यांनी क्षणात त्या वकिलाचा घाव अडविला.महाराजांनी त्याला चांगल्या शब्दांत कळकळीने बोलून घाव घालण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. खूप सांगितले.तरीही त्याने महाराजांवर तीनवेळा लागोपाठ घाव घातले.ते त्यांनी अडविले , उडवले.इतके सांगूनही कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वकील ऐकत नाही,असं पाहिल्यावर महाराजांच्या भवानीचा सपकन फटकारा फिरला.अन् कुलकणीर् वकील ठार झाला.पाहिलंत ? गडावरून निघताना महाराजांनी कुलोपाध्याय प्रभाकरभट्ट राजोपाध्ये यांना सादर नमस्कार केला होता.कुलोपाध्यायांचा तो आशीर्वाद राजाला होता, स्वराज्याला होता.महाराजांचं मन आणि मस्तक नम्रतेनं वंदन करीत होतं.पण भेटीच्या जागी राजांवर म्हणजेच स्वराज्यावर घाव घालणाऱ्या कृष्णाजी भास्कराला ते ठार करीत होते. खानाच्या बाजूने आलेल्या सरदारांत महाराजांचे एक चुलते , भोसले होते.म्हणजे महाराजांचे ते काकाच.किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या युद्धात ते ठार झाले. महाराजांचा हुकूमच होता मावळ्यांना की,जे झुंजतील त्यांना मारावे.जे शरण येतील त्यांस मारो नये.भोसले काका त्यात ठार झाले.पाहिलंत ? महाराज आपल्या स्वत:च्या वकिलाला म्हणजेच पंताजी गोपीनाथ बोकील यांना आदराने 'काका' म्हणत असत.त्यांना प्रेमाने आपल्या कुटुंबातीलच मानीत असत.या प्रतापगड प्रकरणात महाराजांनी नंतर पंताजी काकांचा भरघोस सादर सप्रेम गौरव केला. महाराज आपल्या रक्ताच्या काकाला ठार मारीत होते अन् मानलेल्या काकांचा आदर करीत होते.खानाच्या वकिलाला ठार मारीत होते अन् आपल्या कुलोपाध्यायाला नमस्कार करीत होते.महाराजांचा हाच स्वराज्यधर्म होता. यालाच म्हणतात महाराष्ट्रधर्म.विंचू देव्हाऱ्यासी आला,देवपूजा , नावडे त्याला. तेथे पैजाऱ्याचे काम,अधमासी व्हावे अधम! हाच महाराजांचा धर्म होता. आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही हम लढाई करना चाहते नहीं, ऐसा बहाना बनाकर सीवाको धोका देना। या आदिलशाहच्या हुकूमाप्रमाणेच अफझलखानाने महाराजांना ठार मारण्याचा घातकी डाव केला.पण हा डाव त्याच्यावरच उलटला.महाराज अत्यंत सावध होते. अफझलखानच महाराजांच्या हातून भयंकर जखमी झाला. संभाजी कावजी कोंढाळकर या मावळी शिलेदाराने खानाचा शिरच्छेद केला.महाराजांना संपवावयास आलेला खान स्वत:च संपला. त्यास त्याचा अहंकार आणि गाफीलपणा सर्वस्वी कारणीभूत होता.खान आपल्याला निश्चित दगा करणार आहे,मारणार आहे. याच्या अगदी विश्वसनीय बातम्या प्रारंभापासूनच महाराजांना समजलेल्या होत्या.त्यामुळे ते अत्यंत सावध होते.त्यातून पुराव्यानिशी हेही सत्य आहे की , खानानेच महाराजांवर पहिला घाव घातला.अशा परिस्थितीत महाराजांनी जर बेसावध,भोळसट आणि आमच्या नेहमीच्याच भारतीय स्वभावाप्रमाणे वेंधळेपणा ठेवला असता तर? तर महाराज मारले गेले असते. जगानेच ‘हा सारा बावळटपणाचा परिणाम' म्हणून महाराजांनाच दोष दिला असता.असली भारतीय वेंधळी उदाहरणे इतिहासात काय कमी आहेत ? महाराजांच्या विचारसरणीवर आणि कृतीवर महाभारताचा, चाणक्यनीतीचा आणि योगेश्वर कृष्णनीतीचा फार मोठा परिणाम दिसून येतो.त्यांच्या दोन अन्य राजकीय घडामोडींतून हेच दिसून येते. खानाच्या फौजेची मावळ्यांनी दाणादाण उडवली.पण हत्यार टाकून शरण आलेल्या शत्रू सैनिकांना त्यांनी ठार केले नाही. कोणाचीही विटंबना केली नाही. हाल केले नाहीत.नंतर सर्वांना सोडूनच दिले.ही आमची संस्कृतीच होती.महाराजांना खानाचे प्रचंड युद्धसाहित्य , खजिना,हत्ती,घोडे वगैरे घरपोच मिळावे,तसे मिळाले. मोहीम फत्ते करून रात्री महाराज सैन्यानिशी पुढच्या मोहिमेला निघाले. ११ नोव्हेंबर १६५९च्या पहाटे,म्हणजेच खानाच्या दारुण पराभवानंंतर १५ तासांच्या आत महाराज वाईत येऊन दाखल झाले.ते आईला आणि कुटुंबियांना भेटायला प्रतापगडावरून राजगडाला गेले नाहीत.विजयदिन साजरा करण्यासाठी आणि अन्य जल्लोष गाजविण्यासाठी क्षणभरही न थांबता पुढील प्रचंड विजय मिळविण्यासाठी ते आदिलशाही मुलुखावर आणि किल्ल्यांवर तुटून पडले. आम्ही उत्सवबाजांनी आज हे लक्षात घ्यावे.अवघ्या १५ दिवसांत (दि. २५ नोव्हेंबर १६५९ ) महाराज कोल्हापुरात,नेताजी पालकर विजापुरास,दौलोजी कोकणात राजापुरास आणि इतर चार मावळी सरदार शिरवळ, सासवड,सुपे आणि पुणे या ठाण्यांवर जाऊन धडकले. शिरवळ,सुपे ही चारही ठाणी मराठ्यांनी खानाच्या वधाच्याच दिवशी (दि. १० नोव्हेंबर) काबीज केली.राजापुरास खाडीत असलेल्या आदिलशाही लढाऊ गलबतांवर दौलोजी नावाच्या मराठी सरदाराचा छापा पडला. प्रत्यक्ष महाराजांनी नांदगिरी,वसंतगड,वर्धनगड,कराड ,सदाशिवगड,भूषणगड इत्यादी शाही किल्ले काबीज केले.याच धडाक्यात पन्हाळगडासारखा अजिंक्य गड महाराजांनी २९ नोव्हेंबर रोजी घेतला.कोल्हापुरची महालक्ष्मी तीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वतंत्र झाली. अफझलखानाच्या आक्रमणाचा परिणाम काय? स्वराज्य बुडालं नाही,वाढलं. दिरंगाई,आळस, चंगळबाजी अजिबात न होऊ देता हा प्रचंड विजय मराठ्यांनी मिळविला होता.आम्ही उत्सवबाजांनी हे पुन्हा पुन्हा लक्षात घेतले पाहिजे.महाराजांचे नुसते जयजयकार आता पुरे! नेताजी पालकराला थेट विजापुरावर सोडताना महाराज त्याला आज्ञा देत होते सरनोबत, थेट विजापुरावर चालून जा. ते काबीज करा.अन् आदिलशाह बादशाहलाच ताब्यात घ्या. एवढी अफाट अन् अचूक झेप घेणारा दुसरा एखादा सेनापती वा राजा आपल्याला इतिहासात गेल्या एक हजार वर्षांत तरी सापडतोय का?महाराजांच्या या उद्योगांत केवळ झोंडशाही नव्हती,क्रौर्य नव्हतं,तर त्या पाठीमागे उदात्त,उत्कट आणि उत्तुंग स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान होते। साधुसंत म्हणजे मानवतेचे महाउपासक.महाराजांच्या या पवित्र व पुण्यकरी कार्याला सर्व साधुसंतांचा आशीर्वादच होता. कोणाही अन् कोणत्याही धर्मातील संताने महाराजांच्या निषेधाचे पत्रक काढले नाही. त्यांना आशीर्वादच दिला आदिलशाहसकट राजधानी विजापूरही ताब्यात घेण्याची महाराजांची आकांक्षा होती.तसं घडलं असतं,तर महाराष्ट्रात केवढी क्रांती झाली असती पण सपाटीच्या प्रदेशात असलेले बळकट तटबंदीचे फार मोठे विजापूर शहर अवघ्या चार-पाच हजार स्वारांच्यानीशी काबीज करणे नेताजीला जमले नाही. सतत आठ दिवस नेताजी धडका देत होता.शहराच्या तटाबुरुजांवर शाही तोफखाना होता. माणूसबळ नेताजीपाशी अगदीच तुटपूंजे ठरत होते.अखेर त्याने माघार घेतली आणि तो महाराजांना सामील होण्यासाठी पन्हाळगडाकडे निघून गेला. महाराजांचा स्वतंत्र तोफखाना नव्हता.धावत्या मराठी सैन्याबरोबर तोफखाना नेल्याचे एकही उदाहरण शिवचरित्रात नाही.कारण तोफाच नाहीत. मराठी किल्ल्यांवर तोफा असायच्या तेवढ्या होत्या.अशा या गरीब मराठी स्वराज्याने केवळ माणसांच्या आणि घोड्यांच्या जीवावर हे असे अवघड विजय मिळविले. युद्धसाधने कमी पैसा कमी, माणसे कमी,सारेच काही तोकडे आणि मुठभर. महत्त्वाकांक्षा मात्र एवढी अचाट होती की,त्यापुढे गगन ठेंगणे पडत होते. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग! स्वराज्याचा विस्तार वाई प्रतापगडापासून थेट पन्हाळा विशाळगडापर्यंत जाऊन पोहोचला.शत्रूच्या हातून घडणाऱ्या चुकांचा आणि अभ्यासशून्य कृतींचा महाराज नेमका फायदा उठवीत असत. महाराजांची लष्करी प्रतिभा, म्हणजेच गनिमी काव्यातील काचकता विलक्षण चपळ होती. हे मराठी कोल्हे कोणचा डाव टाकतील अन् केव्हा टाकतील याचा अंदाजही शाही सेनापतींना येत नव्हता. प्रतापगडच्या अफझलखान मोहिमेत खानाला निश्चित यश मिळणार आहे आणि मराठी राज्यच संपणार आहे असे अंदाज नव्हे खात्रीच साऱ्यांना वाटत होती. त्यात इंग्रज आणि पोर्तुगीजही होते. खुद्द विजापूरच्या आदिलशाहला तर विजयाबद्दल शंकाच उरली नव्हती.जिवंत किंवा मेलेला सीवा विजापुरात केव्हा दाखल होतो याची तो वाट पाहत होता. झाले उलटेच,पराभव! शिवाजीची चढाई थेट पन्हाळ्यापर्यंत झालेली पाहून विजापूर थक्क झाले होते. त्यांनाही थांबून चालणार नव्हते. आदिलशाहने घाईघाईने दुसरी चढाई पन्हाळ्याच्या रोखाने करण्याचा मनसुबा केला आणि रुस्तुमेजमा उर्फ छोटा रणदुल्लाखान आणि त्याच्या हाताखाली फाझलखान यांना मोठ्या फौजेनीशी पन्हाळ्याच्या रोखाने पाठविले.ही फौज नेमकी किती होती हे समजत नाही.पण पाच हजारांहून नक्कीच अधिक होती. ही शाही फौज येत आहे याच्या खबरा पन्हाळ्यावर महाराजांना आणि नेताजी पालकरास समजल्या.ही फौज दि.२८ डिसेंबर १६५९ या दिवशी (म्हणजे अफझल वधाच्यानंतर अवघ्या ४८ दिवसांनी) कोल्हापुरानजिक पंचगंगेच्या परिसरात येऊन पोहोचली. महाराज आणि नेताजी हेही वादळाच्या वेगाने पन्हाळ्याहून या फौजेवर चालून आले.आधीच्या अफझल पराभावाने सारा आत्मविश्वास गमावून बसलेली ही फौज धीर धरूच शकली नाही. महाराज या फौजेवर तुटून पडले. शाही फौजेत घबराटच उडाली. पहिल्यांदा पळाला फाझलखान. मग बाकीच्या फौजेलाही पळण्याचा धीर आला.या लढाईला कोल्हापूरची लढाई असे म्हणतात.पण हिला लढाईच म्हणता येईल का?फारतर झटापट किंवा चकमक म्हणावे लागेल.पूर्ण पराभूत होऊन (न लढताच) शाही फौज सुसाट पळाली.महाराज तिचा पाठलाग करीत होते.पण त्यांनी पाठलागही थांबविला अन् नजीकच्या मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला वेढा घातला.किल्ला खूप मोठा होता.भोवती खंदक होता.पुन्हा इथं प्रश्न आलाच.मराठी सैन्याला तोफखाना नव्हता.अन्य हत्यारांनी जेवढे झुंजता येईल तेवढे प्रयत्न सुरू होते.महाराज स्वत: उभे होते. इथे एक गोष्ट लक्षात येते की,वेढा घालून दीर्घकाळ युद्ध करणे मराठी फौजेला परवडणारे नव्हते.कधीच परवडले नाही. संपूर्ण शिवकाळात भुईकोट ठाणी काबीज करण्यासाठी महाराजांनी फक्त दोनदाच वेढे घातले.हा पहिला मिरजेचा वेढा आणि दुसरा इ.स.१६७७ मध्ये तमिळनाडूमधील वेल्लोरचा वेढा. पहिला जमला नाही,दुसरा म्हणजे वेल्लोरचा जमला.पण तो भुईकोट जिंकायला १४ महिने लागले. असं नेहमीच परवडणारं नव्हतं. कमी माणूसबळ आणि कमी साहित्य यांमुळे सपाटीच्या प्रदेशातील भुईकोट जिंकणं फार खर्चाचं,वेळ खाणारं आणि समजा जिंकलंच तरी या भुईकोटांवर मोठीमोठी सैन्यं ठेवणं अवघड होतं गरिबी! काय करणार ? म्हणून व्यवहार दक्षतेने महाराजांनी भौगोलिक विचार, नव्हे अभ्यास करून स्वराज्याचा विस्तार सह्याद्रीच्या आणि समुद्राच्या आश्रयाने दक्षिणोत्तर केला.तोच यशस्वी ठरला. कोकणातील परकीय इंग्रजी , फिरंगी आणि हबशी शत्रूंना कायमचे उखडून काढावे याकरिता त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली.थोडेफार यशही मिळविले.पण भरपूर साधनांच्या आणि माणूसबळाच्या कमतरतेमुळे त्यांना यशही कमी मिळाले.पण प्रयत्न कधीही थांबविले नाहीत.आमच्याच माणसांनी जर महाराजांना मदत केली असती,तर मराठी सत्ता उत्तरेकडे केवळ तापीपर्यंततरच काय पण दिल्लीपर्यंत पोहोचली असती.महाराजांना सामील होऊन मदत करण्याकरता फक्त एकच बुंदेला राजपूत छत्रसाल उभा राहिला.बाकीसारे निरनिराळ्या बादशाहाचं इमानेइतबारे गुलामगिरीच करीत राहिले. एक गोष्ट आत्ताच सांगण्यासारखी आहे.महाराष्ट्राची मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. पोर्तुगीज आणि इंग्लिश राजघराण्यातील एक लग्नसंबंधात पोर्तुगीजांनी इंग्लंडच्या राजाला आमची मुंबई हुंडा म्हणून द्यायचे ठरविले. करारही झाला.पण प्रत्यक्षात मुंबईत असलेले पोर्तुगीज अधिकारी मुंबईचा ताबा इंग्लिशांना देण्यास टाळाटाळ, चालढकल करू लागले. पोर्तुगीजांना खरं म्हणजे मुंबई सोडायची नव्हती.(पुढे इ. स. १९६१ मध्ये गोवा तरी कुठं सोडायची इच्छा होती!) त्यानंतर मिळेल तेवढा भारत गिळायची भूक लागली होती.आम्ही मंडळी उदार.कोणाकोणाला आमची भूक लागली आहे,हे टिपण्यासाठी आम्ही कायमचेच टपून बसलेलो होतो.अजूनही! पोर्तुगीज मुंबईचा ताबा सोडत नव्हते.यावेळी केवळ व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने इंग्रजांची मंडळी सुरत,कलकत्ता,मद्रास इत्यादी ठिकाणी वखारी घालून बसली होती.सुरतेला जॉर्ज ऑक्सिंडेन नावाचा इंग्रज वखारीचा प्रमुख होता. आता पाहा हं काय झालं ते! मुंबईतल्या आमच्याच अनेक पुढाऱ्यांनी सुरतेला इंग्रजी जॉर्जकडे पत्रे पाठविली. किंबहुना एकदा डेप्युटेशनच नेले की,हे इंग्रजांना,तुम्ही लौकर मुंबईचा ताबा घ्या.आम्ही तुम्हांस आमच्याकडून शक्य ती मदत करू. पाहिलंत? आमच्या मंडळींना सुरतेतले इंग्रज व्यापारी जवळचे वाटतात.मायबाप वाटतात.त्यांना पोर्तुगीजांचे जागी इंग्रजांचे राज्य असावे असे वाटते.पण शेजारीच कल्याण,भिवंडी, अलिबागपासून कुडाळ,ओरसपर्यंत स्वराज्य थाटून बसलेला, अफझलखानासारख्या कर्दनकाळाचा फन्ना उडविणारा, घाटावर पन्हाळ्यापर्यंतच्या मुलुखाचं स्वराज्य करणारा आपलाच शिवाजीराजा दिसत नाही.मुंबई घ्या, मुंबई आपली आहे,आम्ही तुम्हाला मदत करतो असं कुणी म्हणत नाही.आमची ही जन्मजात खोड आम्ही आम्हालाच परके समजतो. अजगरांचे विळखे. शिवाजी राजांनी अफझलखानाचाच केवळ नव्हे, तर अनेक ठिकाणी आदिलशाही सरदारांचा तडाखून पराभव केल्याच्या बातम्या दिल्लीस औरंगजेबाला समजल्या.खरं म्हणजे औरंगजेबानं अफझलखानाच्या मोहिमेच्या काळातच शिवाजीराजांविरुद्ध आपली फौज पाठवायला हवी होती.जर त्याने तशी फौज पाठविली असती,तर महाराजांना हे दुहेरी आक्रमण केवढं कठीण गेलं असतं.आदिलशाहने तशी विनंती औरंगजेबास केलीही होती की,शिवाजी हे दुखणं तुमचे आमचे आणि आपल्या धर्माचेही आहे.म्हणून तुम्ही आम्हांस मदत करा.निदान याचवेळी तुम्हीही शिवाजीविरुद्ध मोहिम काढा.पण औरंगजेबाने कोणाच्यातरी पराभवाची वाट पाहिली.अन् मग अफझल-पराभवानंतर त्याने शाहिस्तेखानाच्याबरोबर ७८ हजार स्वारांची फौज पाठविली. यात पायदळ आणि तोफखाना वेगळा होताच.हे प्रचंड दळवादळ दख्खनवरती निघाले.त्याच्या दिमतीस या लष्करात ५९ सरदार होते.त्यात एक बाईपण होती. तिचे नाव रायबाघन.या प्रचंड फौजेचा रोजचा खर्च केवढा असेल! याचवेळी सिद्दी जोहर सलाबतखान या कर्तबगार सरदारांस विजापुराहून आदिलशाहने पन्हाळ्याकडे रवाना केले.त्याची फौज नेमकी किती होती ते माहीत नाही.पण अर्धा लाख असावी.दिल्लीची मोगली फौज आणि सिद्दीची विजापुरी फौज एकाच वेळेला स्वराज्यावर चाल करून आल्या. म्हणजेच जवळजवळ दीड ते पावणेदोन लाख सैन्याच्या आणि भल्यामोठ्या तोफखान्याच्या विरुद्ध स्वराज्याला तोंड देण्याची वेळ आली.एवढी ताकद स्वराज्यापाशी होती का ? नव्हती.पण हिम्मत मात्र या दोन्ही शत्रूंपेक्षा अचाट होती.महाराज एकाचवेळी दोन शत्रूंच्या विरुद्ध कधीही आघाड्या उघडत नसत. पण दोन शत्रूच चालून आले तर ? तर हत्याराने आणि बुद्धीने तोंड द्यायचे हा निश्चय. एकूण मराठी सैन्य महाराजांपाशी किती असावे?नक्की आकडा सांगता येत नाही.पण ते अंदाजे फारफार तर २० हजारापर्यंत असावे.२० हजार! विरुद्ध दीड लाख! इथेच स्वराज्याच्या धैर्याची आणि निष्ठेची परीक्षा लागते. त्यासाठीच राष्ट्रीय चारित्र्य जबरदस्त असावे लागते.ते चारित्र्य मराठ्यांच्यात निश्चितच होते.या दुहेरी आक्रमणांचा शेवटी निकाल काय लागला?दोघांचाही पराभव,स्वराज्याचा विजय. शत्रूच्या तोफांचा,हत्तींचा, खजिन्यांचा आणि लांबलचक पदव्या मिरविणाऱ्या सेनापतींचाही पूर्ण पराभव.या विलक्षण शिवतंत्राचा आणि मंत्राचा आम्ही आजही विचार केला पाहिजे.नुसत्या संख्याबळाचा काय उपयोग? ते बळ नव्हेच.ती केवळ गर्दी.पण गुणवत्तेनी श्रीमंत असलेल्या मूठभर निष्ठावंतांची फौज हाताशी असेल,तर गेंड्यांच्या आणि रानडुकरांच्या झुंडीही हुलकावण्या देऊन खड्ड्यात पाडता येतात. शाहिस्तेखानाने एकूण आपल्या सव्वा लाख फौजेनिशी स्वराज्यावर चाल केली.फौज अफाट पण गती गोगलगायीची. सासवडहून पुण्याला तो दि.१मे १६६० रोजी निघाला.आणि पुण्यास पोहोचला ९ मे १६६० ला.हे अंतर फक्त नऊ कोसांचे. म्हणजे ३० किलोमीटरचे. गोगलगायीपेक्षा खानाचा वेग नक्कीच जास्त होता! त्या प्रचंड फौजेमुळे सपाटीवर असलेले अन् संरक्षक तटबंदी नसलेले पुणे त्याला चटकन मिळाले. ही मात्र गोष्ट खरी. शाहिस्तेखानाला आता मोठी काळजी कोणाचीच नव्हती. कारण शिवाजीराजे याच काळात पन्हाळ्यात अडकले होते.भोवती सिद्दी जोहरचा अजगरी विळखा पडला होता.पण त्याला मराठी चुणूक समजलीच.तो शिरवळहून शिवापुराकडे आणि शिवापुराहून गराडखिंडीने सासवडकडे येत असता,मराठ्यांच्या,म्हणजेच यावेळी राजगडावर असलेल्या जिजाऊसाहेबांच्या लहानशा म्हणजेच सुमारे पाचशे मावळ्यांच्या टोळीने खानाच्या पिछाडीवर असा जबरदस्त हल्ला केला की,आघाडीवर चाललेल्या शाहिस्तेखानाला हे कळायलाही फार वेळ लागला.गराडे ते सासवड हे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे.मराठ्यांनी या एवढ्याशा अंतरामध्येही खानाची हैराणगत केली.(एप्रिल शेवटचा आठवडा १६६० ) खान पुण्यास पोहोचला.त्याने महाराजांच्या लाल महालातच मुक्काम टाकला.मुठा नदीच्या दक्षिण तीरावर त्याचे प्रचंड सैन्य तंबू ठोकून पसरले.त्याच्या सैन्यात त्याचे खास दिमतीचे हत्ती होते पाचशे! इतर हत्ती वेगळे. खान आपला जनानखाना घेऊन आला होता. हत्ती होते आणि भलामोठा अवजड तोफखानाही होता.आता सांगा?मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या वादळी छापेबाजीला खान कसं तोंड देणार होता?या मोगली (आणि विजापुरी) सरदारांना गनिमी कावा हे युद्धतंत्रच उमगले नाही. या आमच्या डोंगरी दऱ्याकपाऱ्यांत त्यांच्या हत्तींचा अन् तोफांचा काय उपयोग ? शिवाय गळ्यात जनानखान्याचे लोढणं. जाता जाता सांगतो,महाराजांच्या या अचानक छापे घालण्याच्या युद्धतंत्रात महाराजांनी हत्तींचा कधीही वापर केला नाही.धावता तोफखाना त्यांनी कधीच ठेवला नाही.अन् लढाईवर जाताना कोणीही,अगदी महाराजांनीसुद्धा कधीही स्त्रियांना बरोबर घेतलं नाही.मराठ्यांच्या गनिमी युद्धतंत्राचा जवळजवळ ४० वर्ष सतत अनुभव आल्यानंतरसुद्धा शेवटी प्रत्यक्ष औरंगजेबही संभाजी महाराजांच्या विरुद्ध महाराष्ट्रावर आला,तेव्हा त्याच्याबरोबर आणि जाफरखान वजीराच्याबरोबर,किंबहुना सर्वच सरदारांच्याबरोबर जंगी जनानखाना होता.कधीकधी असं वाटतं औरंगजेबी फौजेचा पराभव त्यांच्याच हत्ती,तोफा आणि जनानखान्यानेच केला. शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती. ९ मे १६६० रोजी शाहिस्तेखान पुण्यात आला.महाराज याच काळात म्हणजे ( दि.५ मार्च ते १२ जुलै १६६० ) पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले होते.वेढा जबरदस्त होता.वेढा घालणाऱ्या सिद्दी जौहरची सेनापती व योद्धा या नात्यांनी योग्यता निविर्वाद फार मोठी होती.सिद्दी जौहर आणि शाहिस्तेखान या दोन्हीही बड्या सेनापतीत फरक मात्र फार मोठा होता.शाहिस्तेखान हा अभ्यासशून्य होता.जौहर हा प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणारा होता.विशेषत: मराठ्यांच्या गनिमी युद्धतंत्राची त्याला खूप मोठी जाण होती.म्हणूनच तो अतिशय सावधपणे पन्हाळ्याच्या वेढ्यात उतरला होता. त्याच्या दैनंदिन युद्धनेतृत्त्वात ठिसाळपणा, योजनेत विस्कळीतपणा,शाही सैन्यांत नेहमीच आढळून येणारा ऐषाराम,रणक्षेत्राविषयी अनभिज्ञता,अनुशासनाचा अभाव असा कोणताही प्रकार कटाक्षाने तो होऊ देत नव्हता.त्याची शिस्त उत्तम होती.या सर्वच बाबतीत त्याची प्रत्येक व्यवहारावर करडी नजर होती. त्याच्याबरोबर अफझलपुत्र फाझल महम्मद हा बरोबरीच्या नात्याने या लष्करात होता.पण संपूर्ण लष्करी कारभार तो स्वत: दक्षतेने पाहात होता.त्याच्या हाताखाली काशी तिमाजी देशपांडे हा कारभारी होता.नेमकी शाहिस्तेखानची युद्धनेता या नात्याने अगदी उलटी प्रतिमा होती. एकाचवेळी पुण्यात शाहिस्तेखान आणि पन्हाळ्याखाली सिद्दी जौहर हे अफाट सैन्यानिशी स्वराज्याबरोबर झुंजायला उतरले होते। येथे एक चित्र स्पष्ट दिसते. शाहिस्तेखानच्या समोर राजगडावरून नेतृत्त्व करीत होत्या जिजाबाई.त्यांनी शाहिस्तेखान स्वराज्यावर आल्यापासून ते शिवाजीमहाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटेपर्यंत,म्हणजे सुमारे सहा महिने राजगडावरून शाहिस्तेखानाच्या आघाडीवर अगदी समर्थपणे तोंड दिले आहे. या खानाने सुपे,शिरवळ,पुरंदर, सासवड,गराडखिंड या भागात प्रारंभी (मार्च ते मे १६६० ) हा स्वराज्यातील उत्तर आघाडीवरचा भाग जिंकून घेण्याकरता सुमारे तीस हजार सैन्यानिशी तीन महिने खूप मोठा गहजब करून पाहिला.त्याला अजिबात यश आले नाही. याचे श्रेय नेतृत्त्वाच्या दृष्टीने जिजाऊसाहेबांनाच द्यावे लागले.हे श्रेय त्या काळात याच भागात मोगलांविरुद्ध छापे घालीत असलेल्या नेताजी पालकरांस नाही का?आहे ना! नक्कीच आहे. नेताजीने आपली कामगिरी खरंच चांगली केली.पण तो या काळात सतत धावत्या लढाया (छापेबाजी) करतो आहे.त्यात तो खेड-मंचरजवळ स्वत: जखमीही झाला.तरीही तो झुंजतो आहे. पण सुपे,शिरवळ,पुरंदर,सासवड इत्यादी स्थिर ठाणी थोड्याशा बळानिशी शत्रूच्या अफाट बळाला यशस्वी तोंड देत या काळात मावळ्यांनी जी अतिशय अवघड कामगिरी केली आहे,त्यामागे नेतृत्त्व आहे.राजगडावर असलेल्या जिजाऊसाहेबांचे.याच काळातील मावळच्या मराठी देशमुखांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. ते पत्र शिवाजीराजांच्या नावाने गेले असले,तरी ते नक्कीच राजगडावरून,म्हणजेच जिजाऊसाहेबांच्या आज्ञेने गेलेले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, ( आपल्या) मुलखांत मोगलांची धावणी सुरू जाहली आहे.तरी तुम्ही शिकस्तीने रयतेस सांभाळावे. मोगलांचे बळ फारच मोठे होते. त्यामुळे लुटालुट,जाळपोळ, वेठबिगारी,अत्याचार,मंदिरांना उपदव इत्यादी प्रकार सतत चालू होते.या सर्व मोगली आघातांचा उल्लेख पुढे शिवाजीमहाराजांनी सुरतेच्या सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात केलेला आहे. एकूणच स्वराज्य किती भयंकर कठीण अवस्थेतून जात होते याची कल्पना येते. या काळात स्वराज्याशी विश्वासघात करून शत्रूला जाऊन कोणी मावळे सरदार फितुर झाल्याची उदाहरणे आहेत का ? होय! फक्त उदाहरणे आहेत.पहिले आहे बाबाजीराम होनप देशपांडे याचे,आणि दुसरे संभाजी कावजी याचे. चरकात सापडलेल्या उसाच्या कांड्याप्रमाणे सारे मराठी संसार पिळवटून निघत होते.त्यांत एखाददुसरे उदाहरण असे निघाले तर दु:खद असले तरी स्वाभाविक आहे.बाकीचे सारे स्वराज्य सह्यादीच्या शिळांसारखे घाव सोसीत अभेद्य राहिले.म्हणूनच अखेरचे चित्र असेच दिसले की, शाहिस्तेखानचाही पण पराभव आणि सिद्दी जौहरचाही पराभवच.कारण शत्रूशी झुंजणाऱ्या कडव्या शिवा काशीदांची,बाजी घोलपांची, बाजी प्रभूंची,वाघोजी तुप्यांची आणि फिरंगोजी नरसाळ्यांची प्रचंड स्वराज्यसेना महाराजांच्या आणि जिजाऊसाहेबांच्या आज्ञेची वाट बघतच तत्पर होती.जौहर आणि शाहिस्ता यांच्या दुहेरी आक्रमणात दिसून आली. मराठ्यांच्या सेनेची आणि संसारांचीही जिद्द,महत्त्वाकांक्षा, निष्ठा,शिवपेम आणि घोरपडीसारखा चिवटपणा, तीनशे वर्ष सतत आधीच्या लाचार गुलामगिरीनंतर हे सर्व राष्ट्रीय चारित्र्याचे सद्गुण राजापुरच्या गंगेसारखे उफाळून आले. ही शिवगंगा बुद्धीमान, प्रतिभावात, कल्पक आणि तरीही अहंकाररहित आणि उपभोगशून्य युवा शिवाजीराजाच्या मस्तकातून खळाळत होती. म्हणूनच मराठ्यांची पोरं पाळण्यात असल्यापासूनच पराक्रम गाजविण्यासाठी हसतहसत मुठी वळत होती. आपण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश जनतेने आणि त्यांच्या पंतप्रधान चचिर्लने अनेक आघाड्यांवर जर्मनी अन् जपानसारख्या शत्रूंचा फन्ना उडविला. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो. ते कौतुक योग्यही आहे. पण अशाच प्रचंड आक्रमणातून हिंदवी स्वराज्य प्रतिपंच्चंदलेखे सांभाळीत व फुलवित आणि वाढवित नेणाऱ्या आमच्या मावळ्यांना आम्ही विसरता कामा नये. अवघे मराठेच! तलहातावरी सीर घेऊनी झुंजले. शाहिस्तेखान पुण्यात आला (दि.९ मे १६६० ) खानाने महाराष्ट्राच्या सरहद्दीवरून, म्हणजेच बुऱ्हाणपुरापासून कूच केले आणि तो पुण्यास आला. शिरवळ,सुपे,बारामती,सासवड ही अगदी छोटी भुईकोट ठाणी त्याला तात्पुरती मिळाली. पुण्यात येऊन पोहोचायला त्याला साडेचार महिने लागले.एखाद्या मोठ्या शहराप्रमाणे असलेली त्याची छावणी हलत होती.चालत होती.पण पळत नव्हती. छावणीचा खर्च डोंगराएवढा होता.त्यामानाने मिळकत नगण्य होती.तीही शाश्वत नव्हती. आज मिळत होती अन् उद्या पुन्हा मराठे ती काबीज करत होते.या साडेचार महिन्यांच्या काळात फक्त पुणं तेवढं नाव घेण्यासारखं ( फक्त नावच घेण्यासारखं!) खानाला मिळालं.अन् ते त्याच्या हातात टिकलं.पण बाकी खर्च परातभर आणि प्राप्ती दोन बोटाच्या चिमटीभर असा हा शाही कारभार होता.काहीतरी औरंगजेबाला करून दाखविलं पाहिजे म्हणूनच की काय त्याने पुण्यापासून नऊ कोसांवर (३० कि.मी.) असलेला चाकणचा भुईकोट जिंकायचं ठरविलं. चाकणचा भुईकोट फिरंगोजी नरसाळा या नावाच्या शिवकिल्लेदाराच्या ताब्यात होता. चाकण कोटाचे क्षेत्रफळ कसंबसं अडीच एकरांचं होतं.किल्ल्यात कसेबसे तीन-सव्वातीनशे मावळे होते.हे एवढं टीचभर आकाराचं ठाणं जिंकायचा खानानं बेत केला. २१ हजार फौज आणि मोठा तोफखाना घेऊन खान पुण्याहून चाकणला पोहोचला. तो दिवस होता २१ जून १६६० या चार भिंताडांच्या चाकण कोटावर मोगली हल्ले सुरू झाली. अहोरात्र.एक महिना उलटला. किल्ल्याचा टवकाही उडू शकला नाही. इथे एक गोष्ट लक्षात येते की , चाकणला खानाचा वेढा पडला. कोणत्याही बाजूने चाकणला मदत करणे जिजाऊसाहेबांस (मुक्काम राजगड) आणि नेताजी पालकरांसही (मुक्काम घोड्यावर) अशक्य होते.सर्व बाजूंनी चाकणचा संपर्क तुटला होता.चाकण एकांगी पडला होता.२१ हजार मोगली फौजेच्या आणि तोफांच्या गराड्यात, अंगठ्याच्या नखाएवढा चाकण सर्व मारा सहन करीत झुंजत होता.अखेर खानानं आपल्या छावणीपासून भुईकोटाच्या ईशान्य बुरुजापर्यंत जमिनीतून बोगदा खणला आणि किल्ल्यास एकाचवेळी खूप मोठा सुरुंग लावला. हे भुईखालचे भयंकर संकट किल्ल्यातील किल्लेदारास समजणे अशक्यच होते. पण दि. १४ ऑगस्ट १६६० च्या मध्यरात्री अंदाजे (दोन अडीच वाजता) हा जमिनीखालून ठासलेला सुरुंग खानाने पेटविला. प्रचंड स्फोट झाला. ईशान्यबुरुज उडाला.खिंडार पडले.खानाची फौज कोटात घुसली.चाकणकोट खानाने काबीज केला.वेढा घातल्यापासून ५४ दिवसांनी खानाला यश मिळाले. त्याचेही कौतुक वाटतेच पण काम,काळ,वेग,खर्च आणि फौज यांच्या पंचराशीकांत हे शिवराज्य जिंकायला खानाला किती तपे लागणार होती! या त्याच्या तपश्ययेर्चा भंग करण्यासाठी अनेक मोहांच्या आणि बेमालूम चुकांच्या अप्सरा त्याच्याभोवती नाचत होत्याच. तिकडे पन्हाळ्याच्या वेढ्यातूनही महाराज धो-धो पावसातून विशाळगडकडे पसार झाले. सिद्दी जौहरसारखा अतिदक्ष शिस्तीचा,कठोर निष्ठेचा,इमानी आणि कडव्या कौशल्याचा सेनापती फसला.हे त्याचे अपयश एवढे असह्य आणि अपमानकारक होते की,त्याने अखेर विष पिऊन आत्महत्या केली. महाराज पन्हाळ्याहून विशाळगडकडे सटकले तेव्हा त्यांच्याबरोबर अवघे सहाशे मावळे होते.अर्धा लाख शत्रू फौजेच्या अजगरी विळख्यातून राजे गेले.त्यांचा पाठलाग सिद्दी मसूद (जौहरचा जावई) करीत होता.त्यानेही महाराजांना गाठायची शिकस्त केली.पण आपल्या छातीचा बांध करून उभ्या असलेल्या बाजीप्रभू देशपांड्यांनी आणि सहाशे मावळ्यांनी राजा वाचविला. बाजीप्रभूंच्या बरोबर त्यांचा भाऊ फुलाजीप्रभू हाही झुंजत होता. महाराज विशाळ्यावर पोहोचले. राजा वाचला.राज्य वाचलं.झेंडा वाचला.बाजीप्रभू,फुलाजीप्रभू आणि काहीशे मावळे ठार झाले. (दि. १३ जुलै १६६० ) शिवा काशीद या नावाचा सैनिक महाराजांना वाचविण्यासाठी महाराजांचं सोंग घेऊन पालखीत बसला होता.तो सिद्दीला सापडला.हसत हसत हा शिवान्हावी सिद्दीच्या हत्याराखाली मरून गेला. राजे वाचले.राज्य वाचले. काय हो ही माणसं! वेडी! ठार ठार वेडी! हसत हसत मेली. सख्ख्ये भाऊ मेले.किती साधी माणसं,किती सामान्य माणसं. होय! हाच शिवकालाचा वेगळेपणा आहे.सामान्य माणसांनी असामान्य इतिहास घडविला.महान राष्ट्र घडविले.हा कोण? न्हावी! हा कोण? भंडारी! हा कोण? कुंभार! हा कोण? माळी! हा कोण? धनगर! हा कोण? रामोशी! हा कोण? महार! हा कोण?… हा कोण?….. हा कोण…. हे सारे मराठे! जो स्वराज्याकरता जगतो अन् मरतो, तो मराठाच.जो स्वराज्याला विरोध करतो, तो मोगल.सांगा बाळांनो तुम्ही शिवाजीराजांचे मराठे आहात की,औरंगजेबाचे मोगल ? तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे लढले.तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत ते झुंजतच होते. पन्हाळ्यावरून निसटल्यापासून पावनखिंडीत पोहोचेपर्यंत ते सतत झपझप चालत होते.भर पावसांत.गडद अंधारात. पन्हाळ्याहून निघाले दि. १२ जुलैच्या रात्री सुमारे १० वाजता. अन् पावनखिंडीत पोहोचले १३ जुलैच्या दुपारी सुमारे एक वाजता म्हणजे सतत १५ तासांची धाव चालू होती त्यांची. तिथेच लढाई सुरू झाली.ती रात्री जवळजवळ सात-साडेसातपर्यंत. म्हणजे सतत सहा तास ते तलवारी हाती घेऊन झुंजत होते. सतत २२ तास शारीरिक श्रम. अविश्रांत.मृत्यूशी झुंज.ही शक्ती त्यांच्या आणि मावळ्यांच्या हातापायात आली कुठून ? यावेळी बाजीप्रभूंचं वय काय असावं? इतिहासाला माहीत नाही.पण सात पुत्रांचा हा बाप, निदान पन्नाशी उलटलेला शमीचा वृक्षच होता.त्यांना उद्दिष्टाचा गड गाठायचा होता.त्यांची निष्ठा रुद्रासारखी होती. ‘अंगी निश्चयाचे बळ,तुका म्हणे तेचि फळ। ‘फुटो हे मस्तक,तुटो हे शरीर, हाच त्यांचा हट्ट होता. उद्दिष्ट साधेपर्यंत मरायला त्यांना सवडच नव्हती. ‘तोफेआधी मरे न बाजी,सांगा मृत्यूला! हा त्यांचा मृत्यूला निरोप होता.बाजी, फुलाजी आणि असंख्य मावळे सहजसहज मेले.सूर्यमंडळ भेदून गेले. इथे एक गोष्ट आठवते.दुसऱ्या महायुद्धात खारकोन्हच्या जवळ रशियांत जर्मन आक्रमक फौजेला अवघ्या बारा कामगारांनी असंच दीड दिवस झुंजून रोखून धरलं. शत्रूची मॉस्कोवर चाललेली धडक या बारा वेड्यांनी रोखून धरली. मॉस्कोकडून मदतीसाठी रशियन सेना येत होती.ती येईपर्यंत हे बारा झुंजले.सारे मरण पावले.मदत आली.जर्मन हल्ला माघारी फिरला.अखेर रशियाचा जय झाला.हे बारा कामगार रशियाचे बारा तेजस्वी प्रेरक तारे ठरले आहेत आज. बाजीप्रभू देशपांडे यांचं खरं आडनाव प्रधान असं आहे.भोर शहराजवळ पाच किलोमीटरवर ‘सिंद' या नावाचं एक छोटं सुंदर गाव आहे.तिथं बाजींचा भव्य वाडा होता.भोवती अंगण होतं. आज काहीही शिल्लक नाही. जिथं बाजी राहिले,वावरले त्या वाड्याची ही अवस्था.त्यांच्या वाड्याच्या जागेत आज सार्वजनिक संडास बांधलेले आहेत. जाता जाता एक गोष्ट सांगतो. याच युद्धकाळात (इ. स. १६५९-६० ) आपल्याला आठवतंय का ? शिवाजीराजे अफझलखानाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी जेव्हा राजगडावरून प्रतापगडांस आले,तेव्हा असाच तुफानी पाऊस होता.(श्रावण वद्य प्रतिपदा दि. ११ जुलै १६५९ ) या दिवशी महाराज राजगडावरून जिजाऊसाहेबांची शेवटची भेट घेऊन निघाले.कुटुंबातील सर्वांना त्यांनी राजगडावरच ठेवले. जिजाऊसाहेबांची भेट घेताना त्यांची दोघांचीही मने किती गलबलली असतील ? राणीसाहेब सईबाई यातर क्षयाने अत्यवस्थ होत्या.त्यांच्या भेटीतील मानसिक हलकल्लोळ कल्पनेने तरी आपण ओळखू शकतो का?आपण शिवचित्र ओळखतो.शिवचरित्रही शक्य तेवढे जाणतो.पण हे पिळवटून काढणारे त्यांच्या जीवनातील क्षण आपल्याला समजूच शकत नाहीत. राणीसाहेबांची आणि त्यांची ही शेवटचीच भेट.यानंतर फक्त एक महिना आणि सव्वीस दिवसांनी सईबाईसाहेब राजगडावर मरण पावल्या.महाराज तेव्हा प्रतापगडावर होते. जिजाऊसाहेबांची ही भेट झाल्यानंतर,महाराज अफझलवधानंतर ताबडतोब पुढच्या मोहिमेला गेले.मध्यंतरी अनेक लढाया आणि घटना घडल्या.मग महाराजांची आणि जिजाऊसाहेबांची भेट पुन्हा केव्हा घडली? दि. १७ ऑगस्ट १६६० म्हणजेच एक वर्ष, एक महिना आणि एक आठवडा, मायलेकरांची भेट नाही. विशाळगडावरून महाराज राजगडला आले इतक्या दिवसांनी.महाराजांचा बाळ यावेळी सव्वातीन वर्षांचा झालेला होता.त्याला उचलून गळ्याशी घेताना महाराजांना काय वाटलं असेल? आहे का कुणी कवी, कुणी कादंबरीकार, कुणी चित्रकार? कुठे आहेत हे आमचे प्रतिभावंत ? गेली दोन वर्षं (इ.स.१६५९ ते ६० ) दोन आघाडीवर,दोन जबरदस्त शत्रू स्वराज्याला छळत होते.सिद्दी जौहर आणि शाहिस्तेखान.कधीकधी शत्रूच्या चुकांचा आपण अचूक फायदा घेत नाही.महाराज मात्र घेत असत.इथेच पाहा ना! शाहिस्तेखानाने पुण्यावरच्या स्वारीत एक फार मोठी राजकीय चूक केली.आपल्या प्रमाणेच विजापूरचा आदिलशाह शिवाजीराजांचा शत्रूच आहे आणि तोही शिवाजीराजांशी पन्हाळगड आघाडीवर झुंजतो आहे ही सरळ गोष्ट आपल्याला शिवाजीविरुद्ध फायद्याचीच ठरणार आहे.एवढी साधी अक्कल शाहिस्तेखानाला जपता आली नाही. त्याने विजापूरकरांचाच आदिलशाही किल्ला,किल्ले परिंडा हा काबीज केला! वास्तविक विजापूरकर हे यावेळी शाहिस्तेखानाचे मित्रच नव्हते का ? पण शाहिस्तेखानाने मित्राचाच खिसा कापला.त्याचा परिंडा जिंकला. हे घडलेले पाहताच विजापूरचा आदिलशाह भूकंपासारखा हादरला.शाहिस्तेखानान, मदत तर राहोच पण आपल्यावर घावच घातला हे पाहून आदिलशाहने शिवाजीमहाराजांच्या विरुद्ध घडलेली युद्धआघाडी एकदम बंद करून टाकली.महाराजांच्यावर पडलेला प्रचंड युद्धभार एकदम कमी झाला.महाराजांनीही यावेळी आदिलशाहीविरुद्ध कोणतीही हालचाल न करण्याचाच विवेक केला.काम नेहमी मुत्सद्दी विवेकाने करावे. एक भीषण गनिमी कावा शाहिस्तेखानाने मराठ्यांच्या भूगोलाचा आणि गनिमी काव्याचा कधी विचारच केलेला दिसत नाही.पुण्यात आल्यापासून त्याला नाव घेण्यासारखा फक्त एकच विजय मिळाला.तो चाकणवरचा.त्याने या विजयानंतर पूर्ण पाच महिने आराम केला.आपल्या छावणीतील सर्व बातम्या मराठी हेरांच्या मार्फत शिवाजीराजाला बिनचूक पोहोचत आहेत,याची त्याला कल्पनाही नसावी. त्याने जानेवारी १६६१ मध्ये एक मोठी मोहीम कोकणातील मराठी प्रदेशावर करण्याचा आराखडा आखला. या मोहिमेचे सेनापतिपद त्याने कारतलबखान उझबेक या सरदाराकडे सोपविले.हा खान घमेंडखोर होता.याच्याबरोबर अनेक सरदार नेमण्यात आले. त्यात सावित्रीबाई देशमुख उर्फ पंडिता रायबाघन ही हुशार, वऱ्हाडी सरदारीणही होती. खानाच्या फौजेचा नक्की आकडा उपलब्ध नाही.पण तो पंधरा हजारापेक्षा कमी नक्कीच नव्हता. शाहिस्तेखानाने या कारतलबला पेण,पनवेल,नागोठणे हा भाग जिंकावयाचा हुकूम केला.पण हा कारतलब असा अतिउत्साही म्हणजेच घमेंडखोर होता की, त्याने म्हटले की,हुजूर,नागोठणे, पेण,पनवेल तर मी काबीज करतोच,पण कोकणातील शिवाजींचे कल्याण भिवंडीपासून ते दक्षिणेकडे (महाडकडे) असलेली सारी ठाणी आणि मुलूख कब्जा करतो. कारतलबखानाच्या या साऱ्या आत्मविश्वासाचा आणि युद्धतयारीचाही तपशील महाराजांना राजगडावर अचूक पोहोचला.जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो पुण्याहून निघाला.आपण कुठे जाणार आहोत,आपला मार्ग कोणचा , शिवजीराजांचा तो मुलूख कसा आहे.इत्यादी कोणतीही माहिती त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांना सांगितली नाही.ही गोष्ट रायबाघन या हुशार आणि शूर असलेल्या सरदारणीला आश्चर्याची वाटली.शिवाजी, सह्याद्री,मावळे,गनिमी कावा आणि कोकणी प्रदेश याची तिला चांगली जाण होती.पण तिने कारतलबशी एका शब्दानेही चर्चा वा विचारणा केली नाही.पण हा खान अंधारात उडी मारतोय, नक्की आपलं डोकं फुटणार याचा अंदाज तिला लोणावळ्याजवळ पोहोचल्यावर आला. खानाने लोणावळ्यापासून खाली कोकणात उतरणारी आंबेनळीची वाट धरली.खानाचे सैन्य सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यांत अगदी अनभिज्ञ,म्हणजेच अडाणी होते. आंबेनळीच्या पायथ्याशी चावणी नावाचे बारीकसे गाव होते. त्याच्या परिसरात खान पोहोचला. चावणीपासून ऐन कोकणात जाणारी अरुंद वाट होती.गर्द जंगलातून आणि दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरातून ही वाट जात होती.ही वाट साडेचार कोस म्हणजेच १५ किलोमीटर अंतराची होती.खानानं या मार्गाने आपल्या सैन्याला चालण्याचा आदेश दिला.या वाटेचे नाव ऊंबरखिंड असे होते.हा दिवस होता दि.२ फेब्रुवारी १६६१ मोगली फौज त्या भयंकर वाटेने चालू लागली.त्यांना कल्पना नव्हती की,पुढे काय वाढून ठेवले आहे. पुढे या वाटेच्या पश्चिम टोकावर एका टेकाडावर झाडीझुडपांत प्रत्यक्ष शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन उभे होते. आणि या १५ किलोमीटरच्या गर्द झाडीत कमीतकमी पाच हजार मावळे जागोजागी खाचीकपारीत आणि झाडांच्या दाट फांद्यावरही सशस्त्र लपून बसले होते.ही फौज वाघांच्या जाळीत मेंढरांनी शिरावं,तशी चालली होती. शिवाजीराजांना या शत्रूचालीची खबर सतत समजत होती. त्यांच्या मनात कोवळी दया उपजली.ही सारी मोगली फौज आता टिप्पून मरणार हे नक्की होतं.महाराजांना दया आली असावी ती त्या सावित्रीबाई रायबाघनची.महाराजांनी आपला एक वकील वेगळ्या माहितीच्या वाटेनं कारतलबखानाकडे पाठविला.खान चावणी गावाजवळ म्हणजेच पूर्ण पिछाडीस होता.रायबाघनही तेथेच होती.मराठी वकील खानाजवळ जाऊन पोहोचला. त्याने अदबीने खानाला महाराजांचा निरोप सांगितला, आपण चुकून आमच्या मुलखात आलेले दिसता.आपण अजूनही त्वरित माघारी निघून जावे, नाहीतर वेळ कठीण आहे. आमची विनंती ऐकावी. यावर खानाला जरा रागच आला. त्याने जबाब दिला की,मी काय निघून जायला आलोय काय ? कल्याण भिंवडीपासून सारं दख्खन कोकण काबीज करणार आहे मी. हे सारं वकील आणि तिथंच घोड्यावर असलेली रायबाघन ऐकत होती.ती काहीही बोलत नव्हती.तिच्या डोळ्यापुढे आत्ताच आकाश फाटले होते.खानाने वकिलाला असे फेटाळून लावले. वकील आल्यावाटेने महाराजांकडे गेला.त्याने त्या टेकडीवर घोड्यावर असलेल्या महाराजांना खानाचा बेपर्वाई जबाब सांगितला.दया करणारे महाराज संतापले.आणि त्यांना त्या समारेच्या गर्द ऊंबरखिंडीत ठायीठायी दबा धरून बसलेल्या मावळ्यांना आपल्या पद्धतीने इशारा पोहोचविला.अन् एकदम त्या हजारो मावळ्यांनी खालून चाललेल्या मोगली सैन्यावर बाणांचा आणि गोळ्यांचा मारा सुरू केला.मोगलांची क्षणात तिरपिट सुरू झाली.कोण कुठून हल्ला करतोय,कुठून बाण येताहेत हेच समजेना,गनिमी काव्याच्या हल्ल्याचा हा खास नमुना होता.अक्षरश: हलकल्लोळ उडाला.मोगलांना धड पुढेही जाता येईना अन् मागेही येता येईना,तुडवातुडव,चेंदामेंदी, आरोळ्या,किंकाळ्या यांनी ऊंबरखिंडीत हलकल्लोळ माजला.याचे नाव गनिमी कावा. शब्दांविना गर्जे आमुचा दरारा! उंबरखिंड म्हणजे जणू १५ कि.मी.लांबीची बंदुकीची नळीच होती.मोगली सैन्याने उंबरखिंड पुरती ओलांडलेली नव्हती.त्या अरुंद जंगली खिंडीत ते भयंकर ठेचून निघत होते किंवा थेट स्वर्गात जात होते.या भयंकर चित्तेहल्ल्याची खबर धडपडत, धावत मोगली सरदारांनी पिछाडीवर असलेल्या आपले सेनापती कारतलबखान साहेबांना दिली.बातमी देणारे व्याकूळ झाले होते.हा भयंकर प्रकार खानाला अनपेक्षित होता.हे सगळेच बादशाही सरदार आपल्या प्रचंड सैन्यसंख्येवर आणि युद्धसाहित्यावर भाळलेले असायचे.त्यांना वाटायचं,मराठे मूठभर आहेत.मारून काढू.पण त्या मूठभर मराठ्यांची ताकद सुरुंगाच्या दारूसारखी होती. कारतलबखान सुन्नच झाला. कारण पाठोपाठ सर्वनाशाच्या खबरा येऊ लागल्या.यावेळी ती रायबाघन आपल्या घोड्यावर गप्प बसलेली होती.खानाने आपला घोडा रायबाघनकडे वळविला आणि तो अगतिक शब्दांत तिच्याशी बोलू लागला, रायबाघनसाहिबा,अब मैं क्या करूं?क्या हालत हो गयी अपनी ? त्यावर रागावलेली रायबाघन खानाला म्हणाली, पुण्याहून निघताना आपण मला सल्ला विचारला होतात का?आपण शिवाजीच्या कोणत्या भागांत नि कसे जाणार आहोत हे ठाऊक होतं का ? खानाला आपली चूक कळून चुकली होती.पण आता या बाईच्या शिकवणीचा ऐन कल्लोळात काय उपयोग? तो म्हणत होता,अब मैं क्या करूं ? यावर रायबाघनने अगदी स्पष्ट शब्दांत त्याला सुनावलं की,हे असलं साहस म्हणजे आत्मघातकी वेडेपणा आहे.मी अजूनही आपल्याला सांगते की, आपण मुकाट्याने शिवाजीराजांकडे ताबडतोब वकील पाठवा.शरण जा.क्षमा मागा त्याची.तो राजा फार मोठ्या उदार मनाचा आहे.अजूनही तो तुम्हाला क्षमा करील.नाही तर सर्वनाश! खरंच होतं.खानानं आपला वकील पाठविला.पण त्या प्रचंड गोंधळगर्दित शिवाजीराजाला गाठण्यासाठी जायचं कसं? अखेर मोठ्या धडपडीनं तो वकील महाराजांपर्यंत जाऊन पोहोचला, हे मोगलांचं नशीब. त्यानं महाराजांच्या पुढे व्याकूळ होऊन विनवणी केली की,आम्ही माहीत नसलेल्या या मुलुखांत आलो. आमचे चुकले.आम्हाला माफ करा.आपल्या तीर्थरुपसाहेबांचा आणि कारतलबसाहेबांचा दोस्ताना फार मोठा आहे.आपण मेहरनजर करावी.आपण रहमदिल आहात. महाराजांनी मन मोठं केलं आणि म्हणाले,एकाच अटीवर.तुमच्या खानसाहेबांनी जे जे काही बरोबर आणलं आहे ते सर्व जागच्या जागी टाका.आणि रिकाम्या हाताने,निशस्त्र परत जा,कबूल ? जी,कबूल खजिना,तंबूडेरे,घोडे,डंकेझेंडे आणि सर्व जखीरा,म्हणजे युद्धसाहित्य जागच्याजागी टाकून खान परत जाण्यास कबूल झाला. त्याला हे भागच होते.त्याची प्रचंड फजिती मावळ्यांनी केली होती. खान परत निघाला.मान खाली घालून निघाला.त्याचे महत्त्व आणि स्थान कायमचे संपले.तो आयुष्यातून उठला.या उंबरखिंडीच्या युद्धात नेताजी पालकर,तानाजी मालुसरे, पिलाजी सरनाईक इत्यादी उर्मट हत्याऱ्याचे सरदार महाराजांच्या बरोबर होते.सर्वांनी मोगलांच्या विरुद्ध हत्यार चालवून हौस फेडून घेतली. शाहिस्तेखानाचे हिशोबवहीत आणखी एक जबर पराभव जमा झाला. एक गोष्ट आपल्या लक्षात आली ना? कारतलबखान लोणावळ्याकडून पश्चिमेला उंबरखिंडीत आला.पण महाराज आधीच (बहुदा १ फेब्रुवारी १६६१ ) पुण्याकडून ताम्हणीच्या किंवा सवाष्णीच्या घाटाने कोकणात उतरले आणि त्यांनी उंबरखिंडीच्या तोंडावरच खानाची वाट अडविली.त्याचं सगळं होतं नव्हतं तेवढं साहित्य कब्जात घेतलं.अंगावरचे कपडे शिल्लक ठेवले हे खानाचं आणि त्याच्या सैन्याचं नशीबच. महाराज दि.३ फेब्रुवारी १६६१ रोजी पाली,जांभूळपाडा, नागोठणे या मार्गाने महाडकडे निघाले.पण त्यांची सावधता केवढी! त्यांनी नेताजी पालकराला सुमारे दोन-एक हजार फौजेनिशी उंबरखिंडीतच ठेवले.न जागो,फजित पावलेला कारतलब पुन्हा युद्धसाहित्य जमवून कोकणात उतरू पाहिला,तर त्याच्या दुसऱ्या फजितीची व्यवस्था महाराजांनी नेताजीवर सोपविली. महाराज आता चिपळूणजवळ श्री परशुरामाच्या दर्शनासाठी निघाले. महाराज धार्मिक होते. पण त्यांच्या कामाच्या आड ते देवधर्म , व्रतवैकल्य येऊ देत नव्हते. ते उरकूनच आता श्रीदर्शनास जात होते. त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा. उंबरखिंडीच्या मोहिमेत कारतलबखान उझबेग याची अगदी नाचक्की झाली.समृद्ध साहित्याने सुसज्ज असलेली फौज कमी सैन्यबळाच्या आणि तुटपुंज्या युद्धसाहित्याच्या शिवाजीराजापुढे का मार खाते आहे,याचा सूक्ष्म अभ्यास तर राहोच,पण साधा वरवरचा विचारही कोणत्याही मोगली सेनापतीने कधीच केला नाही. सहज बोलतो,पाहा पटतं का! आजही आमचे कारखाने आजारी पडतात कायमचे बंदही पडतात. तोट्यात तर नेहमीच असतात. घोटाळे आणि भानगडी यांच्या मनोरंजक कथांनी आमचे विनोदी वाङ्मय समृद्धही होत असते.असं का होतं?या सर्व आमच्या पराभवाचं नातं कारतलबखान आणि शाहिस्तेखानसारख्या बेशिस्त अहंकारी,अभ्यासशून्य, कुचराईबाज, उपभोगवादी, निष्ठाहीन म्हणूनच पराभूत सेनापतींशी जुळलं आहे का ? तेच नातं आम्हाला उदात्त आणि उत्तुंग,विश्वकल्याणकारी म्हणूनच अनुकरणीय शिवाजीराजांशी जोडता येईल का ? हीच वरील अवस्था आपल्याकडे प्रत्येक क्षेत्रांत आणि विषयांत अनुभवास येते आहे.आम्ही निखळ आनंदाने,एकजुटीने, शिस्तीने,अनुशासनाने खेळांच्या क्षेत्रात तरी वागायला नको का? म्हणजे मग आम्हाला ऑलिम्पिकमध्ये एखादं तरी सोन्याचं पदक मिळेल की! या सर्व अपयशांच्या मुळाशी एकच कारण आहे.आम्हाला ‘राष्ट्रीय' चारित्र्यच नाही. दिल्लीत औरंगजेब फार मोठ्या अपेक्षेने शाहिस्तेखानाच्या दक्षिण मोहिमेवर लक्ष ठेवून होता. पण ते त्याचं लक्ष केवळ आशाळभूत ठरलं.शाहिस्तेखानाला आता महाराष्ट्रात उतरून अडीच वषेर् झाली होती.खर्च अफाट आणि मिळकत जवळजवळ शून्यच. टोळधाडीप्रमाणे मराठी मुलखाला आणि मराठी संसारांना ओरबाडीत,कुरतडीत तो बसला होता.त्यामुळे त्याच्याबद्दल येथील जनतेत फक्त दहशतच होती. महाराज उंबरखिंडींच्या युद्धानंतर दक्षिण कोकणात,राजापूरच्या रोखाने मोहिमेवर होते. स्वराज्याला विरोध करणाऱ्या स्वकीयांना उदार मनाने वागवून आपल्या ‘ईश्वरी कार्यात' सामील करून घेण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच असे.संपूर्ण शिवचरित्र अभ्यासताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती अशी स्वकीय विरोधकांना महाराज समजावून सांगून,कधी मायेनं तर कधी रागावून स्वराज्यात येण्याचा आग्रह करत होते.कुणी आले, कुणी नाही आले. जे आले त्यांचे कल्याण झालं.कीर्ती झाली. पण जे कडवा विरोध करीत राहिले, त्यांचा अखेर कठोर हातानं त्यांनी समाचार घेतला.पण त्यांचा पाडाव करण्यासाठी महाराजांनी स्वत:चीच शक्तिबुद्धी वापरली. त्यासाठी त्यांनी कोणाही शत्रूपक्षीय सत्ताधीशाची मदत घेतली नाही.उदाहरणार्थ,चंद्रराव मोऱ्यांचा अगदी दु:खी मनाने, निरुपायाने बिमोड केला.पण कोणा जंजिरेकर सिद्दीची, इंग्रजांची वा परकीय शक्तीची मदत घेतली नाही.अशीच उदाहरणे आणखी पाच तरी सांगता येतील.मी हे इथं एवढं आवर्जून का सांगतोय? कारण पुढच्या इतिहासात पेशव्यांनी हीच भयंकर आत्मघातकी चूक अनेकदा केली.उदाहरणार्थ तुळाजी आंग्ऱ्यांचा पराभव आणि बंदोबस्त करण्याकरता नानासाहेब पेशव्यांनी इ. १७५५ मध्ये मुंबईच्या इंग्रजांशी मैत्री केली आणि आंग्ऱ्यांचा बिमोड केला.इंग्रजांनी सुवर्णदुर्गाच्या समुदात आंग्ऱ्यांचं म्हणजेच शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याचं आरमार समुदात बुडविलं. फडफडणाऱ्या आमच्याच भगव्या झेंड्यांसह हे आमचं आरमार समुदाच्या तळाशी गेलं. परक्यांना आपल्या राष्ट्रव्यवहारात आपणहून आमंत्रण देणं हा केवढा आत्मघात! अशा खूप चुका पेशवाईत झाल्या.शेवटी परकीय शत्रूंनी आम्हालाच गिळून टाकलं. अशा चुका चुकूनही होऊ नयेत यासाठी महाराज अखंड सावधान होते. इथं एक गम्मत झाली. (इ.स. १६६१ मार्च) महाराज दक्षिण कोकणात दौडत असतानाच त्यांनी तानाजी मालुसरे या आपल्या काळजातल्या सौंगड्याला एक कामगिरी सांगितली.कोणती?संगमेश्वर भागातील रस्ते दुरुस्त करण्याचे काम त्यांनी तानाजीला सांगितले. आता बघा! एवढा मोठा तालेवार भीमासारखा हा योद्धा,त्यानं दु:शासनासारख्या शत्रूशी लढाया करायच्या की हातात कुदळ फावडं अन् घमेली घेऊन रस्ते दुरुस्त करायचे ? अन् तो मराठा मर्द तेही काम प्रेमानं अन् हौसेनं जीव लावून करतोय बघा! उन्हातान्हात.दिवसभर केवळ श्रमदानी पद्धतीने नव्हे!फोटू काढला की ठेवलं घमेलं खाली. मग हारतुरे.महाराजांना आणि त्यांच्या जिवलगांना नाटकं करणं कधी जमलंच नाही. संगमेश्वरचे रस्ते दुरुस्तीचे काम करीत असतानाच तानाजीवर एकदा सुर्व्यांच्या आदिलशाही टोळ्यांनी सशस्त्र हल्ला चढविला. कुदळ फावडी टाकून तानाजीने आपल्या मावळ्यांसकट उलटा हल्ला केला. जय झाला.सुर्वे पळाले. पुन्हा रस्ते दुरुस्ती सुरू. खरोखर या सगळ्या मावळी स्वभावांचं मूळ कशात आहे ? ते शिवाजीराजांनी या सौंगड्यांना सहज शिकविलेल्या स्वराज्यधर्मात आहे.हे वेगळंच निरोगी अन् हौशी वेड राजांच्या सौंगड्यांना लागलं.त्यातून उगविलेलं पिक निरोगी अन् सकस उगवलं. ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते. महाराजांनी या कोकण दौऱ्यात चिपळूणजवळ श्रीपरशुरामाचे दर्शन घेतले.मुक्काम केला. पूजाअर्चा झाल्या.विपुल दानधर्म केला.याच श्रीपरशुरामावर यापूर्वी हाबश्यांचे हल्ले होत होते.आता हे स्थान निर्धास्त झाले.(मार्च अखेर १६६१ ) अधूनमधून महाराज अशा धर्मकार्यात उपस्थित राहून आनंद लुटीत.पण ते उत्सवबाज नव्हते.यानंतर पाचच महिन्यांनी महाराजांनी प्रतापगडावर श्रीभवानी देवीची स्थापना केली. हा स्थापनेचा कार्यक्रम मोरोपंत पिंगळे यांच्याहस्ते झाला. देऊळ छोटे,साधे पण रेखीव केले. श्रीभवानीच्या पूजाअचेर्ची छान पण साधीसुधी व्यवस्था त्यांनी लावून दिली.या श्रीस्थापनेच्या कार्यक्रमाला महाराज स्वत: उपस्थित नसावेत की काय अशी शंका येते.कारण त्या तपशीलांत तसा उल्लेख नाही. ‘मी उपस्थित असल्याशिवाय हा उद्घाटनाचा कार्यक्रम करू नये' असा महाराजांचा कधीही हट्ट नसे! महाराजांच्या जीवनात मीपणाला महत्त्व नव्हते.म्हणून स्वराज्यातील भूमीपूजने, कोनशीला आणि उद्घाटने कधी कुठे खोळांबलेली दिसत नाहीत! विसरायला नको,म्हणून आत्ताच सांगतो.प्रतापगडावर देवीच्या पूजाअचेर्ची सर्व व्यवस्था महाराजांनी यथासांग नेमून दिली. वेदमूर्ती विश्वनाथभट्ट हडप यांचेकडे पूजाअर्चा सोपविली. त्यांना लिहिलेल्या पत्रातील महाराजांचे एक वाक्य लक्षात घेण्यासारखे आहे. 'श्रींची' नित्यनैमित्तिक पूजाअर्चा आणि कार्य यथासांग करावीत. (गडावरील) अन्य कोणत्याही कारभारात लक्ष घालू नये. महाराजांच्या या सूचक शब्दांवर अधिक भाष्य करण्याची जरुर आहे का ? महाराज या कोकणस्वारीत थेट राजापुरावर धडकले. त्यांचा सारा रोख होता राजापुरातील ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीवर तेथील उपद्व्यापी अकरा इंग्रजांवर हेन्री रिव्हींग्टन हा या अकरांचा प्रमुख अधिकारी होता. गिफर्ड,डेनियल,इमॅन्युएल, रिसर्च,रेडॉल्फ टेलर इत्यादी बाकीचे होते.इंग्रज म्हटलं की तो महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच पाताळयंत्री राजकारणी असायचाच. हेही अन् विशेषत: हेन्री तसाच होता.पन्हाळ्यात सिद्दी जौहरने वेढा घातला. ( इ. स. १६६०,५ मार्च ते पुढे) तेव्हा या हेन्रीने आपल्याबरोबर सर्व इंग्रजांना घेऊन इंग्रजी मोठ्या तोफा जौहरच्या मदतीसाठी पन्हाळ्यास नेल्या होत्या.स्वत: तो इंग्रजी झेंडे लावून आणि बँड वाजवीत पन्हाळ्यावर तोफा डागीत होता.पूर्वी महाराजांशी केलेला ‘मैत्रीचा करार' मोडून इंग्रज हा उपद्व्याप करीत होते. शिवाजीराजाचा जौहरच्या हातून आणि पुण्यास येऊन बसलेल्या शाहिस्तेखानाच्या हातून पूर्ण नाश होणार आहे.असा या इंग्रजांना साक्षात्कार झाला असावा.म्हणून महाराजांशी केलेला करार मोडून हे इंग्रज जौहरच्या मदतीला आले होते.कारण जौहरला जय मिळणार अन् पुढे आदिलशाहकडून आपल्या ईस्ट इंडिया कंपणीला सवलती आणि जागा व्यापाारसाठी मिळणार ही यांना खात्री वाटत होती. पण झाले उलटेच.जौहरचा पराभव झाला.इंग्रजांना धड दारूगोळ्याचे आणि खर्चाचे पैसेही मिळाले नाहीत.कसेबसे तोंड लपवित,पळून हे लोक पन्हाळ्याहून राजापुरास आले होते. यांचाच काटा काढण्यासाठी महाराज आता राजापुरावर येत होते.हे इंग्रज इतके विलक्षण राजकारणी होते म्हणजेच ( निब्बर निर्लज्ज होते) की,मराठा राजा शिवाजी राजापुरावर येतोय हे समजताच जणू काही आपण महाराजांच्या स्वागत समितीचे अध्यक्ष आणि सदस्य आहोत अशा थाटात महाराजांच्या स्वागतासाठी राजापुराबाहेर सामोरे आले.पुढे आले. महाराजांनी पाहिले आणि त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांना हुकुम केला. या टोपीकरांना गिरफ्तार करा. ताबडतोब आणि यांची येथील राजापुरची वखार जप्त करा. आणि कुदळी लावून खणून काढा. इंग्रजांना बोलायला जागाच नव्हती.जसल्याला तसलंच थेटलं म्हणजे बरं असतं.हे इंग्रज व्याघ्रगडच्या कैदेत डांबले गेले. राजापुरच्या या छाप्यात महाराजांना धनदौलत खूप मिळाली.पण एक अमोल नररत्न त्यांना गवसले. त्याचे नाव बाळाजी आवजी चित्रे.हिरे,मोती, सोनं याची गरज होती.पण महाराजांची सर्वात आवडती लाडकी संपत्ती म्हणजे त्यांचे जिवलग.एकेक माणूस ते स्थमंतकाहूनही अधिक प्रेमाने हृदयाशी जपत होते.आपल्या मित्रांविषयी त्यांनी वेळोवेळी काढलेले उद्गार मधासारखे ओथंबलेले आढळतात. महाराजांची संघटन भूक बकासुराहूनही मोठी होती. ते माणसं मिळवीत होते.त्यामुळे मुलुख आणि गडकोट आपोआपच मिळत होते.या बाबतीत महाराजांच्या पाठीशी उभी होती त्यांची आई, जिजाऊसाहेब,तिचं प्रेम महाराजांवर जेवढं होतं,तेवढंच साऱ्या मराठ्यांवर होतं.अपार, कितीतरी उदाहरणं आहेत. जिजाऊसाहेबांचं आईपण जुन्या कागदपत्रांत सापडतं.पण त्यातल्या दोन ओळींच्या मधल्या कोऱ्या जागेत बिन शब्दांनी लिहिलेलं अधिक सापडते. ते वाचण्यासाठी पर्ल बकच. मॅक्झिन गार्किच आणि साने गुरुजींचं मायाळू मनच हवं. पायाळू माणसालाच जमिनीखाली लपलेलं पाणी सापडतं. या मायाळूंचंही तसंच होतं. रचीत गडावरील धनलाभ. संगमेश्वराच्याच जवळ १२ किलोमीटरवर शृंगारपूर या नावाचं गाव आहे.हे गाव महाराजांनी जिंकलं. जिंकण्यासाठी युद्ध करायची वेळच आली नाही.तेथील शाही जाहगिरदार महाराजांच्या दहशतीने पळूनच गेला.त्यामुळे शृंगारपूर बिनविरोध महाराजांना मिळाले. गावाच्या पूवेर्ला सहा किलोमीटरवर एक प्रचंड डोंगरी किल्ला होता.त्याचं नाव प्रचीतगड. गडावर आदिलशाही सत्ता होती.तानाजी मालुसऱ्यांनी या गडावर हल्ला चढवून एकाच छाप्यात किल्ला घेतला.केवढं नवल! सहा सहा महिने लढू शकणारे किल्ले शाही फौजांना एक दिवसभरही झुंजवता आले नाहीत.मराठ्यांनी गड घेतला. झेंडा लागला.महाराजांना विजयाची वार्ता गेली.ते पालखीतून प्रचीतगडावर निघाले. बरोबर थोडं मावळी सैन्य होतं. महाराज गडावर पालखीतून येत आहेत हे पाहून गड जिंकणाऱ्या मराठ्यांना अपरंपार आनंद झाला.आपला विजय बघण्यासाठी खास महाराजस्वारी जातीनं येत आहे हा खरोखर दुमिर्ळ योग होता.तानाजीला तर आनंदानं आभाळ भरून आल्यासारखं झालं.गडावरचे लोक गर्जत होते;वाद्य वाजत होते.महाराज गडावर आले. दरवाज्यातून आत प्रवेशले. मावळ्यांना आनंदाचं उधाण आलं होतं.जणू इथूनच महाराजांची पालखीमधून त्यांनी मिरवणूक सुरू केली.महाराज लोकांचे स्वागत हसतमुखाने स्वीकारीत पालखीत बसले होते. यावेळी वारा सुटला होता.भळाळणाऱ्या वाऱ्यानं झाडं झुडपं हेलावत होती.महाराजांच्या अंगावरचा शेला फडफडत होता.नकळत शेल्याचा फलकावा पालखीबाहेर लोंबत होता.तो वाऱ्याने उडत होता.मिरवणूक चालली होती. एवढ्यात गचकन कुणीतरी मागे खेचावं असा महाराजांच्या पालखीला जरा हिसका बसला. शेला खेचला गेला.ते पाहू लागले. भोई थांबले.काय झालं तरी काय ? पाहतात तो महाराजांच्या शेल्याचं पालखीबाहेर पडलेलं टोक एका बोरीच्या झुडपाला वाऱ्याने अटकलं गेलं होतं. बोरीला काटे असतात.शेला अटकला.महाराज बघत होते. त्यांना गंमत वाटली. मावळे काट्यात अटकलेला शेला अलगद काढू लागले.शेला निघाला.पण महाराज हसून सहज गंमतीने म्हणाले,या बोरीनं मजला थांबविले. येथे खणा मावळ्यांनी पहारी,फावडी आणली आणि त्यांनी बोरीखालची जमीन खणावयास सुरुवात केली.केवळ गंमत म्हणून महाराज बोलले.सगळ्यांचाच उत्साह दांडगा.अन् खणताखणता पहारी लगेच अडखळल्या.माती दूर केली.बघतात तो सोन्यानाण्यांनी भरलेला हंडा! हा केवळ योगायोग होता. महाराजांना भूमीगत धन मिळाले. ते धन कुठे गेले ? महाराजांच्या घरी ? ‘कमिशन' म्हणून काही हप्ते कोणाकोणाला मिळाले का? नाही,नाही,नाही! हे सर्व धन स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाले. इथे एक गोष्ट लक्षात येते. महाराजांना एकूण तीन ठिकाणी असे भूमीगत धन मिळाले. तोरणगडावर, कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर आणि हे असं प्रचीतगडावर.हे धन स्वराज्याचं. म्हणजेच रयतेचं.म्हणजेच देवाचं. पूर्वी महाराजांच्या आजोबांना, म्हणजे मालोजीराव भोसल्यांना वेरूळच्या त्यांच्या शेतातच भूमीगत धन मिळालं.ते मालोजींनी श्रीधृष्णेश्वराचे मंदिर, शिखर शिंगणापूरचा तलाव,एक यात्रेकरूंच्यासाठी धर्मशाळेसारखी म्हणा किंवा मठासारखी म्हणा इमारत अन् अशाच लोकोपयोगी कार्यासाठी खर्च केलं.आपल्या आजोबांचा हा वारसा महाराजांनी आजही सांभाळला.योगायोगानं पण मालकी हक्कानेच मिळालेलं धन मालोजीराजांनी आणि आता शिवाजीराजांनी जनताजनार्दनाच्या पायांपाशी ‘श्रीकृष्णार्पणमस्तु‘ म्हणत खजिन्यात जमा केलं.देवाचं दान आण जनतेचं धन असेच वापरावयाचे असते.त्याचा अपहार करणे हे महत्पाप. एक गोष्ट सांगू का ? महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला एका पैशाचेही कर्ज कधीही नव्हते.किंवा खजिन्यात खडखडाट झाला आहे अशी अवस्थाही कधी निर्माण झाली नाही.याचे एक कारण समजले ना ? अपहार, भ्रष्टाचार,पिळवणूक,लुबाडणूक हे शब्दच स्वराज्यात असता कामा नये हा आदर्श महाराजांनी घालून दिला.स्वराज्याचा खजिना नेहमीच शिलकीचा होता. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आम्हाला आवर्जून सांगितलं आहे की,'जोडूनिया धन उत्तम वेव्हारे उदासविचारे वेंच करी' चांगल्या मार्गाने,खूप धन मिळवा आणि उदार मनाने खर्चही करा, हा महराजांचा आदेश होता आणि आहे. प्रचीतगडची ही तानाजीची मोहिम इ. १६६१ च्या पावसाळ्याच्या पूर्वी झाली. हौसेने स्वराज्य सजवावे. दारिद्य कोणाच्या वाट्याला आलं तर ते दु:खदायकच आहे.त्यानं प्रयत्नाला देव मानून उत्तम व्यवहारे धन जोडावे संसार गोड करावा. हौसेनं करावा.ज्याला हौस नाही त्यानं संसार आणि राज्यकारभार करूच नये. अन् दारिद्याचा अभिमान धरणं हा तर गुन्हा आहे.शिवाजीराजांनी माणसांना कष्ट करण्याची चटक लावली.हौस निर्माण केली. म्हणूनच शिवकालीन पत्रात आणि शिवकालीन काही कवींच्या काव्यात सहज उल्लेख येऊन जातात की , ‘हे राज्य श्रींच्या आशीर्वादाचं आहे' ‘राज्येश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी.‘एका विरकत बैराग्यानं तर म्हटलं की, ‘अशुद्ध अन्न सेवो नये' अशुद्ध अन्न म्हणजे? अयोग्य,पापी, भ्रष्टाचारी मार्गाने मिळविलेली धनधान्य दौलत.तिचा उपभोग घेऊ नये.श्रमाने मिळवावे.श्रम म्हणजे देवपूजा.आम्हाला केवढी मोठी माणसं इतिहासात मिळाली पाहा! शिवाजीराजांसारखा विरक्त,उपभोगशून्य छत्रपती. चक्रवर्ती. जिजाऊसाहेबांच्यासारखी कादंबिनीव जगजीवनदान हेतू: असलेली आई,राजमाता.नव्हे स्वराज्यमाता आम्हाला या मराठी मातेनं दिली.या मायलेकरांच्या जीवनांत चंगळमंगळ अन् उधळपट्टी केल्याची एकही नोंद, उल्लेख गवसत नाही. कादंबिनीव म्हणजे योगिनीप्रमाणे.धर्मपुरुष आम्हाला लाभले तेही सोन्यामोत्यांना ‘मृत्तिकेसमान' मानणारे श्रीतुकाराम महाराजांसारखे तोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जोवरी देखिला नाही दृष्टी तुकाराम.या शिवकाळातील सारेच संतसत्पुरुष असे होते.मठ करून ताठा करणारे नव्हते. जनतेच्या भाबड्या श्रद्धेचा उपयोग करून ‘इस्टेटी' निर्माण करणारे नव्हते.म्हणूनच रयत सुसंस्कारांच्या अभ्यंग स्नानात नहात होती.याचा अर्थ इथं शिवाजीराजांच्या पाच-दहा वर्षांच्या स्वराज्यकाळात अगदी स्वर्गलोक अवतरला असंही नव्हे. समाजाची गती ही सावकाशच असते.स्वराज्यपूर्व काळातील इथलं लोकजीवन किती केविलवाणं होतं.पण स्वराज्य वाढू लागल्यापासून तेच जीवन बदलत गेलं.माणसा खावया अन्न नाही अशी अवस्था असलेला मराठी मुलुख स्वराज्यात भरल्या कणगीला टेकून पोटभर भाकरतुकडा खाऊ लागला होता. इ.स.१६६१ ची कोकण मोहिम संपवून महाराज राजगडास परतले.प्रतापगड ते पन्हाळगड या भयंकर कठीण युद्धकाळातून महाराज अगदी तावून सुलाखून बाहेर पडले होते.अजून शाहिस्तेखान पुण्यात होताच. स्वराज्याचे हेर पुण्यावरती घिरट्या घालीतच होते.त्याचे मोठे यश म्हणजे उंबरखिंडीत केलेला कारतलबखानचा दणदणीत पराभव.पण याच साऱ्या घाईगदीर्तून वेळ काढून महाराजांनी गडावर जखमनाम्याचा दरबार भरविला. जखमनामा म्हणजे ज्यांनी ज्यांनी युद्धात कामगिऱ्या केल्या त्या कर्तबगारांचे भर दरबारात भरघोस कौतुक.याच काळात अज्ञानदास उर्फ आगीनदास नावाचा एक नामवंत शाहीर मराठी मुलुखांत गाजतगर्जत होता.या कौतुकाच्या दरबारात महाराजांनी युक्तिबुद्धिवंतांचे छान कौतुक केले या शाहीराचेही.जेधे नाईकांना त्यांनी मानाचे तलवारीचे पहिले पान दिले. वकिलांना ओंजळी ओंजळीने होन आणि शेलापागोटी दिली. युद्धात जे खर्ची पडले त्यांच्या बायकापोरांना ‘अडीचसेरी' म्हणजे पेन्शन दिले.कोणालाही उणे पडू दिले नाही. आज आपणही पाहतो ना! आपले राष्ट्रपती अशाच राष्ट्रवीरांना,लोकसेवकांना, कलावंतांना आणि संशोधकांना गौरवाची मानचिन्हे दिल्लीत सन्मानपूर्वक देतात.अशोकचक्र, परमवीरचक्र आणि आमच्यातील महामानवांना भारतरत्न अशासारखे शिरपेंच अर्पण करतात.महाराजांनीही आपल्या कतृत्त्ववंतांचं भरघोस कौतुक केलं नेहमीच. अशाच काळात शाहिस्तेखानाच्या छावणीतून खानाचा भाचा नामदारखान हा कोकणातील पेण,पनवेलजवळच्या मिऱ्या डोंगर उर्फ मिरागड या किल्ल्यावर फौज घेऊन निघाला. राजगडावर खबरा आल्या. महाराजांना शिकारीची संधी आल्यासारखंच वाटलं असावं.ते महाडच्या बाजूने कोकणात उतरले.मिरागड उत्तरेस आहे आणि महाराजांनी मिऱ्या डोंगरावर हल्ला करणाऱ्या नामदारखानाला आणि त्याच्या शाही फौजेला अचानक हल्ला करून असं झोडपून काढलं की , जणू लोहार तापून लाल झालेल्या लोखंडावर दणादणा घाव घालतो तसं.नामदारखान आपल्या पूर्वपरंपरेप्रमाणे पळून गेला.सारी मोगली मोहिम साफ फसली.ही मोहिम इ. स. १६६२ च्या प्रारंभी झाली.नक्की तारीख सापडत नाही.या मोहिमेत स्वत: महाराज रणांगणावर झुंजत होते. महाराजांच्या या अविश्रांत परिश्रमांना काय म्हणावे ? महाराजांना विश्रांती सोसत नव्हती.त्यांच्या संपूर्ण जीवनात खास विश्रांतीकरता ते एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी दोनचार महिने जाऊन राहिल्याची नोंद सापडत नाही.स्वराज्यसाधनाची लगबग त्यांनी कैसी केली ? मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत. गेल्या चार वर्षांत (इ.स. १६५९ ते ६२ ) असंख्य कर्तबगारांनी अपार कष्टानं,महाराजांच्या योजने आणि आसेप्रमाणे कर्तबगारीची शर्थ केली होती.त्यातील कित्येकजण रणांगणावर ठार झाले होते.जिवा महाला सकपाळ,रामाजी पांगेरे , शिवा काशीद,मायनाक भंडारी, बाजीप्रभू ,कावजी मल्हार,बाजी पासलकर,वाघोजी तुपे,बाजी घोलप,अज्ञानदास शाहीर, कान्होजी जेधे आता किती जणांची नावं सांगू ? या स्वराज्यनिष्ठांच्या आणि कर्तबगारांच्या रांगाच्यारांगा महाराजांच्या पाठिशी उभ्या होत्या. त्यामुळेच स्वराज्य सुंदर आणि संपन्न बनत होतं.कुणाचं नाव विसरलं तरी स्वर्गातून माझ्यावर कुणी रागावणार नाही. पण महाराज मात्र कुणालाही विसरत नव्हते. होते त्यांनाही अन् जे गेले त्यांनाही.शाहिस्तेखानाने उंबरखिंडीच्या लढाईनंतर पुढच्या लढाईची (म्हणजे पराभवाची) तयारी केली.त्याने कोकणातील ठाण्याजवळील कोहजगड नावाचा किल्ला घेण्यासाठी आपली फौज पाठविली.तीही मार खाऊन परतली.आपल्या लक्षात आलंय ना ? की,शाहिस्तेखान एका चाकणच्या मोहिमेशिवाय कुठल्याही मोहिमेवर स्वत: गेला नाही.अन् प्रत्येक मोहिमेमध्ये महाराज स्वत: भाग घेताहेत. इ.स.१६६३ साल उजाडलं. शाहिस्तेखानानं स्वत: जातीने एक प्रचंड मोहिम योजिली. कोणती ? स्वत:च्या मुलीच्या लग्नाची! खरंच! आपल्या बहिणीच्या मुलाशी त्याने आपल्या मुलीचं लग्न ठरविलं.लग्न अर्थात पुण्यात,लष्करी छावणीत होणार होतं.लाल महालाचं मंगल कार्यालय झालं होतं.मुलाच्या आईचं नाव होतं.दहरआरा बेगम. ही अर्थात खानाची बहीणच. तिच्या नवऱ्याचं नाव जाफरखान. हा यावेळी प्रत्यक्ष औरंगजेबाचा मुख्य वजीर होता.तो या लग्नासाठी पुण्यास येणार होता. आला ही.प्रचंड लवाजमा.प्रचंड थाटमाट.वेगवेगळ्या लग्नीय समारंभांची रेलचेल.खाणंपिणं. सगळी छावणी लग्नात मग्न. शाहिस्तेखानाची केवढी ही टोलेजंग लग्नमोहिम! अन् समोर दक्षिणेकडे अवघ्या पन्नास किलोमीटरवर एक ढाण्या वाघोबा जबडा पसरून झेप घेण्यासाठी पुढचे पंजे आपटीत होता ; त्याचं नाव शिवाजीराजा. शाहिस्तेखानाचं हे काय चाललं होतं ? तो शिवाजीराजासारख्या महाभयंकर कर्दनकाळावर मोहिम काढून आला होता की, आपल्या पोरापोरींची छावणीत लग्न लावायला आला होता? या खानाला विवेकशून्य, बेजबाबदार आणि चंगळबाज म्हणू नये तर काय म्हणावं ? त्याला शिवाजीराजा समजलाच नाही। त्याला गनिमी कावा उमजलाच नाही.त्याला इथला भूगोल कळलाच नाही.आता या मोगली चैनी पुढे बेचैन शिवाजीराजांचा आपण अभ्यास करावा.वास्तविक पुण्यात आल्यापासून एका चाकणशिवाय शाहिस्तेखानानं काय मिळविलं ? काहीही नाही.हा तीन वर्षाचा हिशोब.अन् आता मुलीचं अफाट खर्चानं लग्न.पुढं काय झालं ते मी सांगतोच.पण आपल्याला ते आधीच माहितीच आहे की! शाहिस्तेखानाची प्रचंड फटफजिती. एक मात्र सांगितलं पाहिजे. खानानं स्वराज्याचं,त्याने कब्जात घेतलेल्या भागाचं फार नुकसान केलं.लूटमार,स्त्रियांची बेअब्रू , मंदिरांची नासधूस, खेड्यापाड्यांचा विध्वंस.मात्र आश्चर्य वाटतं की,पुण्यात तो जिथं राहत होता त्या लालमहाल वाड्याच्या अगदी जवळच असलेल्या कसबागणपती मंदिराला त्यानं उपदव दिला नाही.आळंदी,चिंचवड,देहू ,थेऊर इत्यादी देवस्थानांनाही त्याने त्रास दिल्याची एकही नोंद सापडलेली नाही. शाहिस्तेखानचे मूळ नाव अबू तालिब.तो इराणी होता.मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब हे त्याचं पदव्यासकट नाव. तो औरंगजेबाचा मामा होता. शाहिस्तेखान म्हणजे औरंगजेब बादशाहची दुसरी प्रतिमाच असं त्याचं वर्णन एका मराठी बखरीत आले आहे.पण औरंगजेबातला एकही सद्गुण या मामात दिसत नाही. खानाकडचा लग्नसोहळा प्रचंड थाटामाटात दोनतीन आठवडे चालू होता.या संपूर्ण छावणीच्या अवस्थेची माहिती महाराजांना राजगडावर समजत होती.त्यांच्या मनात काहीतरी आपल्या बौद्धिक करामतीचा.उत्पटांग डाव ते खानावर टाकू पाहात होते. याचवेळी त्यांनी सोनो विश्वनाथ डबीर या आपल्या वयोवृद्ध वकीलांना पुण्यास खानाच्या भेटीसाठी पाठवावयाचे ठरविले. पाठविलेही.पण खानाने सोनो विश्वनाथांची भेट घ्यावयाचेच नाकारले,टाळले.या बिलंदर शिवाजीराजाच्या कलंदर वकिलांशी भेटायलाच नको. पुर्वी अफझलखान,सिद्दी जौहर, कारतलबखान यांची या मराठी वकिलांनी कशी दाणादाण उडविली हे त्याला नक्कीच माहिती होतं.तसे आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून असेल पण त्याने भेट नाकारली.म्हणजे परीक्षेला बसायलाच नको म्हणजे मग नापास होण्याची अजिबात भीती नसते. सोनो विश्वनाथ राजगडास परत आले.काही घडलेच नाही त्यामुळेच या महाराजांच्या डावाचा उलगडा इतिहासाला होत नाही. हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा. महाराजांचं हेर खातं अत्यंत सावध आणि कुशल होतं.त्यात एकूण किती माणसं काम करीत होती हे तपशीलवार मिळत नाही. बहिर्जी नाईक जाधव, वल्लभदास गुजराथी,सुंदरजी परभुजी गुजराथी,विश्वासराव दिघे एवढीच नावे सापडतात.पण गुप्तरितीनं वावरणाऱ्या या गुप्तहेर खात्यात बरीच माणसे असली पाहिजेत असे वाटते. परदरबारात राजकीय बोलणी करण्यासाठी जाणारे स्वराज्याचे सारे वकील एकप्रकारे गुप्तहेरच होते.मुल्ला हैदर,सखोजी लोहोकरे,कर्माजी,रघुनाथ बल्लाळ कोरडे आदी मंडळी महाराजांच्या वतीने परराज्यांत वकील म्हणून जात होती.पण तेवढीच हेरागिरीही करताना ती दिसतात.पण आणखीन एक उदाहरण या शाहिस्तेखान प्रकरणात ओझरते दिसते.लाल महालात असलेल्या छोट्याशा बागेचे काम करणारा माळी महाराजांचा गुप्तहेर असावा. लाल महालांत घडणाऱ्या अनेक घटना अगदी तपशीलाने महाराजांना समजत होत्या,हे आपल्या सहज लक्षात येते. शाहिस्तेखानाच्या ज्या ज्या सरदारांनी कोकण भागात स्वाऱ्या केल्या,त्या प्रत्येक स्वारीत शिवाजीराजांनी अत्यंत त्वरेने आणि तडफेने त्या स्वाऱ्या पार उधळून लावल्या.हे या मराठी हेरागिरीचेही यश आहे.अफाट समुदावर तर हेरागिरी करणं किती अवघड,मराठ्यांनी सागरी हेरागिरीही फत्ते केली आहे. आता तर महाराज प्रत्यक्ष लाल महालांवरच एका मध्यरात्री छापा घालणार होते.सव्वा लाख फौजेच्या गराड्यात असलेला लालमहाल पूर्ण बंदोबस्तात होता. खानाने या महालांच्या दालनांत काही काही फरक केले होते. म्हणजे बांधकामे केली होती. कुठे भिंती घातल्या होत्या,कुठे दरवाजे बांधकामाने चिणून बुजवून टाकले होते.जनान्याचे भाग , मुदपाकखाना,पुरुषांच्या खोल्या इतर खोल्या,त्यांवरील पहाऱ्यांच्या व्यवस्था इत्यादी अनेक गोष्टी लाल महालाबाहेर कोणाला तपशीलवार समजणे सोपे नव्हते.पण महाराजांनी जो लाल महालावर छापा घालण्याचा बेत केला,तो अगदी माहितगारी असलेल्या कोणा मराठी हेराच्या गुप्त मदतीनेच.जर अधिक माहिती ऐतिहासिक नव्या संशोधनाने उपलब्ध होईल,तर हे मराठी हेरखात्याच्या कर्तबगारीवर छान प्रकाश पडेल.आज मराठ्यांना मिळालेल्या यशांचा तपशील लक्षात घेऊन हेरांचे कर्तृत्त्व मापावे लागते आहे. हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा. तो अखंड उघडा आणि सावधच असावा लागतो.शिवकाळातील हेरखाते हे निविर्वाद अप्रतिम होते.हेर पक्का स्वराज्यनिष्ठ असावाच लागतो.तो जर परकीयांशी ‘देवाणघेवाण‘ करू लागला,तर नाश ठरलेलाच असतो.हेर अत्यंत चाणाक्ष , बुद्धीवान आणि हरहुन्नरी असावा लागतो.पुढच्या एका घटनेचा आत्ता नुसता उल्लेख करतो. कारवारच्या मोहिमेत मराठी हेरांनी उत्तम कामगिरी केली.पण एका हेराकडून कुचराई आणि चुका झाल्या.महाराजांनी त्याला जरब दाखविलीच. आता महाराज प्रत्यक्ष लाल महालावरच झडप घालून शाहिस्तेखानाला ठार मारण्याचा विचार करीत होते. ही कल्पनाच अफाट होती.सव्वा लाखाची छावणी.त्यात बंदिस्त लाल महाल.त्यात एका बंदिस्त दालनात खान.अन् त्याला गाठून छापा घालायचा.हे कवितेतच शक्य होते.पण असं अचाट धाडस महाराजांनी आखले. हल्लीच्या युद्धतंत्रात ‘कमांडोज' नावाचा एक प्रकार सर्वांना ऐकून माहिती आहे.महाराजांचे सारेच सैनिक कमांडोज होते.पण त्यात पुन्हा अधिक पटाईत असे जवान महाराजांपाशी होते. त्याचे प्रत्यंतर लाल महालाच्या छाप्यात येते. ‘ऑपरेशन लाल महाल' असेच या छाप्याला नाव देता येईल.ही संपूर्ण मोहिम मुख्यत: हेरांच्या करामतीवर अवलंबून होती.सारा तपशील एखाद्या स्वतंत्र प्रबंधातच मांडावा लागेल. पण या ऑपरेशन लाल महालचा अभ्यास महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांनिशी इतका बारकाईने केला आहे की,आपले मन या एकविसाव्या शतकाच्या वेशीत थक्क होऊन जाते.या गनिमी छाप्यासाठी महाराजांनी वेळ निवडली मध्यरात्रीची.मराठ्यांचे बहुसंख्य छापे रात्रीच्या अंधारातलेच आहेत.लाल महालावरच्या छाप्यासाठी महाराजांनी चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र निवडली.पुढच्या उजाडत्या चैत्र शुद्ध नवमीस प्रभू राम जन्मास येणार होते! रामनवमी. याच महिन्यात मोगलांचे पवित्र रोज्याचे उपवास सुरू झाले होते. छाप्याच्या रात्री सहावा रोजा होता.आकाशातला चंद्र छाप्याच्या सुमारास पूर्ण मावळणार होता. पण याचा इथं कुठं संबंध आला ? आला ना! मोगली सैन्य रोजाच्या उपवासामुळे रात्र झाल्यावर भरपूर जेवण करून सुस्तावणार हा अंदाज खरा ठरणार होता. खुद्द शाहिस्तेखानाच्या कुटुंबात हीच स्थिती असणार.शिवाय दिवस उन्हाळ्याचे.शेजारीच असलेल्या मुठा नदीला पाणी जेमतेमच असणार.छापा घालून झटकन ही नदी ओलांडून भांबुडऱ्याच्या (सध्याचे शिवाजीनगर) भागात आपल्याला पसार होता येणार आणि अगदी जवळ असलेल्या सिंहगडावर पोहोचता येणार हे लक्षात घेऊन महाराजांनी हे ऑपरेशन आखले होते. छाप्यातल्या कमांडोजनी कसेकसे,कुठेकुठे,कायकाय करायचे ते अगदी निश्चित केलेले होते.संपूर्ण तपशीलच इतका रेखीव आहे की,या ऑपरेशन लाल महालची आठदहावेळा महाराजांनी राजगडावर ‘रिहर्सल' केली असावी की काय असा दाट तर्क-तर्कच नव्हे खात्री होते. कारण जे घडले ते इतके बिनचूक घडले की,असे घडणे कधीही ऐत्यावेळेला होत नसते.आपण तपशील पाहूच. लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच. राजगडावरून महाराज सुमारे एक हजार सैनिक घेऊन निघाले. (दि.५ एप्रिल १६६३,चैत्र,शुद्ध अष्टमी,रात्री) ते कात्रजचे घाटात आले.कात्रज घाट ऐन पुण्याच्या दक्षिणेला तेरा-चौदा किलोमीटरवर आहे.महाराजांनी या घाटात काही मावळी टोळ्या ठेवल्या.सुमारे पाचशे मावळे घेऊन ते पुण्याच्या रोखाने निघाले. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे.ती अशी,शाहिस्तेखानाने आपल्या पुण्यातल्या छावणीच्या भोवती रात्रीची गस्त घालण्याकरता आवश्यक तेवढे आपले सैनिक रोजी ठेवले होते. यात काही मराठी सरदार आणि सैनिकही होते.मोगलांच्याकडे नोकरी करणारी ही मंडळी खानाने मुद्दाम गस्तीकरता छावणीच्या दक्षिणअंगास रात्रीची फिरती ठेवली होती.हा रिवाज खान पुण्यात आल्यापासून चालू असावा असे वाटते.या सैनिकांचे काम वास्तविक सकाळी उजाडेपर्यंत अपेक्षित असे.पण पुढेपुढे यात ढिलाई होत गेलेली आढळून येते.हे गस्तवाले साधारणत: मध्यरात्री दिडदोन वाजपर्यंतच गस्त घालीत.नंतर हळूच छावणीत परतून येत.ही गोष्टी महाराजांच्या हेरांच्या लक्षात आली.महाराजांनी या संबंध गस्तीचाच अचूक फायदा टिपला. गस्त घालायला जाणारे लोक छावणीभोवतीच्या मोगली चौकीदारांना माहित झालेले होते. महाराजांनी याचा फायदा घेतला. आपल्या बरोबरच्या सुमारे पाचशे सैनिकांपर्यंत एक जरा मोठी टोळी त्यांनी आपल्यापाशी ठेवली आणि बाकीच्या मराठ्यांना, ठरविल्याप्रमाणे पुढच्या उद्योगास छावणीत पाठविली.हे बिलंदर सैनिक,जणू काही आपणच मोगली छावणीभोवती गस्त घालणारे नेहमीचेच लोक आहोत अशा आविर्भावात छावणीत प्रवेशू लागले.चौकीदारांनी त्यांना हटकलेही. पण ‘आम्ही रोजचेच गस्त घालणारे.आम्हाला ओळखलं नाही ?गस्तीहून परत आलो! असा जवाब धिटाईनं करून आत प्रवेशले.चौकीदारांना वाटलं की होय,ही रोजचीच गस्तीची मंडळी.परत आली आहेत.चौकीदारांची अशी बेमालूम गंमत करून हे सैनिक ठरल्याप्रमाणे लाल महालाच्या पूवेर्च्या बाजूस पोहोचले.येथे लाल महालाला किल्ल्यासारखा तट नव्हता.उंच भिंत होती.त्या भिंतीत जाण्यायेण्याचा एक दरवाजा होता.पण खानानं तो दगडामातीत बांधकाम करून बंद करून टाकला होता. या आलेल्या मराठी टोळीनं अतिशय सावध दक्षता घेऊन या बंद केलेल्या दाराच्या बांधकामास भगदाड पाडावयास सुरुवात केली.माणूस आत जाईल एवढं भगदाड.हा उद्योग करीत असताना किती सावधपणे त्यांनी केला असेल याची कल्पना येते. भगदाड हळूहळू पुरेसे पडले. महाराज येईपर्यंत मावळे तेथेच रेंगाळत राहिले.अर्थात सभोवती सामसूमच होती. ज्या पद्धतीने हे मावळे सैनिक इथपर्यंत आले,त्याच पद्धतीने मागोमाग महाराजही आपल्या टोळीनिशी आले.महाराजांना आपलाच लाल महाल चांगला परिचयाचा होता.खानाने केलेले बांधकामाचे बदलही त्यांना समजले होते.या भगदाडातून प्रथम महाराजांनी आत प्रवेश केला. इथे महाराजांचा एक अंदाज चुकला भगदाडाच्या आत लाल महालाचे परसांगण होते. तेथे काही पाण्याचे बांधीव हौद होते. लाल महालाची ही पूवेर्कडील बाजू होती.या बाजूने लाल महालातून परसांगणात यावयास दोन दारे होती.दोहीत अंतर होते. यातील एक दार असेच दगडामातीने चिणून बंद केलेले होते आणि दुसऱ्या दारालगत एक पडवी उभी करून खानाच्या कुटुंबाचा खासा मुदपाकखाना म्हणजे स्वयंपाक करण्याची जागा,तयार केली होती.तेथील आचारी पाणके इत्यादी सुमारे तेरा-चौदा नोकर तेथेच मुदपाकखान्यात रात्री झोपत असत.ते सध्या रोजा असल्यामुळे पहाटे बरेच लवकर उठत आणि कामाला लागत.हे नोकरचाकर अजून उठलेले नसावेत,असा महाराजांचा अंदाज होता.पण तो चुकला आज ते लवकर उठून कामाला लागत होते.आणि महाराजांना लांबूनच हे लक्षात आले.आता? आता ते लोक आपली चाहूल लागली तर आरडाओरडा करतील अन् साराच डाव वाया जाईल याची कल्पना महाराजांना आली. आता ? आता फक्त एकच करणं शक्य होतं.एकदम मुदपाकखान्यात मावळ्यांनी गुपचूप घुसायचं अन् साऱ्या नोकरांना कापून काढायचं. निरुपाय होता. हे करणं भाग होतं.महाराजांनी आपल्या मावळ्यांना इशारा केला आणि सर् सर् सर् सर् जाऊन मावळ्यांनी या साऱ्या नोकरांना कापून काढलं. चिणलेल्या त्या दुसऱ्या दरवाजालाही भगदाड पाडून महाराज आत घुसले. मिणमिणत्या दिव्यांच्या पुसट उजेडात फारसं दिसत नव्हतं. मुदपाकखान्याच्या दाराच्या आतल्या बाजूला जो पहारेकरी होता त्याच्यावर पहिला घाव पडला. तो ठार झाला.आणि त्याच्या ओरडण्याच्या आवाजानं माडीवर असलेला शाहिस्तेखान एकदम खडबडून उठला.तो धनुष्यबाण घेऊन माडीवरून खाली अंगणात धावत आला. आणि नेमका महाराजांच्या समोरच तो आला.त्याला काहीच कल्पना नव्हती.त्याचा एक मुलगा,अबुल फतहखान जवळच्याच दालनांत झोपलेला होता.तो खडबडून बाहेर आला. अंगणात,आपल्या वडिलांवर कोणीतरी घाव घालू पाहतोय हे त्याच्या लक्षात आलं. तो वडिलांना वाचविण्यासाठी पुढं आडवा आला अन् महाराजांच्या तलवारीखाली ठार झाला. खान घाईघाईनं परत माडीकडे पळत सुटला. हा विजय अभ्यासाचा…….. ही चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र. लाल महालात अशी ज्वालामुखीसारखी अचानक उफाळली.खान वाचला. सिंहगडकडे सुखरुपपणे पसार झालेल्या शिवाजीमहाराजांना हा तपशील नंतर समजला. ते जरा खिन्न झाले. कारण जर खान, म्हणजे प्रति औरंगजेबच मारला गेला असता तर केवळ मोगल साम्राज्यातच नव्हे,तर इराण, तुर्काण इतकंच नव्हे तर रुमशाम पावेतो मराठ्यांचा गनिमीकावा रणवाद्यांसारखा दणाणला असता. गनिमी कावा हे मराठ्यांचे खास खास युद्धतंत्र आहे.या युद्धतंत्राचा अर्वाचीन महाआचार्य म्हणजे चीनचा माओत्सेतुंग आणि व्हिएटनामचा होचिमिन. ते सत्यही आहे. पण आपण माओ आणि मिन यांनी स्वत: वापरलेल्या त्यांच्या जीवनातील गनिमी काव्याचा आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा तैलनिक अभ्यास जरुर करून पाहावा. लाल महालावरील महाराजांच्या छाप्याच्या बाबतीत मोगलांची प्रतिक्रिया काय ? फक्त घाबरट. दहशत.भाबड्या कल्पनांची विनोदी कारंजी.याच वेळी दिल्लीमध्ये दोन युरोपीय डॉक्टर्स राहत होते. डॉ. थिवेनो आणि डॉ. सिडने ओवेन.या दोघांनी या लाल महाल छापा प्रकरणी लिहून ठेवलं आहे. ‘ या छाप्याची दहशत एवढी निर्माण झाली आहे की, शिवाजी हा नक्की चेटूकवाला असावा असे लोकांना वाटते. त्याला पंख असावेत.त्याला गुप्त होता येत असावे म्हणजे केवळ अफवा ,कंड्या आणि अतिशयोक्ती. हा सारा भाबडेपणा होता. डोळसपणाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास कुणीच करीत नव्हतं.आज आपण तो केला पाहिजे. लष्करी अभ्यासकांनी आणि अनुभवी लष्करी पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या या युद्धपद्धतीचा डोळ्यात तेल घालून अभ्यास केला तर आमच्या हातून पुन्हा ‘कारगिल‘ सारख्या चुका होणार नाहीत. ‘तेजपूर‘ सारखा गाफिलपणा होणार नाही. आणि आमच्या संसदेवरच म्हणजे आमच्या राष्ट्राच्या हृदयावरच अतिरेकी छापा टाकणार नाहीत. पाहा पटते का ? शाहिस्तेखान मात्र कायमचा दु:खी झाला. त्याला आपल्या पराभवापेक्षा भयंकर अन् कायमची होत राहणारी थट्टा , कुचेष्टा असह्य होत असणार. प्रत्येक घासाला त्याला आठवण होत असेल शिवाजीमहाराजांची. उजव्या हाताची तीन बोटेच तुटली ना! खानाच्या बाबतीत आणखी काही दु:खी घटना लाल महालात आणि एकूण दख्खनच्या भूमीवर घडल्या. लाल महालात उसळलेल्या भयंकर कल्लोळात त्याची एक बायको ठार झाली. त्याचा मुलगा अबुल फतेखान हा तर महाराजांच्या हातूनच मारला गेला. या भयंकर दंगलीत त्याची एक मुलगी नाहिशी झाली. तिचे काय झाले हे कोणालाही आणि इतिहासालाही कधीच समजले नाही. पुढच्या काळात (म्हणजे इ. १६९५ ) प्रख्यात मराठा सेनापती संताजी घोरपडे याचे हातून याच शाहिस्तेखानचा एक मुलगा , हिम्मतखान हा तमीळनाडूत जिंजीच्या मार्गावर असलेल्या जंगलातील युद्धात मारला गेला. शाहिस्तेखान दीर्घायुषी होता. पण या साऱ्या दु:खांची त्याला या दीर्घायुष्यात भयंकर वेदना सहन करावी लागली. त्याने बांधलेली एक साधी पण सुंदर मशीद औरंगाबादेत आहे. पुण्यातील मंगळवार पेठेस शाहिस्ताखान पेठ असे नाव पडले होते. प्रचंड सैन्य,खजिना आणि प्रचंड युद्धसाहित्य हाताशी असूनही त्याला मराठ्यांवर तीन वर्षाच्या दीर्घकाळात एकही मोठा विजय मिळवता आला नाही.चाकण जिंकले. त्याला त्याने इस्लामाबाद असे नाव दिले.मोगल साम्राज्यासारख्या एका प्रचंड सत्तेचा तो सरसेनापती म्हणून महाराष्ट्रावर चालून आला.पण त्याच्या यशाच्या पारड्यात चिंचुक्याएवढेही यश पडले नाही. माणसाला कष्ट करून अपयश आले,तर समजू शकते.कारण त्या कष्टातून शिक्षण मिळते.पण केवळ खुचीर्वर बसून गडगंज पगार खाणाऱ्या माणसाने काहीही न करता चकाट्या पिटण्यात आयुष्य घालविले तर ते त्याचेही आणि कार्याचेही अफाट नुकसान असते. अशी नुकसानी चाललेली आपण आजच्या जीवनात अनेक संस्थांत आणि मुख्यत: शासकीय नोकरशाहीत पाहतो.अशा माणसांच्या कारभारातून ‘मेरा भारत महान‘ जागतिक महासत्तांच्या शेजारी बसू शकेल काय? सर्वच क्षेत्रांत आपल्याला केवढा प्रचंड पल्ला गाठायचा आहे! घोषणा तर आपण नेहमीच ऐकतो.त्या घोषणा शेवटी विनोदी ठरतात.अब्जावधी रुपयांची नासाडी करून,लष्करी छावणीत आपल्या मुलींची अफाट खर्चाने लग्न साजरी करणारे शाहिस्तेखान आम्हाला परवडणार नाहीत.आपल्याला तातडीने गरज आहे.संताजी घोरपड्यांची,हंबीरराव मोहित्यांची आणि येसबा दाभाड्यांची.रागावू नका.हा मी उपदेश करत नाही. आजच्या तरुणांकडून एक माझ्यासारखा ऐंशीवर्ष ओलांडलेला नागरिक अपेक्षा करतो आहे.आकांक्षा ठेवतो आहे. त्या पूर्ण व्हाव्यात,त्यापुढती गगन ठेंगणे, माझ्या तरुण मित्रांनो! हा विजय अभ्यासाचा…….. ही चैत्र शुद्ध अष्टमीची मध्यरात्र. लाल महालात अशी ज्वालामुखीसारखी अचानक उफाळली.खान वाचला. सिंहगडकडे सुखरुपपणे पसार झालेल्या शिवाजीमहाराजांना हा तपशील नंतर समजला. ते जरा खिन्न झाले. कारण जर खान, म्हणजे प्रति औरंगजेबच मारला गेला असता तर केवळ मोगल साम्राज्यातच नव्हे,तर इराण, तुर्काण इतकंच नव्हे तर रुमशाम पावेतो मराठ्यांचा गनिमीकावा रणवाद्यांसारखा दणाणला असता. गनिमी कावा हे मराठ्यांचे खास खास युद्धतंत्र आहे.या युद्धतंत्राचा अर्वाचीन महाआचार्य म्हणजे चीनचा माओत्सेतुंग आणि व्हिएटनामचा होचिमिन. ते सत्यही आहे. पण आपण माओ आणि मिन यांनी स्वत: वापरलेल्या त्यांच्या जीवनातील गनिमी काव्याचा आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा तैलनिक अभ्यास जरुर करून पाहावा. लाल महालावरील महाराजांच्या छाप्याच्या बाबतीत मोगलांची प्रतिक्रिया काय ? फक्त घाबरट. दहशत.भाबड्या कल्पनांची विनोदी कारंजी.याच वेळी दिल्लीमध्ये दोन युरोपीय डॉक्टर्स राहत होते. डॉ. थिवेनो आणि डॉ. सिडने ओवेन.या दोघांनी या लाल महाल छापा प्रकरणी लिहून ठेवलं आहे. ‘ या छाप्याची दहशत एवढी निर्माण झाली आहे की, शिवाजी हा नक्की चेटूकवाला असावा असे लोकांना वाटते. त्याला पंख असावेत.त्याला गुप्त होता येत असावे म्हणजे केवळ अफवा ,कंड्या आणि अतिशयोक्ती. हा सारा भाबडेपणा होता. डोळसपणाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास कुणीच करीत नव्हतं.आज आपण तो केला पाहिजे. लष्करी अभ्यासकांनी आणि अनुभवी लष्करी पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या या युद्धपद्धतीचा डोळ्यात तेल घालून अभ्यास केला तर आमच्या हातून पुन्हा ‘कारगिल‘ सारख्या चुका होणार नाहीत. ‘तेजपूर‘ सारखा गाफिलपणा होणार नाही. आणि आमच्या संसदेवरच म्हणजे आमच्या राष्ट्राच्या हृदयावरच अतिरेकी छापा टाकणार नाहीत. पाहा पटते का ? शाहिस्तेखान मात्र कायमचा दु:खी झाला. त्याला आपल्या पराभवापेक्षा भयंकर अन् कायमची होत राहणारी थट्टा , कुचेष्टा असह्य होत असणार. प्रत्येक घासाला त्याला आठवण होत असेल शिवाजीमहाराजांची. उजव्या हाताची तीन बोटेच तुटली ना! खानाच्या बाबतीत आणखी काही दु:खी घटना लाल महालात आणि एकूण दख्खनच्या भूमीवर घडल्या. लाल महालात उसळलेल्या भयंकर कल्लोळात त्याची एक बायको ठार झाली. त्याचा मुलगा अबुल फतेखान हा तर महाराजांच्या हातूनच मारला गेला. या भयंकर दंगलीत त्याची एक मुलगी नाहिशी झाली. तिचे काय झाले हे कोणालाही आणि इतिहासालाही कधीच समजले नाही. पुढच्या काळात (म्हणजे इ. १६९५ ) प्रख्यात मराठा सेनापती संताजी घोरपडे याचे हातून याच शाहिस्तेखानचा एक मुलगा , हिम्मतखान हा तमीळनाडूत जिंजीच्या मार्गावर असलेल्या जंगलातील युद्धात मारला गेला. शाहिस्तेखान दीर्घायुषी होता. पण या साऱ्या दु:खांची त्याला या दीर्घायुष्यात भयंकर वेदना सहन करावी लागली. त्याने बांधलेली एक साधी पण सुंदर मशीद औरंगाबादेत आहे. पुण्यातील मंगळवार पेठेस शाहिस्ताखान पेठ असे नाव पडले होते. प्रचंड सैन्य,खजिना आणि प्रचंड युद्धसाहित्य हाताशी असूनही त्याला मराठ्यांवर तीन वर्षाच्या दीर्घकाळात एकही मोठा विजय मिळवता आला नाही.चाकण जिंकले. त्याला त्याने इस्लामाबाद असे नाव दिले.मोगल साम्राज्यासारख्या एका प्रचंड सत्तेचा तो सरसेनापती म्हणून महाराष्ट्रावर चालून आला.पण त्याच्या यशाच्या पारड्यात चिंचुक्याएवढेही यश पडले नाही. माणसाला कष्ट करून अपयश आले,तर समजू शकते.कारण त्या कष्टातून शिक्षण मिळते.पण केवळ खुचीर्वर बसून गडगंज पगार खाणाऱ्या माणसाने काहीही न करता चकाट्या पिटण्यात आयुष्य घालविले तर ते त्याचेही आणि कार्याचेही अफाट नुकसान असते. अशी नुकसानी चाललेली आपण आजच्या जीवनात अनेक संस्थांत आणि मुख्यत: शासकीय नोकरशाहीत पाहतो.अशा माणसांच्या कारभारातून ‘मेरा भारत महान‘ जागतिक महासत्तांच्या शेजारी बसू शकेल काय? सर्वच क्षेत्रांत आपल्याला केवढा प्रचंड पल्ला गाठायचा आहे! घोषणा तर आपण नेहमीच ऐकतो.त्या घोषणा शेवटी विनोदी ठरतात.अब्जावधी रुपयांची नासाडी करून,लष्करी छावणीत आपल्या मुलींची अफाट खर्चाने लग्न साजरी करणारे शाहिस्तेखान आम्हाला परवडणार नाहीत.आपल्याला तातडीने गरज आहे.संताजी घोरपड्यांची,हंबीरराव मोहित्यांची आणि येसबा दाभाड्यांची.रागावू नका.हा मी उपदेश करत नाही. आजच्या तरुणांकडून एक माझ्यासारखा ऐंशीवर्ष ओलांडलेला नागरिक अपेक्षा करतो आहे.आकांक्षा ठेवतो आहे. त्या पूर्ण व्हाव्यात,त्यापुढती गगन ठेंगणे, माझ्या तरुण मित्रांनो! दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा. सूर्याच्या रथाला निमिषाचीही विश्रांती नसते.अगदी खग्रास ग्रहण लागले तरीही सूर्यरथ चालतच असतो. शिवाजीमहाराजांचे मन आणि शरीर हे असेच अविरत करताना दिसते.भव्यदिव्य,उदात्त पण व्यवहार्य पाहणारा हा राजा उपभोगशून्य लोकनेता होता.पुढे एकदा रायगडावर रावजी सोमनाथ या नावाचा महाराजांचा एक सरदार महाराजांना म्हणाला, ‘महाराज,आपण राज्याचा विस्तार खूपच केला आहे. परगणे,किल्ले,बंदरे आणि शाही ठाणी कब्जात आणली.आपले अंतिम नेमके उदिष्ट्य तरी काय आहे? आपण कुठे थांबणार आहोत ? ‘या आशयाचा रावजीनं पुसला. त्यावर महाराजांनी उत्तर दिले. त्याचा आशय असा, ‘राहुजी, सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघा मुलुख आणि महाक्षेत्रे मुक्त करावीत ऐसा आमचा मानस आहे.‘ म्हणजे अवघा भारत मुक्त करावा,त्याचे हिंदवी स्वराज्य बनवावे,असा महाराजांचा मनोसंकल्प होता.शून्यातून अवघ्या गगनाला गवसणी घालणारा हा संकल्प आपण कधी विचारात घेतो का? हा महाराजांच्या मनातील विचार पोर्तुगीजांच्या लिस्बन येथील ऐतिहासिक दप्तरखान्यातील एका पोर्तुगीज पत्रात डॉ.पांडुरंग पिसुलेर्कर यांच्या अभ्यासात आला.मला स्वत: डॉ. पिसुलेर्करांनीच हा सांगितला. अन् म्हणाले, ‘शिवाजीराजाचा हा ध्येयवाद आज आम्ही अभ्यासला पाहिजे. अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांतून दिसणारे शिवचरित्र सूचक उपनिषदांसारखे आहे। आम्हाला त्यावर भाष्य करणारा भाष्यकार हवा आहे.पुढे राजस्थानात रत्नाकर पंडित नावाचा एक विद्वान होता. वास्तविक तो महाराष्ट्रापासून त्या काळात हजार मैल दूर असणारा माणूस.पण द्रष्टा प्रतिभावंत.त्याने छत्रपती शिवाजीराजांचे वर्णन एकाच शब्दात केले आहे.तो म्हणतो,हा शिवाजीराजा कसा ? ‘ दिल्लींदपदलिप्सव :’ म्हणजे हा शिवाजीराजा दिल्लीपद आपल्या कब्जात आणू पाहणारा आहे.उत्तुंग स्वप्न पाहणाऱ्यांना झोपा काढून चालत नाही.ते सदैव जागे आणि सक्रिय असतात.महाराज तसेच होते. असो,आता पुन्हा एकदा शाहिस्तेखानाच्या छावणीत आपण डोकावू. शाहिस्तेखानवरती महाराजांचा छापा पडला.दि. ६ एप्रिल १६६३. यावेळी औरंगजेब बादशाह काश्मिरात श्रीनगर येथे होता. त्याला या मराठी छाप्याची बातमी दि. ८ मे १६६३ या दिवशी कळली.तो चकीतच झाला. चिडलाही.तो त्वरित दिल्लीस परतला.शाहिस्तेखानाची ही तीन वर्षांची मोहिम पूर्ण वाया गेली होती.तो विचार करीत होता. आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा? प्रथम त्याने शाहिस्तेखान मामांना पत्र पाठविले की,तुमची बदली आसाम-बंगाल सरहद्दीवर ढाका या ठिकाणी करण्यात येत आहे.तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावे.त्या काळी या भागात कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एकप्रकारे बादशाहांची नाराजी आणि शिक्षाही समजली जात असे.हा बदलीचा हुकूम मिळाल्यावर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचे पत्र पाठवून विनंती केली की,मला एकवार पुन्हा संधी द्या.मी शिवाचा बिमोड करतो. (पण माझी ढाक्यास बदली करू नका.) पण बादशाहने पुन्हा जरा कडक शब्दांत खानास हुकूमावले की,ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा. आता निरुपाय होता.दु:खी खान ढाक्याकडे रवाना झाला. याच काळात आसामच्या राज्यात लछित बडफुकन या नावाचा एक जबरदस्त सेनापती आसामच्या ओहोम राजघराण्याच्या पदरी होता.हा लछित आपल्या संताजी वा धनाजीसारखाच अचाट कर्तृत्त्वाचा सेनापती होता. आसामच्या या स्वतंत्र राज्याचे मोगलांशी सततच युद्ध चालू होते. लछितने तर दिल्लीला अगदी हैराण केले होते.या लछित बडफुकनला शाहिस्तेखान आता आसामवरती येणार असल्याच्या बातम्या मिळाल्या.दक्षिणेतील शिवाजीराजाने या खानाला फजित करून पिटाळला आहे हे लछितला तपशीलवार कळले असावे;असे दिसते. ‘बडफुकन‘ या शब्दाचा अर्थ ‘बडा सेनापती‘ मुख्य सेनापती असा आहे.या लछितने शाहिस्तेखानाला एक पत्र पाठविल्याची नोंद, ‘शाहिस्तेखानकी बुरंजी‘ या नावाच्या एका आसामी बखरीत आहे.लछित या खानाला लिहितो आहे. ‘अरे,तू दक्षिणेस गेला होतास.तेथे असलेल्या शिवाजीराजाने तुझी पार फजिती केली.तुझी बोटेच तोडली म्हणे!आता तू आमच्यावर चालून येतो आहेस.आता तुझे डोके सांभाळा ? शिवाजीमहाराजांची करामत पार आसामपर्यंत त्याकाळी कशी पोहोचली होती,याचे हे उदाहरण आहे. आज मात्र या आसामातील जनतेला,किंबहुना भारतातील अनेक प्रांतांना शिवचरित्र माहितच नाही.पण रागावयाचे कशाकरिता आपण?आपल्याला तरी लछित बडफुकन कुठं माहिती आहे? पंजाबच्या थोर रणजितसिंहाचे एकतरी लहानसे स्मारक महाराष्ट्रात आहे का ? अजूनही आम्ही भारताच्या इतिहासाचा अभ्यास कुठे करतो आहोत? मित्रांनो,मी एक लहानसा प्रयत्न केला.ओरिसा म्हणजे उडिया. आपल्याच भारताचा हा सांस्कृतिक श्रीमंती असलेला देश. उडिया भाषेत शिवचरित्र मी चार वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले.कटक येथे प्रकाशान झाले.गेल्या चार वर्षात मिळून या शिवचरित्राच्या पन्नास प्रतीही संपलेल्या नाहीत.अधिक काय लिहावे ? शाहिस्तेखानास आसामच्या मोहिमेतही यश मिळाले नाही. लछितने त्याला जणू पुन्हा एकदा शिवाजीराजांची आठवण करून दिली. मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान! शाहिस्तेखानाच्या फजितीची वार्ता हिंदुस्थानभर पसरली. महाराजांचे हे ऑपरेशन लाल महाल इतके प्रभावी,चमत्कृतीपूर्ण,धाडसी आणि अद्भूत घडले की,साऱ्या मोगल साम्राज्यात तो एक अति आश्चर्यकारक डाव ठरला.सव्वा लाख फौजेच्या मोगल छावणीत घुसून खुद्द सेनापती शाहिस्तेखानावर पडलेला हा मूठभर मराठ्यांचा छापा म्हणजे ढगफुटीसारखाच भयंकर प्रकार होता. ‘शिवाजीराजा‘ म्हणजे, महंमद घोरीपासून (१२ वं शतक) ते थेट औरंगजेबापर्यंत (१७ वं शतक) झाडून साऱ्या सुलतानांच्या तख्तांना भूकंपासारखा हादरा देणारा विस्फोट होता.या सुलतानांपुढे ठाकलेलं ते आव्हान होतं.हे आव्हान म्हणजे केवळ शारीरिक दांडगाई नव्हती.त्यामागे एक विलक्षण प्रभावी तत्त्वज्ञान होतं. परित्राणाय् साधुनाम् त्यात मानवतेचं उदार आणि विशाल असं मंगल आश्वासनही होतं. लाल महालावरील महाराजांच्या या छाप्यात शाहिस्तेखानची एक मुलगी हरवली.तिचे नेमके काय झालं ते कधीच कोणाला कळलेलं नाही.पण अनेकजण विशेषत: शाही कुटुंबातली माणसं अन् विशेषत: औरंगजेबाची बहीण जहाँआरा बेगम यांची अशी समजूत झाली होती की,सीवाने ही मुलगी पळवून नेली. हे सर्वस्वी असत्य होतं.पुरावा तर अजिबातच नव्हता.एक गोष्ट लक्षात येते की,स्वत: औरंगजेबाने असा आरोप शिवाजीराजांवर कधीही केलेला,नंतरसुद्धा सापडत नाही.जहाँआराच्या पत्रांत मात्र ती हा आरोप अनेकदा करते.जाणूनबुजून गैरसमज करून घेणाऱ्यांना व देणाऱ्यांना दिव्यदृष्टी देणारा ‘प्रॉफेट‘ अजून जन्माला आलेला नाही. शाहिस्तेखानावर पडलेला भयानक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दु:खदायक काही राजपूत सरदारांना वाटला. विशेषत: जसवंतसिंह या जोधपूरच्या सरदाराला वाटला. लाल महालातील हा फजितीदायक छापा घडल्यानंतर (इ.स.१६६३ एप्रिल ६ ) या जसवंतसिंहाने पुण्याशेजाच्या सिंहगडावर हल्ला चढविला. त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंह हाडा (बुंदीमहाराजा) हाही होता.सिंहगडावर मराठी सैन्य किती होते ते नक्की माहिती नाही.पण या मोगली राजपूत सिंहांच्यापेक्षा मराठे नक्कीच, खूपच कमी होते. या सिंहांना सिंहगड अजिबात मिळाला नाही.त्यांनी गडाला वेढा घातला.आत्ताच सांगून टाकतो की,हा वेढा एप्रिल १६६३ पासून २८ मे १६६४ पर्यंत चालू होता. सिंहगड अभेद्य राहिला.याच काळात (दि. ५ ते १० जानेवारी १६६४ ) महाराजांचा सुरतेवर छापा पडला.हे मी आत्ताच का सांगतोय ? सुरतेवरच्या छाप्याकरता महाराज ससैन्य याच सिंहगडाशेजारून म्हणजेच जसवंतसिंगच्या सिंहगडला पडलेल्या वेढ्याच्या जवळून सुमारे ५ कि.मी.अंतरावरून गेले.या गोष्टीचा,वेढा घालणाऱ्या या दोन राजपूत सिंहांना पत्ताही लागला नाही. याचा अर्थ असाच घ्यायचा का की,सिंहगडाला झोपाळू मोगल राजपुतांचा वेढा पडला होता अन् त्यांच्या बगलेखालून महाराज सुरतेवर सूर मारीत होते. मोगलांचे हेरखाने ढिसाळ होते हा याचा अर्थ नाही का! इथे थोडा भूगोलही लक्षात घ्यावा. पुणे ते नैऋत्येला ३० कि.मी.वर सिंहगड आहे.सिंहगडच्या असाच काहीसा नैऋत्येलाच २० कि. मी.वर राजगड आहे.महाराज सुरतेसाठी राजगडावरून सिंहगडच्या शेजारून पश्चिमअंगाने, लोणावळा,कसारा घाट,ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर या मार्गाने सुरतेकडे गेले. त्र्यंबकेश्वरला महाराज दि. 3 १ डिसेंबर १६६३ या दिवशी होते. पुण्यातही मोगलांची लष्करी छावणी यावेळी होतीच.राजगड ते सूरत हे सरळ रेघेत अंतर धरले तरी ३२५ कि.मी.आहे.म्हणजे नकाशात असे दिसेल की, सिंहगडचा वेढा आणि पुण्याची मोगल केंद छावणी याच्या पश्चिमेच्या बाजूने महाराज एखाद्या बाणासारखे दोनशे कि.मी. मोगली अमलाखालील मुलूखांत घुसले.पुणे आणि सिंहगड येथे असलेल्या मोगली छावण्यांना याचा पत्ता नाही. हे मी सांगतो आहे , यातील मुख्य मुद्दा आपल्या लक्षात आला ना ? अगदी सरळ गोष्ट आहे की, कमीतकमी वेळांत महाराज या धाडसी मोहिमा यशस्वी करीत आहेत,त्या कोणाच्या भरवशावर ? हेरांच्या भरवशावर! हेरांनी आणलेल्या बिनचूक माहितीवर त्यांचे आराखडे आखले जात होते. त्या हेरांच्या कामगिरीचा तपशील आपल्याला मिळत नाही.मोहिमेचे यश आणि मोहिमेचे तपशील लक्षात घेऊनच हेरांनी केलेल्या कामगिरीचा अंदाज आपल्याला करावा लागतो.प्रसिद्धी आणि मानसन्मान यांपासून अलिप्त राहून हे हेर आपापली कामे धाडसाने अन् कित्येकदा जिवावर उदार होऊन अन् कित्येकदा जीव गमावूनही कडव्या निष्ठेने अन् कोणाच्या कौशल्याने करीत होते. अशी माणसे साथीला असली तरच शिवाजीमहाराज सार्वभौम सिंहासन निर्माण करू शकतात. नाहीतर ती अयशस्वी होतात. आठवलं म्हणून सांगतो, पेशवाईच्या अखेरच्या काळात चतुरसिंह भोसले आणि इंग्रजांच्या प्रारंभीच्या काळात क्रांतीकारक उमाजी नाईक खोमणे हे दोन पुरुष शिवाशाहीचा विचार डोक्यात ठेवून धडपडत होते. दोघांनाही अखेर मृत्युलाच सामोरे जावे लागले.पहिला आमच्याच कैदेत तळमळत मरण पावला, दुसरा इंग्रजांच्या कैदेत पडला आणि फाशी गेला.हे दोन अयशस्वी वीर शिवाजी महाराजच नव्हते का? पण यश आले नाही. आमच्या तरुणांनी या यशस्वी आणि अयशस्वी शिवाजींचा अभ्यास केला पाहिजे.अज्ञातात राहून स्वराज्याची कामे करणाऱ्या शिवकालीन हेरांचे वाचन,मनन आणि अनुकरणही आम्ही केले पाहिजे.असं केल्यानं काय होईल? आमच्या आकांक्षांना खरंच गगन ठेंगणे ठरेल! शत्रूच्या वर्मावरती घाव. महाराज माणसं माणिकमोत्यांप्रमाणेच निरखून पारखून घेत असत.त्यांत ते ९९ टक्के यशस्वीही ठरले.पण तरीही दक्षता घ्यायची ती घेतच असत. सिंहगडाला जसवंतसिंहाचा वेढा पडण्यापूर्वी का कोण जाणे,पण सिंहगडावरती फितवा फितुरीचा संशय शिवाजीमहाराजांच्या मनांत डोकावला.त्यावेळी महाराज स्वत: सिंहगडावर जाऊन आले.त्यांच्या पद्धतीनं त्यांनी गडाची तबियत तपासली. अन् त्यांच्या लक्षात आलं की, गडाची तबियत एकदम खणखणीत आहे.नंतर गडाची ही निरोगी तबियत प्रत्ययासही आली.एप्रिल प्रारंभ ते २८ मे ६४ पर्यंत मोगली राजपूत सरदार जसवंतसिंह राठोड सिंहगड घेण्यासाठी गडाला १३ महिने धडका देत होता.गड अभेद्यच राहिला.झेंडा फडकतच राहिला. सिंहांना मात्र टेंगळे आली. स्वराज्याचा हा बिकट डाव खेळत असताना प्रामाणिक निष्ठावंत आणि कष्टाळू अशा प्रजेने आणि सेनेने महाराजांना जी साथ केली , त्याला तोड नाही.प्रजेनंही साथ दिली याला पुरावा काय ? शाहिस्तेखानच्या आणि नंतर मिर्झाराजा जयसिंहाच्या स्वराज्यावरील चाललेल्या अतिरेकी आक्रमणांच्या काळात मावळातील प्रजा सर्व सोसून , शरणागतीचा विचारही मनात न आणता लोहस्तंभासारखी उभी राहिली. प्रजा म्हणजेच जनता , अशी उभी राहिली तरच शिवाजी महाराज,विन्स्टन चचिर्ल,अन् हो चिमिन्ह हे यशस्वी होत असतात. महाराज शत्रूला विचार करायलाही अवधि देत नव्हते. शाहिस्तेखानावरील छाप्यानंतर पावसाळा सुरू झाला,संपला.या काळात महाराजांचे हेर,बहिर्जी नाईक,त्याच्याबरोबर बहुदा वल्लभदास अन् सुंदरजी परभुजी गुप्त रूपानं सुरतेच्या टेहळणीस महाराजांनी रवानाही केले.या मराठी हेरांनी सुरत चांगलीच हेरून काढली.कोण कोण लक्षाधीश आणि कोट्याधीश आहेत हे तर टिपून पाहिलेच.पण सुरतेची लष्करी आणि आरमारी परिस्थिती त्यांनी बरोबर न्याहाळली. सुरत सुस्त होती. सुभेदार होता इनायतखान.पैसे खाण्यात पटाईत.पैसे खाण्याची त्याची ‘मेथड‘ आज आपल्याला नवीन वाटणार नाही.आपण अनुभवी आहोत. बादशाहाच्या हुकुमाप्रमाणे सैन्याची संरक्षक संख्या तो ‘कॅटलॉग‘ वर दाखवित होता.पण प्रत्यक्षात फक्त एकच हजार सैन्य त्याच्यापाशी होते. बाकीच्या सैन्याचा सर्व तनखा खानाच्या पोटात गुडूप होता. आता ही गोष्ट बहिजीर्सारख्या कोल्ह्याच्या नजरेतून सुटेल काय ? मराठ्यांच्या हितासाठी अशी चतुराई करून इनायतखानसाहेब मराठी स्वराज्याचीच केवढी सेवा करीत होते,नाही! शिवाजी महाराज आपल्यापासून काहीशे फर्सुख (आठ मैल म्हणजे एक फर्सुख) लांब आहे.तो इकडं कशाला येईल ? आपण अगदी निर्धास्तपणे पैसे खातखात बादशाहचं राज्य सांभाळीत बसायला हरकत नाही.असा अतिव्यवहार्य विचार करून खान सुभेदारीच्या लोडाला टेकलेला होता.सुरतेतील एकूण संपत्तीचा आणि शांत स्थितीचा तपशीलवार अभ्यास करून मराठी हेर राजगडाला परतलेही होते.आता महाराज सुरतेच्या स्वारीवर सुखरूप कसं जायचं अन् डबोलं घेऊन सुखरूप कसं यायचं याचाही तपशील ठरवित होते. त्रास न होता हे साधायचं होतं. वाटेत कुठे कुठे अडचणी आणि शत्रूचा अडसर येऊ शकेल,शक्यतोवर असाच मार्ग ठरविणे आवश्यक होते. शांततेच्या मार्गाने सर्व काही साध्य करायचे अशी नाहीतरी आमची भारतीय परंपरा आहेच. राजगड- त्र्यंबकेश्वर-जव्हार-गणदेवी-उधना ते सुरत असा हा सामान्यत: मार्ग होता. साधारणपणे हा मार्ग सह्याद्रीच्या घाटवाटांतून आणि जंगलातून जाणारा आहे.सुमारे पाच हजार घोडेस्वार आणि संपत्ती लादून घेऊन येण्याकरता सुमारे पाच हजार घोडे महाराजांचे बरोबर निघाले. महाराज सुरत काबीज करायला निघालेले नव्हते. शक्यतो रक्तपात न करताच खंडणी मिळविण्यासाठी ते जात होते. वाटेत जव्हारचा राजा आडवा येतो की काय अशी नक्कीच धास्ती होती. त्याशिवाय लष्करी धास्ती शेवटपर्यंत कुठेच नव्हती. महाराजांनी जी ‘पुढची ‘ दक्षता घेतली होती ती विचार करण्यासारखी आहे. सुरत तापी नदीच्या खाडीवर आहे. सुरतेच्या उत्तरेस,ईशान्येस आणि पूवेर्स महाराजांनी आपल्या सैन्याच्या लहान लहान तुकड्या सुरतेपासून काही किलोमीटर अंतरावरती ठेवलेल्या स्पष्ट दिसतात.या स्वारांना छबिन्याचे म्हणजेच गस्तीचे स्वार म्हणतात.सुरतेतील आपला कार्यभाग पूर्ण होईपर्यंत उत्तर आणि पूर्व बाजूंनी मोगलांचे कोणी सरदार आपल्यावर चालून येऊ नयेत अशी रास्त अपेक्षा त्यांची होती.पण समजा अहमदाबाद,पाटण,पावागड, सोनगट वा बुऱ्हाणपूर येथे मोगली ठाणी होती.त्या ठाणेदारांनी आपल्याला विरोध करण्यासाठी चाल केली तर ? त्या संभाव्य मोगली हल्ल्यांची वार्ता आपल्याला खूप आधीच अचूक कळावी ही योजना महाराजांनी केलेली होती. अन् तसेच घडले. महाराज त्र्यंबकेश्वरहून दि. १ जानेवारी १६६४ रोजी जव्हारपाशी सिरपांव येथे पोहोचले.सुदैवाने जव्हारच्या राजाने महाराजांना अजिबात विरोध केला नाही. महाराज उधना उर्फ उटना या ठिकाणी ५ जाने. १६६४ रोजी म्हणजे सुरतेपासून अवघ्या १० कि.मी. वर पोहोचले. सुरतेचा सुभेदार इनायतखान पूर्ण गाफील होता.जगाचा नियमच आहे, गाफील का जो माल है,वो अकलमंदका खुराक है। सुरत बंदर हे मोगल साम्राज्याचं आथिर्क वर्म होतं.सुरतेत येणाऱ्या मालावर बादशाहला प्रचंड जकातीचे उत्पन्न मिळत असे. सुरत ही जागतिक कीतीर्ची बाजारपेठ होती.येथील जकातीचे उत्पन्न जहाँआरा बेगम (औरंगजेबाची बहीण) हिला मिळत असे.म्हणजे आता महाराजांनी मोगलांच्या नाकावरच नेम धरला होता. तापी नदीच्या तीरावर. शिवाजी महाराजांचे हे दळवादळ सुरतेच्या रोखाने नजिक येऊ लागल्यावर जनतेत घबराट उडाली.खेड्यापाड्यांतील लोक सैरावैरा पळू लागले.ही त्यांची केविलवाणी घबराट पाहून महाराजांना वाईटच वाटले.त्यांनी आपल्या सैनिकांच्या मार्फत या पळणाऱ्या जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला.शिवाजी या तीन अक्षरांची दहशत उत्तरेकडे केवढी पसरली होती,त्याचे हे प्रत्यंतर होते. ‘मी शिवाजीच आहे.आम्ही मराठे आहोत.तुम्ही घाबरू नका. तुम्हाला आम्ही अजिबात धक्का लावणार नाही‘ अशा आशयाचे धीराचे आश्वासन सैनिक देत होते. त्यामुळे घबराट थोडीबहुत कमी झाली. या मराठी मोहिमेच्या वार्ता सुभेदार इनायतखानला समजत होत्या.पण तो इतका गाफील होता की, त्याचा शिवाजी सुरतेवर येत आहे या बातम्यांवर विश्वासच बसेना. दुधन्यापाशी म्हणजे सुरतेच्या अगदी सीमेवर महाराज येऊन पोहोचले.त्यांनी आपला अधिकृत वकील (बहुदा वल्लभदास) खानाकडे पाठविला आणि मला एक कोटी रुपये खंडणी द्या.मी शहरात येतही नाही.येथूनच परत जाईन. तुमच्या शाहिस्तेखानानं गेली तीन वर्ष आमच्या मुलुखाची भयंकर लूट आणि नासाडी केली. बेअब्रुही केली.त्या नुकसानीच्या भरपाईखातर मला तुम्ही ही खंडणी द्या.ही खंडणी तुम्ही एकटेही देऊ शकाल.( म्हणजे इतका पैसा तुमच्या एकट्यापाशी आहे.खाल्लेला!) पण मी सोबत धनिकांची यादी देत आहे.त्या सर्वांकडून तुम्हीच रक्कम गोळा करा.या आशयाचा सविस्तर मजकूर महाराजांनी सुभेदाराला विदित केला.पण सुभेदाराने हेटाळणी करून हे आवाहन फेटाळून लावले. मग मात्र महाराज चिडले.गाफील खान चिडला नाही. त्याने विनोदी पद्धतीनेच या भयंकर ज्वालामुखीशी व्यवहार केला. अन् सुरतेसकट तो या मराठी लाव्हारसात एक हजार मोगल सैन्यानिशी बुडाला.सुरतेच्या रक्षणांस म्हणजेच युद्धास त्याने उभे राहावयास हवे होते.ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज प्रमुख अधिकाऱ्याने म्हणजेच जॉर्ज ऑक्झींडेन याने स्वत: सुभेदाराला भेटून या गंभीर संकटाची पुरेपूर जाणीव करून दिली.पण तरीही तो बेपर्वाच. उलट त्याने जॉर्जलाच म्हटले की, तुम्ही अंग्रेज लोक फार मोठे विचारी आणि बहाद्दूर समजले जाता.अन् तुम्हीच या शिवाजीच्या नावाने भुरटेगिरी करणाऱ्या लोकांना इतके घाबरता ?’ या उत्तराने जॉर्ज अधिकच गंभीर बनला. त्याला मुख्यत: आपल्या इंग्रज वखारींची चिंता होती. हा शिवाजी जर आपल्या वखारीवर चालून आला तर ? राजापूरच्या इंग्रज व्यापारी वखारींची याच शिवाजीने (मार्च १६६० ) कशी धूळधाण उडविली ते त्याला माहित होते. जॉर्ज ऑक्झींडेन आपल्या वखारीत परतला. त्याच्यापाशी काळे अन् गोरे नोकरलोक होते फक्त दोनशे.त्याने एक विलक्षण गोष्ट केली.या दोनशे लोकांच्या खांद्यावर बंदुका दिल्या.यात मजूर,कारकून आणि सैनिक होते. ते आता सर्वचजण सैनिक बनविले गेले.अन् जॉर्जने या दोनशे लोकांसह बँड वाजवित निशाणे घेऊन सुरत शहरात रूटमार्च काढला.जॉर्ज स्वत: त्यात होता.हे संचलन सुभेदाराने स्वत: आपल्या हवेलीतून पाहिले. सुभेदाराला ही केवळ थट्टा चेष्टा वाटली तो हसला. हा पहिला दिवस. (दि. ६ जाने. १६६४ ) सुरतेबाहेर एक बाग होता कालाबाग. त्यातील एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी महाराज एका खुर्चीसारख्या बनविलेल्या उंचट आसनावर बसले.एवढ्यात एक गंमत घडली.सुरतेत धर्मप्रचाराचे काम करणारा,कॅप्युसिन ख्रिश्चन मिशनचा मिशनरी रे अॅम्ब्रॉस हा महाराजांस भेटावयास बुऱ्हाणपूर दरवाज्याबाहेरच्या कालाबागेत आला.परवानगी घेऊन तो समोर आला.त्याने महाराजांस नम्रतेने विनंती केली की,मी ख्रिश्चन मिशनरी आहे.आमचे एक चर्च, मठ आणि रोगग्रस्तांवर उपचार करण्याकरिता हॉस्पिटल आहे. आपले आणि औरंगजेब बादशाहांचे काही राजकीय भांडण आहे.आमचा त्यात काहीच संबंध नाही.तरी मी आपणांस विनंती करतो की , आपण निदान माझ्या गोरगरीब रोगग्रस्तांचा रक्तपात करू नये. ‘ या आशयाच्या त्याच्या बोलण्यावर महाराज त्याला म्हणाले,कुणी सांगितलं तुम्हाला की,मी तुमचा रक्तपात करणार आहे म्हणून! तुम्ही लोक गरिबांकरिता फार चांगले काम करता,हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला अजिबात त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही आधीपासूनच घेतली आहे. तुम्ही निर्धास्त असा. रे. अॅम्ब्रॉस परत गेला खरोखरच मराठ्यांची एक तुकडी ख्रिश्चनांच्या या कार्यस्थळाभोवती रक्षक म्हणून उभी होती. मराठी सैनिकांनी खंडण्या गोळा करण्यास शहरात सुरुवात केली. गडगंज श्रीमंतांकडूनच फक्त खंडणी गोळा केली जात होती. त्यातही टक्केवारी होती. खंडणी घेतल्यावर ,त्या त्या धनिकाला रसीद दिली जात होती. सुभेदार इनायतखान आता मात्र घाबरून सुरतेच्या किल्ल्यात आपल्या एक हजार सैन्यानिशी लपून बसला.त्याने सुरतेेचे धड रक्षणही केले नाही वा खंडणी देऊन शहर वाचविलेही नाही. बेजबाबदार. सुरत शहराच्या बाहेर पण नजिकच एका एकलकोंड्या मोठ्या घरात एक गुजराथी विधवाबाई राहत होती.तिचा पती धनिक होता.या बाईच्या घराला चुकूनमाकूनही कोणाचा त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी मराठी रक्षक रात्री पहाऱ्यावर पाठविले होते. खंडण्या गोळा केल्या जात होत्या. पण जे त्या देण्याचे नाकारीत होते,त्यांच्या घरात शिरून मराठे सक्तीने धन गोळा करीत होते. ठिकठिकाणी मराठ्यांनी पकडलेले बादशाही अधिकारी आणि नोकरचाकर कैद करून कालाबागेत महाराजांपुढे हजर केले जात होते. कुठेही प्रतिकार असा होतच नव्हता. सर्व युरोपीय वखारवाल्यांनी आपले ‘देणे‘ मुकाट्याने देऊन टाकले होते.पण मग रूटमार्च काढणाऱ्या इंग्रजांचे काय ? जॉर्जने आपल्या वखारीच्या तटांवर तोफा आणि सैनिक सज्ज ठेवले होते.त्यांचे युनियन जॅक वखारीवर फडकत होते. स्वत: जॉर्ज सुसज्ज होता. फक्त दोनशे लोक! हजार लोकांच्या निशी इनायतखान किल्ल्यात लपून बसला होता. दरवाजे बंद होते. किल्ल्याचे आणि विवेकाचेही. अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे जर सुरतेच्या सुभेदार इनायतखानाने महाराजांना योग्य तो प्रतिसाद दिला असता आणि महाराजांशी राजकीय पातळीवरून बोलणी करून महाराज मागतात त्या खंडणीबाबत काही ठरविले असते,तर सुरतेतील हा अग्निकल्लोळ टळला असता! पण ते त्या भ्रष्टाचारी सुभेदाराने केले नाही! महाराजांना त्याने आपल्या सैन्यबळानिशी निर्वाणीचा प्रतिकारही केला नाही! तो लपून बसला.अखेर महाराजांना खंडणीचा आणि खंडणी न देणाऱ्यांचा विचार कठोरपणे करावा लागला. जगाच्या इतिहासात कठोर निर्णयाने आपले राजकीय हेतू पार न पाडणाऱ्यांना अखेर स्वत:चाच नाश उघड्या डोळ्याने बघावा लागला आहे.सुरतेच्या प्रकरणावर आज खूप कागदपत्रे आणि वृत्तांत उपलब्ध आहेत.त्याचा बारकाईने अभ्यास केला तर मराठा स्वराज्याचा हा कठोर,कर्तव्यनिष्ठ पण कठोर न्यायीही नेता जे वागला ते योग्यच वागला असे दिसून येईल.यात अभिनिवेश नाही.खोटा अभिमान बाळगून ‘शिवाजी महाराज की जय‘ म्हणण्याची गरज नाही. जर शिवाजी महाराज असे वागले नसते,तर ते नेभळट ठरले असते. ते सोवळ्यातल्या मुकटा नेसून राज्यकारभार करायला उभे नव्हते,तर कठोररितीने भवानी हातात घेऊन,वेळच आली तर ब्राम्हण किंवा ख्रिश्चन मिशनरी गुन्हेगारांचा शिरच्छेद करायलाही न कचरणारे विक्रमादित्य होते. आम्ही अनेकदा नेभळटपणामुळे अन् भाबड्या सहिष्णुतेचे ‘मुखवटे नेसून राजमुकुट गमावले हो!‘ बोलून टाकू का ? नुकतेच घडले आहे.पाक अतिरेकी आमच्या संसदेत घुसले.आमच्या राष्ट्रदेवतेच्या हृदयसिंहासनालाच त्यांनी ठोकर मारली.आम्ही काय केले? मुखवटा नेसून आम्ही फक्त कागदी इशारा दिला ‘हे सहन केले जाणार नाही.' पाकव्याप्त पण भारताच्याच पूर्ण हक्काच्या काश्मिरी भागात पाक अतिरेकी विषारी सर्पांनी केलेल्या वारूळांवर आम्ही बॉम्ब का टाकले नाहीत?आपले बॉम्ब न्याय्य ठरले नसते का ? नाही! ते आम्हाला जमणार नाही! कारण आम्ही सहिष्णुतेचे मुखवटे नेसून शिवाजी महाराजांची भवानी हाती घेण्याची नाटकी चूक करीत असतो.खरं म्हणजे आम्ही सोवळ्याचे मुकटेही नेसता कामा नयेत अन् उपभोगाची भरजरी राजवस्त्रेही पेहरता कामा नयेत.आम्ही श्रीरामाची विरक्त वल्कले परिधान करून पातकी आक्रमकांवर रामबाण सोडले पाहिजेत.महाराज असे रामबाण सोडीत होते.हा सुरतेतला रावण काय करीत होता यावेळी ? तो सुरतेच्या किल्ल्यात आपल्या एक हजार मोगली सैन्यानिशी लपून बसला होता. त्याने आपला एक वकील,तिसऱ्या दिवशी (दि.८ जाने. १६६४ ) शिवाजीमहाराजांच्याकडे आपले पत्र देऊन तहाची बोलणी करण्याकरता पाठविला.हा वकील काळाबागेत महाराजांकडे आला.महाराज रोजच्या प्रमाणेच एका प्रचंड झाडाच्या बुंध्याशी उंचट आसनावर बसले होते. महाराजांनी भेटीची परवानगी दिली.तो वकील महाराजांच्या समोर सुमारे पंधरा पावलांवर अदबीने उभा राहिला.आपल्या हातातील कागदाची वळकटी उलगडीत तो महाराजांना म्हणाला, ‘आमचे सुभेदार इनायतखान आपल्याशी तह करावयास तयार आहेत.आमच्या तहाच्या अटी अशा‘ तो वकील एवढे बोलतोय,तेवढ्यात महाराज दरडावले,तहाच्या अटी ? अटी आम्ही घालायच्या की तुम्ही ? भेकडाप्रमाणे तुमचा सुभेदार किल्ल्यात लपून बसलाय.आणि तो आम्हाला अटी पाठवतोय ? तेवढ्यात तो वकील ‘महाराज, आपल्याला अगदी महत्त्वाचे मला काही सांगायचे आहे ‘ ( आपके तहनाईमें मुझे कुछ कहना है।) असे वारंवार म्हणत म्हणत महाराजांच्या दिशेने पावले टाकू लागला. तो क्षणात अगदी जवळ आला आणि त्याने एकदम आपल्या कमरेस असलेली कट्यार उपसली आणि तो घाव घालण्यासाठी महाराजांच्यावर धावला. तो झडप घालणार, एवढ्यात महाराजांच्या नजीक उभ्या असलेल्या मराठा चार-दोन सैनिकांनी या वकीलावरच विजेच्या वेगाने सपासप घाव घातले.इतके ते मराठे सावध होते. तो वकील म्हणजे इनायतखानाने महाराजांचा खून करण्याकरता पाठविलेला मारेकरी होता. मारेकरी मारला गेला. मराठे सैनिक वणव्यासारखे भडकले. आणि मग सुरतेत खरोखरच सूडाचा भडका उडाला.सुरतेत जो काही भयंकर हल्लकल्लोळ उडाला तो सर्वस्वी अन् प्रत्येक बाबतीत बेजबाबदारपणे वागलेल्या इनायतखान सुभेदारामुळेच.इथे नवल वाटते ते औरंगजेब बादशाहचेच.त्याने साम्राज्याच्या पश्चिम सागरी सरहद्दीवर,सुरतेसारख्या जागतिक बाजारपेठ असलेल्या संपन्न अर्थनगरीवर इतका नालायक बेजबाबदार,भेकड निर्लज्ज भ्रष्टाचारी आणि अक्कलशून्य सर्वाधिकारी कसा काय नेमला ? सुरतेच्या स्वारीने स्वराज्य सैनिकांनी शिलंगण केले. सीमोल्लंघन ‘आम्ही कधीही दुसऱ्याच्या मुलुखावर अतिक्रमण वा स्वारी करीत नाही' असे अभिमानाने सोवळ्यातला मुकटा नेसून सांगणाऱ्या आमच्या मंडळींनी याचा विचार करावा ना ? महाराजांचे हे महाराष्ट्राबाहेर झालेले दुसरे शिलंगण.पहिले शिलंगण त्यांनी अफझलखानच्या स्वारीपूवीर्च कर्नाटकात मासूर या आदिलशाही ठाण्यावर, म्हणजे पुण्यापासून जवळजवळ सातशे कि.मी. दूर केले होते. महाराज तर म्हणत होते की,सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघ्या मुलुखाचे राज्य आपल्या स्वराज्यात सामील करावे. केवढी विशाल पण तेवढीच उदात्त,उन्नत,उत्कट आणि उत्तुंग स्वप्न पाहणारा हा नेता होता! अशी स्वप्न जागे असणाऱ्यांनाच पडतात. झोपा काढणाऱ्यांना नाही. त्यांच्या आकांक्षा गगनाच्याही पल्याड सूर्यमंडळ भेदून जात असतात.राहून राहून रूखरूख वाटते की,पाक अतिरेक्यांच्या काश्मिरातील वारूळांवर, संसदच्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी बॉम्ब टाकण्याची अप्रतिम संधी आम्ही गमावली.शाहिस्तेखानाच्या आक्रमणाचा जाब महाराजांनी सुरतेवर विचारला औरंगजेबाला. सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.
सुरत बंदरात अनेक युरोपियन व्यापारी कंपन्या होत्या.त्यातच इंग्लीश ईस्ट इंडिया कंपनी होती. त्यांची फार मोठी वखार होती. जॉर्ज ऑक्झींडेन हा त्यांचा यावेळी (इ.स.१६६४ ) प्रमुख होता.सर्व युरोपियन व्यापारी कंपन्यांनी,महाराजांचा हा अचानक हल्ला आलेला पाहून महाराजांपुढे पटकन नमते घेतले आणि ते खंडण्या देऊन मोकळे झाले. पण जॉर्ज ऑक्झींडेनने अजिबात ‘खंडणी देणार नाही ‘ असा निर्धार केला. हे त्याचे धाडस भयंकरच होते. मराठ्यांच्यासारख्या कर्दनकाळ शत्रूला असा कडवा निर्धारी नकार देणे म्हणजे मरण ओढवून घेणेच होते.महाराजांनी तीन वेळा या जॉजॅकडे माणूस पाठवून खंडणीची मागणी केली.त्याचा ठाम नकारच.लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, इंग्रजांची खास इंग्लीश माणसे येथे किती होती ? फक्त ४० अधिक १६० स्थानिक सुरतवाली नोकरमंडळी.सर्व मिळून दोनशे.तरीही जॉर्ज वाघासारखा वागत होता.त्याची वखार म्हणजे बळकट किल्ला नव्हता.वखारीला कंपाऊंड वॉल होती.लढावू तर नव्हता.तरीही जॉर्जचे एवढे बळ ? ते बळ त्याच्या मनात होते. म्हणूनच मनगटातही होते.दोनशे लोकांच्यानिशी तो वखारीच्या रक्षणाकरिता युद्धाला सज्ज होता.
महाराजांनी जॉर्जला निर्वाणीचा खंडणीसाठी खलिता पाठविला आणि मुकाट्याने खंडणी न द्याल तर राजापुरात दीड वर्षापूर्वी आम्ही तुमच्या इंग्रजी वखारीची काय अवस्था करून टाकली ते आठवा!असा इशारा दिला तरीही जॉर्जने निर्धार सोडला नाही. उलट जबाब दिला की, ‘पुन्हा तुमचा वकील खंडणीसाठी आमच्याकडे आला,तर त्याला ठार मारू.‘
अखेर महाराजांनी आपली एक सैनिकी तुकडी हल्ला करण्यासाठी इंग्रजांवर पाठविली. जॉर्जने कडवा प्रतिकार केला. काही मराठे ठार झाले आणि महाराजांनी हल्ला थांबविला. चक्क माघार घेतली. ते ही योग्यच होते. कारण महाराज सुरतेत युद्ध करायला आलेले नव्हते. त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट आथिर्क होते. तसं पाहिलं तर दोनशे (त्यात बिनलढावू माणसेच जास्त) वखाररक्षकांचा बिमोड करायला महाराजांपाशी सैन्य नव्हतं का ? पण आत्ता लढाईत वेळ आणि बळ खर्च करून किती नफा वा तोटा होईल याचा विचार महाराजांनी केला. इंग्रजांचे बळ होते,निश्चय आणि निष्ठा.
महाराजांना सुरतेत प्रत्येक तास आणि क्षण महत्त्वाचा आणि अपुरा वाटत होता. इंग्रज खंडणी न देता विजयी ठरले.जॉर्ज ‘हिरो‘ ठरला.
सुरत शहराच्या उत्तर दिशेस गस्तीवर ठेवलेल्या मराठी स्वारांनी अचूक बातमी महाराजांना सुरतेत पोहोचविली की,मोगलांचा सरदार महाबतखान हा मोठी फौज घेऊन पाटणहून सुरतेवर तडफेने येत आहे.महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी लूट सुरक्षित नेण्यासाठी ताबडतोब सुरतेतून निघण्याची आज्ञा दिली.कारण महाबतखानाशी यावेळी युद्ध करणे परवडणारेही नव्हते आणि उद्दिष्टही नव्हते. उद्दिष्ट होते,लूट सहीसलामत स्वराज्यात नेण्याचे. महाराज इंग्रजांपुढंही भित्रे नव्हते. आता महाबतखानापुढेही भित्रे नव्हते.ते हिशेबी आणि धोरणी होते.
दि.१० जाने. १६६४ या दिवशी सकाळी सुमारे साडेदहा वाजता महाराजांची सेना आणि सुरतेची संपत्ती सुरत सोडून निघाली आणि स्वराज्याच्या वाटेस लागली. सुरतेतून बाहेर पडताना बऱ्हाणपूर दरवाजापाशी महाराज घोड्यावरून क्षणभर सुरत शहराकडे वळले आणि म्हणाले, बहुता दिवसांची इच्छा किती होती की,औरंगजेब बादशाहांची सुरत वसूल करावी. ती आज पूर्ण झाली. यावेळी इस्ट इंडिया कंपनीतील एक इंग्रज अँथनी स्मिथ हा ( याला मराठ्यांनी कैद केले होते,नंतर सोडून दिले.) बऱ्हाणपूर वेशीपाशी उभा होता. त्याने हे सर्व पाहिले आणि नंतर लिहून ठेवले.
महाराज स्वराज्याच्या मार्गाला लागले. महाबतखान पाटण्याहून वेगाने येत होता. पण तो,महाराज निघून गेल्यानंतर सात दिवसांनी (दि. १७ जाने. १६६४ ) सुरतेला पोहोचला.या सात दिवसांत सुरतेची भयंकर बदसुरत झाली होती.आता सुरतेचा मोगली संरक्षक सुभेदार इनायतखान हा निर्धास्त झाला होता. तो महाबतखानच्या स्वागतास गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप गदीर् होती. कोणी दु:खाने व्याकूळ होते,बहुतेक सारे इनायतवर संतापलेले होते. त्यानेच शहर वाऱ्यावर सोडून सुरतेच्या किल्ल्यात दडी मारली होती.तोच खान आता महाबतखानाच्या स्वागतास सामोरा चालला होता.त्याच्या वागण्याबोलण्यात वा चेहऱ्यावर अपराधीपणाचा लेशही नव्हता. पूर्ण निर्लज्ज.याचवेळी इंग्रज जॉर्ज ऑक्झींडेन हाही महाबतखानास सामोरा आला. महाबतखानास सुरतेत घडलेल्या एकूण सर्व हकीकती तपशीलवार समजलेल्या होत्या.हा खान इनायतनावर कमालीचा नाराज झाला होता.पण साफसाफ बोलावे अशी ती वेळ नव्हती. त्याने इनायतला काहीच न बोलता,जॉर्जचे हार्दीक कौतुक केले, ‘तुम्ही इंग्रजांनी एवढ्या मोठ्या शत्रूशी ताठ मानेने जाबसाल केला याचे खरोखच आश्चर्य आणि कौतुक वाटते‘ अशा आशयाचा शब्दात जॉर्जचे गुणगौरव करीत खानाने त्याला एक उत्कृष्ट घोडा आणि एक अत्यंत मौल्यवान रत्नजडीत तलवार भेट म्हणून देऊ केली. तेव्हा जॉर्ज अतिशय नम्रतेने म्हणाला की, ‘मी काय विशेष केले ? मी माझे कर्तव्य केले. माझ्या राष्ट्राकरिता (इस्ट इंडिया कंपनीकरिता) अत्यंत दक्षतेने आणि कठोरपणे वागलो.‘ महाबतखानाने तरीही त्याचे कौतुक करीत आपल्या मौल्यवान आहेराचा स्वीकार करण्याची जॉर्जला विनंती केली. तेव्हा जॉर्ज म्हणाला, ‘मला स्वत:ला काहीही नको.माझ्यासाठी काही करणारच असाल,तर एकच करा.आपले वजन दिल्ली दरबारात आहे.तर आपण औरंगजेब बादशहांस शब्द टाकून आमच्या इस्ट इंडिया कंपनीला जरूर त्या सवलती मिळवून द्या.यावर अधिक काही बोलण्याची गरज आहे का ? हे कंपनीवाले इंग्रज याच सुरत शहराचे....यानंतर फक्त ९० वर्षांनी ( इ. १७५५ सुमारास) पूर्ण मालकी हक्काचे सत्ताधीश झाले. क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.
शाहिस्तेखानवरच्या छाप्याच्या बातम्या औरंगजेबास तपशीलवार समजल्या.त्याचा संताप वाढतही राहिला. आता या सीवाच्याविरुद्ध नेमके कोणते पाऊल टाकावे याचा विचार तो करीत होता, तेवढ्यात सुरतेवरती महाराजांचा छापा आणि सुरतेची बदसुरत कशी झाली आहे याचाही तपशील त्याला दिल्लीत समजला.त्याच्या संतापात भर पडली.पण अभ्यासात भर पडलेली दिसत नाही.या सगळ्याच मोगलांचा अभ्यास अगदी शून्य वाटतो.खूप मोठं सैन्य,तोफखाना,खजाना,हत्ती आणि अफाट युद्धसाहित्य याच गोष्टींवर या दिल्ली दरबारचा प्रचंड विश्वास होता.मराठ्यांवर नवी मोहिम काढायची म्हणजे या सर्व सार्मथ्यात आणखी वाढ करायची हाच यांचा अभ्यास आणि निर्णय. ‘शिवाजी‘ हे प्रकरण औरंगजेबास कधीच समजले नाही. खरोखर ‘शिवाजी‘ हे प्रकरण आजही २१ व्या शतकात जर खरंच समजले, तर काय होईल ? पं.जवाहरलाल नेहरू म्हणाले, ‘जगाच्या पाठीवर जर कोणाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल आणि ते बळकट अन् समृद्ध करायचे असेल तर (त्या राष्ट्राने वा समाजाने) छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास (अन् अनुकरणही) करावयास हवे. ‘प. नेहरू यांनी या पूर्ण आशयाचे उद्गार नागपूर येथे धनवटे बिल्डींगवर शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले,त्या प्रसंगी काढले.
महाराज सुरतेहून निघाले. सह्यादीचा घाट चढून ते नासिक जिल्ह्यात पोहोचले.तेथून घाटमाथ्याने राजगडकडे निघाले. याच काळात म्हणजे दि. २३ जाने. १६६४ रोजी महाराजांचे तीर्थरूप शहाजीराजे हे कर्नाटकात शिमोग्याजवळ होदीगेरी या ठिकाणी घोड्यावरून दौडत असता अपघात होऊन पडले, मृत्यू पावले. ही दु:खद खबर दि. ५ फेब्रु. १६६४ यादिवशी राजगडावर पोहोचली. थोडासा तपशील असा महाराज सुरतेच्या लुटीसह फेब्रुवारी प्रारंभी लोणावळ्याच्या पुढे पोहोचले. तेवढ्यात (बहुदा ३ फेब्रुवारीस) महाराजांना छबिन्याच्या हशमांनी पुण्याकडची खबर कळविली असावी की,मोगलांची फौज पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने येत आहे.महाराजांनी ताबडतोब सर्व लूट नेताजी पालकरांबरोबर शेजारच्याच लोहगडावर सुरक्षिततेकरिता पाठविली. मोगल अंगावर येत आहेत हे पाहून महाराजांनी वडगावजवळ मोगलांची वाट अडविण्याकरिता नारो बापूजी देशपांडे नऱ्हेकर या आपल्या सरदारांस सांगाती सैन्य देऊन पाठविले.महाराज उरवडे, घोटवडे,तव,मुठाखिंड,मोसे, पानशेत,खामगांव खिंड या राजगडमार्गाने पुढे गेले. वडगांवपाशी नारो बापूजी देशपांडे याच्या सेनेची मोगलांशी गाठ पडली.या लढाईत नारो बापूजी ठार झाला.पण मोगलांना काहीच साध्य झाले नाही. शिवाजीराजे राजगडकडे गेले, लूट लोहगडावर बंदोबस्तात पोहोचली.
महाराज खामगावाजवळ पोहोचले.तेथून दक्षिणेस राजगड सुमारे २० किलोमीटरवर आहे. राजांना शहाजीमहाराजांच्या अपघाती मृत्यूची बातमी येथेच समजली.सुरतेची स्वारी,यशस्वी झाली,नियतीने मात्र वडिलांच्या प्राणावर आघात करून त्यांना दु:खात लोटले.
अत्यंत तातडीने महाराज राजगडावर पोहोचले.तेथे आणखी एक भयंकर दु:खाने भरलेले ताट नियतीने वाढून ठेवलेले होते.मातु:श्री जिजाबाईसाहेब या सती जाण्याच्या तयारीत होत्या.वडील गेले,आता आईपण निघाली. प्रयत्नांची शिकस्त करून महाराजांनी शथीर्ने आऊसाहेबांना सती जाण्यापासून परावृत्त करण्यात अखेर यश मिळविले.आऊसाहेब थांबल्या. हा सारा प्रचंड कल्लोळ आयुष्यभर महाराजांच्या भोवती चितेसारखाच ज्वाला नाचवीत होता. प्रत्येक प्रसंगाला ते तोंड देत होते.महाराजांना कोणाची मदत होती ? कोणाचीही नव्हती. तापी-नर्मदेच्या उत्तरेला अवघा हिंदुस्थान मोगलांची सेवा करीत होता.राजपुतांच्याकडे मदतीच्या अपक्षेने पाहण्याची सोयच नव्हती.याच राजपुतांच्या जीवावर औरंगजेबाचे राज्य सुरक्षित होते. पण इथेच शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याच्या तत्त्वज्ञानातील एक महान तत्त्व सतत टवटवीतपणे बहरत होते.स्वावलंबन. कोणावरही अवलंबून न राहता स्वराज्याच्याच बळावर स्वराज्याचाच विचार विस्तार आणि समृद्धी करायची हे महराजांचे महान तत्त्व होते.
अजूनही पुण्यात मोगल छावणी होतीच.शाहिस्तेखान आसाम-बंगालच्या सुभेदारीवर ढाक्याकडे निघून गेला होता.पण पुण्यात छावणी कायम होती.सिंहगडाला जसवंतसिंह याने घातलेला वेढा अजून चालूच होता.महाराज मोगलांच्या पोटात सुरतेपर्यंत गेले आणि लूट घेऊन परत आलेसुद्धा,याचा या जसवंतसिंहाला पत्ताच नव्हता. अगदी उघड आहे.तसा पत्ता त्याला असता,तर त्याने महाराजांना सिंहगडाच्या पश्चिमेलाच अडवले असते. जाऊच दिले नसते.निदान परतीच्या वाटेवर महाराजांना त्याने राजगडाकडे येऊच दिले नसते.पण त्याला कशाचाही पत्ता नव्हता.यातच मोगलांची ठिसूळ लष्करी स्थिती दिसून येते. यालाच मी ‘अभ्यासशून्य मोगलाई ‘ असे म्हणतात.
गेल्या १८ वर्षांत (इ. १६४६ ते १६६४ ) स्वराज्याच्या शत्रूंना कुठेच यश मिळाले नाही. महाराजांचे काही तुरळक पराभवही झाले.उदाहरणार्थ चाकणची लढाई.पण यातून शत्रूनी कोणताच ठोस अभ्यास केलेला दिसत नाही.अन् महाराजांचा अभ्यास थबकलेलाही दिसत नाही.या काळात काही लढाया ते हरले, पण सर्व युद्ध जिंकली. लढायांमुळे अखंड अशांतता स्वराज्यात होतीच की.पण स्वराज्यातील नागरिकांनीही आपले शेतकरी जीवन आणि बलुतेदारी कुठेही ढासळू दिली नाही.मांजर उंचावरून पडले तरी जमिनीवर पडताना ते चार पायांवरच उभे पडते.स्वराज्यही असेच मांजराच्या कुशलतेने आणि कोल्ह्याच्या कौशल्याने सह्यादीच्या कुशीत जगत होते. टॉप सिक्युरिटी! झेड सिक्युरिटी!
सुरतेच्या मोहिमेत ८ जाने.१६६४ रोजी इनायतखानाने महाराजांकडे वकील म्हणून एक मारेकरीच पाठविला, हे आपण पाहिले. महाराजांच्याकरिता मावळ्यांनी जी सुरक्षा ठेवली होती ती लक्षात घेण्यासारखी आहे.अशी व्यवस्था महाराजांच्याभोवती ठेवणं हा त्यांच्या सवंगड्यांचा अंगीभूत सहज स्वभावच बनला होता.दगा करणं हा शत्रूचा स्वभावच असतो.शत्रू फक्त संधी साधत असतो.महाराजांचं संरक्षण करणं हा मावळी डोळ्यांचा आणि हातांचा अगदी घारींसारखा स्वभावधर्मच झालेला दिसून येतो. अफझलखानाच्या भेटीच्या वेळी शामियान्यात जिवा महाला सकपाळ हा जर सावध राहिला नसता तर ? घातच.सुरतेच्या मारेकऱ्यानेही वकीलीचे नाटक करीत करीत महाराजांवर एकदम अचानक झडप घातली.जर जवळचे मावळे सावध नसते तर ? घातच.पुढे आग्ऱ्याच्या कैदेतही याच मावळ्यांचा अबोल पहारा महाराजांभोवती होता.पुढे जालन्याच्या स्वारीतच (इ.स.१६७९ ) महाराजांच्या अंगात फणफणून ज्वर चढला.त्यावेळी केसरीसिंह आणि मोहकमसिंह हे अचानक मराठ्यांवर हल्ला करावयास आले.अशा आजारपणात महाराजांचं रक्षण करणं,त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणं अवघड होतं. बहिर्जी नाईकाने महाराजांना आपल्या पाठीवर घेऊन पट्टा नावाच्या किल्ल्यावर सुखरूप पोहोचवलं. महाराजांची ही सिक्युरिटी भोवतीच्या सौंगड्यांनी उत्कृष्ट सांभाळली.त्यात उत्तम नोकरी करणे या गोष्टीपेक्षा कडव्या निष्ठेने राजा राखणे हाच भाग जास्त दिसून येतो.वास्तविक ‘महाराजांचा दरबार तो सर्वांस सहज‘ असा लौकीक होता. म्हणजे महाराजांना कोणीही भेटू शकत असे.पण याचा अर्थ भोंगळ बेसावधपणा असा नव्हता. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती तरी थोर व्यक्ती घातपाताने मारल्या गेल्या! कोणाकोणाचा मृत्यू संशयास्पद घडला. उदाहरणार्थ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी,लाल बहादूर शास्त्री,महात्मा गांधी,इंदिराजी, राजीव गांधी,जनरल अरुणकुमार वैद्य,पं. दिनदयाळजी या थोरांच्या मृत्युचे दु:ख आपणास आहे. जगाच्या पाठीवर असे प्रकार घडतच आले आहेत. त्याबाबतीत जास्तीतजास्त दक्षता घेऊन सुरक्षाव्यवस्था ठेवणे एवढेच आवश्यक आहे,असे म्हणता येते.
पण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जी सिक्युरिटी त्यांच्या खाश्या मित्रांनी ठेवली ती निश्चितच उद्बोधक आहे.महाराज अंगात वेळप्रसंगी चिलखत घालीत असत.कधी पोलादी चिलखत,कधी कापडी चिलखत. त्याला बख्तर असा शब्द आहे. पण त्यांचं सर्वात मोठं चिलखत आणि अभेद्य शिरस्त्राण म्हणजे त्यांचे निधड्या छातीचे मावळे.या मावळ्यांनीच ही हृदयातील ठेव प्राणापलिकडे जपली.
मराठ्यांच्या पुढील इतिहासात घातपाताचे प्रसंग अनेक आहेत. सेनापती संताजी घोरपडे, सेनाधुरंधर संताजी भोसले अमरावतीकर,नारायणराव पेशवे, जयाप्पा शिंदे,वकील महादेव भट हिंगणे,वकील धर्मराव तमाजी गलगलीकर इत्यादी राजकारणी व्यक्तींचे खून पडले.त्यामुळे राजकीय उलथापालथीही झाल्या.त्याचा अभ्यास केला तर या सिक्युरिटीचे महत्त्व लक्षात येते.सिक्युरिटी हा थट्टेचा, विनोदाचा विषय नाही.ती अत्यंत गरजेची गोष्ट आहे.समर्थांनी तर असे म्हटले आहे की,महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी आपला जीव धोक्यात घालणे हे योग्य नाही. ‘धुरेने युद्धासी जाणे,ही तो नव्हे राजकारणे.‘ स्वत:ची अतिशय दक्षता घेणे म्हणजे भेकडपणा असा अर्थ कुणी लावू नये.
पेशवाईत गारद्यांनी नारायणराव पेशव्यांवर खुनी हल्ला केला. ऐन शनिवारवाड्यातच पेशवा मारला गेला.पण त्यांच्याआधी सदाशिवराव भाऊ पेशवा , नानासाहेब पेशवा,माधवराव पेशवा यांच्यावरही मारेकऱ्यांनी अचानक खुनी हल्ले केले होते हे सरदारांना माहित नव्हते का ? राजघराण्यांना तर ही भीती नेहमीच असते.शनिवारवाड्यात एका पेशव्याचाच खून झाला, तसाच कोल्हापुरात राजवाड्यात प्रत्यक्ष एका छत्रपती महाराजांचाच खून झाला.हे ऐतिहासिक सत्य आहे.यातून योग्य तो बोध घेणं आवश्यक आहे.राजकीय खून केवळ हत्यारांनेच केले गेले असे नाही , तर खाण्यापिण्याच्या पदार्थातूनही केले गेले आहेत.
चाणक्याच्या काळात खून करण्याचा एक विलक्षणच प्रकार ‘मुदाराक्षस‘ या नाटकांत, विशाखदत्त या नाटककाराने नमूद केला आहे.तो प्रकार म्हणजे ‘विषकन्या ‘.
आजच्या काळातील एड्सपेक्षाही या विषकन्येचा प्रयोग भयंकर आहे.अशा विषकन्येशी शारीरिक संबंध ज्याचा येईल,तो मरणारच. म्हणूनच त्या स्त्रीला विषकन्या म्हणत.
एकूण खून पाडण्यातही खूप व्हरायटी आहे.ती भयंकर असली तरी मनोरंजक आहे.पण राजकीय आणि सामाजिक जबाबदारी ज्यांच्या शिरावर आली आहे, त्यांनी राष्ट्राच्या आणि समाजाच्या हिताकरीता स्वत:ची सुरक्षितता ठेवणं हे अत्यंत मोलाचे काम आहे. टॉप सिक्युरिटी,झेड सिक्युरिटी, स्वयंसिक्युरिटी.
कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराज छत्रपतींना इंग्रजांनी वेडे ठरवून अहमदनगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले.त्या कैदेत छत्रपती महाराजांना इंग्रज अधिकाऱ्याने अतिशय वाईट रितीने ठार मारले. इथे महाराज अगतिकच होते.पण स्वामी श्रद्धानंदासारख्या संन्याशाचा खून झाला,तो संरक्षक दक्षता न घेतल्यामुळे.प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजे भोसले घराण्यांत अनेक घातपाती प्रकार झाले,तो सिक्युरिटी न ठेवल्यामुळेच शत्रूंनी डाव साधले. शिवछत्रपती हे एकच असे नेते होते की,ते शत्रूच्या झडपेत कधीच सापडले नाहीत. काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.
शहाजीराजे भोसले हे २३ जानेवारी १६६४ रोजी कर्नाटकात होदिगेरी या ठिकाणी घोड्यावरून पडून मृत्यू पावले.राजगडावर मातु:श्री जिजाबाईसाहेब सती जाण्यास सिद्ध झाल्या.पण मोठ्या मुश्कीलीने शिवाजीराजांनी आपल्या आईस सती जाण्यापासून माघारी फिरविले.या दिवसापासून शिवाजीमहाराज आठ महिने सतत आईच्या सहवासात राहिले. स्वत:चे आणि आईचेही दु:ख निवविण्याचा हा महाराजांचा प्रयत्न होता.ते आईला कुलदेवतेच्याच ठिकाणी मानीत असत.
शहाजीराजांची समाधी शिमोग्याजवळ होदिगेरी येथे त्याचवेळी व्यंकोजीराजांनी बांधली.हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ.त्यांनीच राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली.शहाजीराजांच्या समाधीवर ‘श्री शाजीराजन समाधि‘ असा लेख कोरलेला आहे.वडिलांच्या मृत्यूनंतर महाराजांनीही राजगडावर विपुल दानधर्म केला.आईवडिलांच्या बाबतीत महाराजांचं मन अतिशय नम्र होतं.नितांत श्रद्धावंत होतं. पूवीर् एकदा (इ.स.१६४९ मे-जून) शहाजीराजांच्याच पत्रामुळे कोंढाणा उर्फ सिंहगड हा मोलाचा किल्ला आदिलशाहस देऊन टाकण्याची वेळ महाराजांवर आली.स्वराज्यातला तळहाताएवढाही प्रदेश शत्रूच्या ताब्यात जाण्याची वा देण्याची वेळ आली तर महाराजांना अतोनात वेदना होत असत.इथं तर सिंहगडसारखा किल्ला वडिलांच्या चुकीमुळे,बेसावधपणामुळे बादशाहला द्यावा लागतोय याच्या वेदना आणि तेवढाच वडिलांच्यावरती राग महाराजांच्या मनात उफाळून आला.आणि ते शहाजीराजांच्याबद्दल रागावून कडू बोलले.पण क्षणातच त्यांनी स्वत:ला सावरलं आणि जरी वडील चुकले असले,तरी वडिलांच्याबद्दल असे कडू बोलणे योग्य नाही याची जाणीव त्यांना झाली.त्यांनी सोनो विश्वनाथ डबीर यांच्यापाशी आपले व्याकूळ दु:ख आणि पश्चाताप व्यक्तही केला.यावरून आणि इतरही काही चारित्र्याची जडणघडण कशी झाली याची आपल्याला कल्पना येते.इथं आणखीन एक गोष्ट लक्षात येते, ती जिजाबाई आऊसाहेबांच्या बद्दलची.या आईने आपल्या शिवबांवर अगदी सहजपणे दोन संस्कार केलेले दिसून येतात. त्यातला पहिला संस्कार शहाजीराजांच्या बाबतीतला.तिने आपल्या मुलापाशी शहाजीराजांच्या हातून घडलेल्या राजकीय चुकांबद्दल कधीही टीका आणि कठोर दोषारोप केलेले आढळून येत नाहीत.अन् दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूपक्षातीलही कोणत्याही धर्माच्या वा जातीच्याबाबत कडवट द्वेषभावना निर्माण होऊ दिली नाही.तशी एकही नोंद उपलब्ध नाही. ती महाराजांना,‘या अफझलखानाला ठार मार‘ असं म्हणते पण तो मुसलमान आहे म्हणून त्याला ठार मार असा भाव त्यात अजिबात दिसत नाही. जातीधर्मद्वेषाच्या पार पलिकडे गेले ही मायलेकरे आमच्या इतिहासात दिसून येतात. जिजाऊसाहेबांची ही शिकवण म्हणजे मराठी इतिहासातील एक पवित्र अध्याय आहे.त्यावर अशा चार ओळी लिहून भागणार नाही. विस्मृत प्रबंधच लिहावयास हवा.
या वर्षीचा ( इ.स.१६६४ ) पावसाळा संपत आला आणि ऑक्टोबरच्या प्रारंभीच्या महाराजांना विजापुरकडची खबर मिळाली की,खवासखान या सरदारास बेळगांवमार्गे कोकणात कुडाळ भाग शिवाजीराजांकडून जिंकून शाही अमलाखाली आणण्याकरिता मोठ्या सैन्यानिशी कूच करण्याचा हुकुम झाला आहे.खानाबरोबर मुधोळहून बाजी घोरपडे यांनाही जाण्याचा हुकुम सुटला आहे.हे बाजी घोरपडे बादशाहचे निष्ठावंत सेवक आणि म्हणूनच स्वराज्याचे शत्रू बनले होते.त्यांनीच पूर्वी शहाजीराजांना बेड्या घालून कैद केले होते.या सर्व गोष्टींचा राग जिजाऊसाहेबांच्या आणि महाराजांच्या मनात सतत धुमसत होता. वडिलांचे चिरंजिवांस तर सांगणे होते की, ‘बाजी घोरपडे यांचे वेढे घ्यावेत‘ वेढे म्हणजे सूड.
आईवडिलांची ही इच्छा आणि स्वराज्यातीलच एक कठोर कर्तव्य म्हणून महाराजांनी याचवेळी (ऑक्टोबर १६६४ ) राजगडावरून तडफेने कूच केले. बाजी मुधोळहून खवासखानास सामील होण्याच्या आतच त्यांनी मुधोळवरच धडक मारली.या अचानक छाप्यात बाजी घोरपडे महाराजांचे हातून ठार झाले. वर्षाच्या आतच महाराजांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली.हा मुधोळवरील महाराजांचा छापा लष्करी दृष्टीनेही अतिशय अभ्यास करण्यासारखा आहे. हाही एक प्रबंधाचा विषय आहे. या छाप्याने विजापूर हादरले. कारण मुधोळ ते विजापूर हे अंतर फार कमी आहे.याचा दुसरा अर्थ असा होता की,शहाजीराजांच्या मृत्यूनंतर महाराजांनी थेट विजापुरच्या वेशीपर्यंत धडक मारली होती. महाराजांच्या या सगळ्या लष्करी वेगांचा अभ्यास केला,तर असा गतीमान सेनापती भारतात तर सापडत नाहीच,पण युरोपिय इतिहासातही कोणी दिसत नाही.थोडा फार नेपोलियनच महाराजांच्या जवळपास येऊ शकतो. मुधोळवरच्या छाप्यानंतर महाराजांनी थेट कुडाळ-सावंतवाडीवर दौड घेतली आणि तेथे येऊन बसलेल्या खवासखानावर त्यांनी हल्ला चढविला.खानाचा पूर्ण पराभव झाला.राजगड ते विजापूर ते मुधोळ ते कुडाळ ही अंतरे नकाशात पाहिली की आणि कमीतकमी वेळात महाराजांनी मारलेली यशस्वी दौड पाहिली की माझे वरील विधान वाचकांच्या लक्षात येईल.
या कुडाळ स्वारीत एकच गोष्ट महाराजांना जाणवली असेल की, खवासखानाच्या फौजेत व्यंकोजीराजे भोसले हे आपले भाऊ आपल्याविरुद्ध लढावयास उभे आहेत.वडिलांच्या मृत्यूनंतर दोन भाऊ एकमेकांच्या विरुद्ध शत्रू म्हणून उभे राहावेत हे आमच्या वाट्याला वाढून ठेवलेले कायमचेच दुर्दैव आहे. खवासखान आणि व्यंकोजीराजे पराभूत झाले;अन् सुखरूप विजापुरास सुखरूप पोहोचले. स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत
कुडाळची मोहिम फत्ते करून महाराज ससैन्य मालवणास आले.हा सागरी किनारा. मालवणातून महाराजांचे लक्ष समुदावर फिरत होते.ते बेट त्यांना समोरच दिसत होते.बेटाचे नाव कुरटे बेट.महाराजांनी आपल्या कोकणी शिलेदारांसह हे बेट, होडीतून जाऊन पाहिले.त्यांना फार आवडले.ते म्हणाले, ‘इथं सागरी किल्ला बांधावा‘.
खरं म्हणजे सुरतेहून आणलेली संपत्ती सागरी सरहद्द बळकट करण्यासाठी महाराज कुठेतरी पण योजनापूर्वक खर्च करण्याचा विचार करीत होतेचे. या कुरटे बेटावर जर पाणकोट बांधला तर दक्षिणेकडील गोवेकर फिरंग्यांच्या आणि इतर शत्रूंच्या तोंडावर आपलाही एक जबरदस्त जंजिरा उभा राहील हा विचार त्यामागे होता आणि महाराजांनी तो बोलूनही दाखवला, ‘येथे जलदुर्ग बांधावा ऐसा मानस आहे‘ यानिमित्ताने यावेळी एक चित्तरकथाच घडली.या नव्या पाणकिल्ल्याचे भूमीपूजन करावे, त्याकरिता आधी सुमुहूर्त पाहावा अन् लगेच संकल्प सोडून मग कामास सुरुवात करावी असा विचार त्यांचे मनी आला.त्यांनी बरोबरच्या कारभाऱ्यांस पूर्वतयारीची आज्ञा दिली. महाराजांचे बरोबर त्यांचे राज गुरुजी होतेच.अडचण काहीच नव्हती.पण महाराज म्हणाले, ‘येथे आपले गुरुजी नकोत‘ मग ? जे मालवणातील स्थानिक धामिर्क कार्य करणारे नेहमीचे गुरुजी असतील त्यांनाच बोलवावे.कारभाऱ्यांना कदाचित यावेळी संभ्रमही पडला असेल. आपले गुरुजी आहेत ना?मग स्थानिक कशांस?
पण यातच या राजाचे मन व्यक्त होणार होते.स्थानिक माणसांकडून अशी कार्य करवून घेतली की,स्थानिक माणसांची मने स्वराज्याच्या कामात अधिकच रुजतात,एकरुप होतात. त्यांची नाती अतूट होतात. मालवणातील स्थानिक गुरुजी होते, कोणी एक जानभट अभ्यंकर वयोवृद्ध स्वभावाने खास मालवणी.जरा तिखट.
महाराजांनी जानभटांस आणावयास कारकुनांबरोबर पालखी पाठवली.भटजी घरीच होते.पालखी आली.कारकून म्हणाले, कुरट्या बेटावर महाराज राजश्री जलदुर्ग बांधीताती,तरी प्रथम पूजनांस मुहूर्त पाहणे आहे. संकल्प सोडणे आहे.म्हणून राजेश्री आपणास बोलविताती. पालखी आणली आहे चलावे.
पण भटजी साफ नकार देऊन म्हणाले, ‘आमचे येणे होत नाही ‘
नवलच.एवढा शिवाजीराजा राजकाजासाठी बोलावतोय,पालखी पाठवतोय अन् हे भटजी येत नाहीत.काय कारण ? जानभट कारणही सांगेनात.पालखी परत गेली. महाराजांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी पालखीसह पुन्हा कारकुनांना जानभटजींकडे निमंत्रण पाठविले,पुन्हा तेच. गुरुजींनी नकार दिला.पालखी परतली.महाराजांनी कारकुनांना पुन्हा पाठविलं अन् म्हटलं की,भटजींस घेऊन येणे,न आलियास उचलून घेऊन येणे.
अन् तसंच करावं लागलं. कारकुनांनी नम्र जबरदस्ती करून गुरुजींना पालखीतून महाराजांकडे आणलं. महाराजांनी त्यांचे न येण्याचे कारण पुसलं,तेव्हा तो गरीब ब्राह्माण म्हणाला,महाराज येथे धर्मराज्य आले.आनंदच आहे. पण येथे तुम्ही जलदुर्ग बांधू पाहता.आम्हांस संकल्प मुहूर्त सांगावयास बोलविता.पण आम्हांस भय वाटते.कारण की,पलिकडे (वेंगुर्ला भागात) आदिलशाही ठाणी अजून आहेत. ( त्यापलिकडे गोवेकर फिरंगी आहेत.) ते उद्या येथे चालून आल्यास प्रथम आम्हांसच धरतील म्हणून भय वाटते. महाराजांच्या अगदी मनांतले विचार समिंदरातल्या देवमाशासारखे उसळून आले. स्थानिक सरहद्दीवरील अवघ्या प्रजेस असा पूर्ण विश्वास वाटला पाहिजे की,आमच्या राज्याची ही सरहद्द आमच्या राजाने अगदी पक्की बंदोबस्तात जागती ठेविली आहे.तो आपली पुरेपूर खबरदारी घेणारच आहे,हा विश्वास अवघ्यांच्या मनांत ठाम होणे गरजेचे आहे.म्हणूनच तर महाराजांनी या धार्मिक कार्यासाठी स्थानिक वेदमूर्तींना बोलविले.महाराजांनी आपला विचारही बोलून दाखविला की,चिंता करू नका. येथे असे समर्थ लष्करी ठाणे घालतो की, आमचे सार्मथ्य पाहून सरहद्दी पलिकडचे जे शत्रू असतील ते दहशत खाऊन उठोन निघूनच जातील.
सरहद्दीच्या रक्षणाबद्दलचा महाराजांचा हा विचार किती मोलाचा होता! आमच्याच देशात आमचेच नागरिक निर्वासित व्हावेत हे बरे नव्हे.आमच्या सरहद्दी चिरेबंदीच असल्या पाहिजेत.आमच्या सरहद्दीवरची बायकामाणसेच काय,पोरेबाळेच काय पण गाईवासरेही निर्धास्त असली पाहिजेत.आमचे राज्यकर्ते आमच्या पाठिशी अहोरात्र जागे उभे आहेत हा विश्वास ठामपणे सर्वांच्या मनांत असला पाहिजे,हा विचार केवढा मोलाचा आहे.महाराजांच्या मनांत तोच होता.मग श्रीगणेश पूजन झाले.मुहूर्त ठरला.चिरा बसला. बेटावर बांधकामास सुरुवात झाली.सुरतेतील खंडणी स्वराज्याच्या नव्या आरमारी तळासाठी खर्ची पडू लागली. शाही फौजेचा पूर्ण पराभव झाला होता,तरीही विजापूरच्या आदिलशाहाने व्यंकोजीराजे भोसले यांना दोन गावे इनाम दिली, स्वराज्याविरुद्ध अन् भावाविरुद्ध इमानदारीने लढल्याबद्दलचे हे इनाम.ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते
जीवनात संकटे कोणावर येत नाहीत? सुख-दु:खाच्या धाग्यांनी प्रत्येकाचे जीवन विणलेलेच असते.प्रखर तेजस्वी सूर्यालाही ग्रहणकाळ अटळ असतो.आता स्वराज्यावरही एक महाप्रचंड आक्रमण येऊ घातले होते. दिल्लीत औरंगजेब अशा मोठ्या मोहिमेची योजना करीत होता.ही त्याची स्वराज्यावरील मोहिम जणू निर्णायक ठरणार आहे,असा प्रचंड आखाडा तो मांडीत होता. खरोखरच हे लहानसं हिंदवी स्वराज्य या मोगली मोहिमेत टिकणार की संपणार असाच जबडा औरंगजेबाने उघडला होता.प्रचंड सैन्य,तोफखाना,हत्ती, युद्धसाहित्य,खजाना दक्षिणेवर जणू फुटलेल्या प्रचंड धरणासारखा लोटावयाचा हा आराखडा होता.म्हणजे त्याच चुका पुन्हा एकदा औरंगजेब करीत नव्हता का ? तळहाताएवढ्या शिवस्वराज्याचा आणि मूठभर शिवसैन्याचा समूळ नाश करण्याकरीता हे अफाट बळ महाराष्ट्रावर पाठविले की,आपले काम चोख होणार.आपण फक्त वाट पाहायची, मोगली झेंडा शिवाजीच्या राजगडावर फडकल्याच्या बातमीची आणि तो शिवाजी मारला गेल्याची किंवा कैद केल्याची.आपण अलमगीर आहोत.सीवा एक भुरटा दंगेखोर आहे.असेच मूल्यमापन प्रारंभापासून (ते स्वत:च्या अंतापर्यंत) औरंगजेब करीत होता.बळाने बुद्धिचा पराभव करता येतो अशी त्याची कल्पना होती.इथेच तो चुकत होता.अन् आजही अनेकजण अशाच चुका करतात.हिटलरने चचिर्लच्या बाबतीत आणि अमेरिकने व्हिएतनामच्या बाबतीत अशीच चूक केली.परिणाम जगाला दिसून आला.औरंगजेब हीच चूक आत्ता ( इ.स.१६६५ ) नव्याने करीत होता.प्रचंड युद्धसाहित्य आणि सेना असूनही शाहिस्तेखानचा पराभव का झाला याचा त्याने थोडासुद्धा विचार केलेला दिसत नाही. शिवाजीमहाराजांचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती योगेश्वर श्रीकृष्णाच्या ( कागदावर न रेखलेल्या पण कृतीत आणलेल्या) चक्रव्यूहाइतकी अभेद्य आणि आत्मविश्वासू होती. या शिवनीतीचा आणि शिवकार्याचा पराभव करण्याची ताकद कोणत्याही शत्रूकडे नव्हती.तिचा पराभवच करावयाचा असेल तर त्यांचेच लेक करू शकतील.अन् त्यांच्याच लोकांनी या शिवनीतीचा आणि शिवस्वराज्यकार्याचा घात केलेला पुढे आपल्याला दिसून येत नाही का ?
आज इतिहासात उभा दिसतो आहे तो असाच औरंगजेब. शिवाजीराजा न समजलेला महान शत्रू.पुन्हा एकदा प्रचंड सैन्य दक्षिणेवर निघाले. औरंगजेबाने एक गोष्ट मात्र मोलाची केली. त्याने विवेकी,अनुभवी आणि बुद्धिमान असा सेनापती नेमला. त्याचे नाव मिर्झाराजा जयसिंग. हा एकमेव सेनापती असा आहे की ज्याने शिवाजी महाराजांच्या युद्धपद्धतीचा शिवअनुयायांचा आणि शिवमुलुखाचा बराच विचार केलेला आहे.पण त्यातही औरंगजेबाने आपल्या संशयी स्वभावाप्रमाणे दिलेरखान पठाण या जबरदस्त सरदारास जवळजवळ बरोबरीचे अधिकार देऊन मिर्झाराजांबरोबर पाठविले. दिलेरखान हा जबर योद्धा आहे. पण त्याला डोके कमी आहे. ते पुढे दिसून येईलच.औरंगजेबाने शिवाजीराजांविरुद्ध मिर्झाराजा आणि दिलेर यांना पाठविले. म्हणजेच तीन पायांची शर्यत खेळायला एकमेकांचे एकेक पाय एकत्र बांधून धावायला पाठविले.
स्वराज्यावरील हाच तो ग्रहणकाळ.हे ग्रहण क्षणिक की खग्रास हे काळ ठरविणार होता. नव्हे,स्वराज्यच ते ठरविणार होते. म्हणजेच स्वराज्यातील जनता आणि रणांगणावरचे मराठी सैनिक.नक्की आकडे माहित नाहीत. पण सुमारे दीड ते पावणेदोन लाख फौज या मोगली मोहिमेत आहे.इतर मोहिमांपेक्षा या मोहिमेत एकच गोष्ट (प्रकर्षाने) दिसून येते की,मिर्झा आणि दिलेर यांच्याबरोबर जनानखान नाही.मिर्झाराजे आणि दिलेर इ.स. १६६४ ऑक्टोबर २९ नंतर मोहिमशीर झाले.
विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की,या प्रचंड आक्रमणाच्या वार्ता महाराजांना समजत होत्या. त्यांना पुरेपूर कल्पना होती.ते सावध होते.याच काळात त्यांनी एक साधे गणित मांडलेले दिसते की,ही मोगली लाट (इ.स. १६६४ ) च्या दिवाळीच्या दिवसांत दिल्लीहून निघतेय.ती आपल्या सरहद्दीवर येऊन पोहोचायला,म्हणजेच पुण्यावर पोहोचायला अजून पाच महिने लागणार आहेत, हे निश्चित. तेवढ्या वेळेत इतर काही कामे उरकता येतील.म्हणून महाराजांनी कर्नाटक सागरी किनाऱ्यावरील कारवार,मर्जा, अंकोळा,भटकळ,सदाशिवगड आणि बसनूर इत्यादी महत्त्वाची आदिलशाही ठाणी गिळून टाकण्याची योजना केली. आपल्या उत्तर आणि पूर्व स्वराज्यसरहद्दीची चिंता त्यांना नव्हतीच. पुरंदर,लोहगड,माहुलीगड, कसाराघाट इत्यादी ठाणी सुसज्जच होती.कोकणी सौंगड्यांच्या पूर्ण भरवशावर ते कोकणात निर्धास्त होते. महाराजांनी याचवेळी येत असलेल्या सूर्यग्रहणाचे दिवशी एक दानसोहळा करावयाचे योजिले. दि. ६ जाने. १६६५ , पौष वद्य आमावस्या या दिवशी सूर्यग्रहण होते.महाबळेश्वर येथे त्यांनी आपल्या आईची म्हणजेच जिजाऊसाहेबांची सोन्याने तुळा केली.हे सर्व धन दानधर्मात खर्च करावयाचे असते ते केले. महाराज दि. ८ फेब्रुवारीस मालवणांस आले.पूर्वयोजनेने आरमार बंदरात सिद्ध होते. महाराज गलबतावर चढले. कारवारवरील ही त्यांची मोहिम आरमारातून होणार होती.त्यांच्या आयुष्यातील ही एकमेव आरमारी स्वारी. महाराज कारवारवर निघाले.मिर्झा राजा बुऱ्हाणपुरावरून औरंगाबादकडे सरकत होता.महाराजांनी सूर्यग्रहणाचेवेळी स्नाने,दाने, पूजाअर्चा केल्या होत्या. मिर्झाराजेही व्रतवैकल्ये करीत स्वराज्यावर येत होते.बगलामुखी कालरात्री या भवानीदेवीची त्यांनी होमहवनपूर्वक आराधना केली. पुढे शिवशंकराची कोटीलिंगार्चने अंत:करणपूर्वक केली. औरंगजेबाला यश मिळावे आणि शिवाजीराजाचा पूर्ण विनाश व्हावा ही मिर्झाराजांची श्रीचरणी प्रार्थना होती. एकाचे मन असे, दुसऱ्याचे मन तसे.तिसरे मन औरंगजेबाचे.त्याला शिवाजीराजेही नको होते अन् मिर्झाराजेही नको होते.या तीन मनांचा आम्ही कधीही अन् आजही अभ्यास केला नाही अन् करीतही नाही. मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.
शाहिस्तेखानाच्या फटफजितीनंतर,त्याच्याच हाताखालचा सरदार जसवंतसिंह राठोड हा खूप मोठी फौज घेऊन पुण्याशेजारच्याच सिंहगडाला वेढा घालण्यासाठी आला.त्याने गडाला मोर्चे लावले. त्याच्याबरोबर त्याचा मेव्हणा बुंदीमहाराजा भावसिंह हाडा हाही होता.झुंज सुरू झाली.
शाहिस्तेखानाची झालेली फजिती सर्वात जास्त असह्य होत होती या जसवंतसिंहाला आपण पुण्यात लाल महालाभोवतीच्या छावणीत असताना खानावर छापा पडावा हा जणू या सिंहाला स्वत:चाच अपमान वाटत होता.झालेल्या फजितीचा थोडातरी बदला घेण्याकरीता आपण शेजारचा सिंहगड घ्यावा असा जसवंतचा हेतू होता.
हा वेढा चालू असतानाच सिंहगडच्या पश्चिमेच्या बाजूने स्वत: महाराज पाच हजार घोडदळ घेऊन सुरतेवर गेले. जसवंतला याचा पत्ताच नव्हता. महाराज सुरतेहून परत असेच जसवंतच्या पश्चिमबाजूने राजगडला गेले.जसवंतला याचाही पत्ता नव्हता.बातमीदार नाहीत,लष्करी गस्त नाही, सावधपणा नाही. कशी या मोगलांना कल्पना आली की, हे मराठे कोल्हे आपल्या अवतीभोवती आट्यापट्या खेळताहेत अन् आपल्याला त्यांचा भयंकर धोका आहे.पण केवळ प्रचंड युद्धसाहित्य,पैसा आणि अपार सैन्य याच्या जिवावर आपण मराठ्यांना मोडून काढणार आहोत अशी स्वप्न हे लोक पाहत होते.निव्वळ हा त्यांचा भाबडेपणा होता.आता पाहा, दि. ६ एप्रिल १६६३ या दिवशी शाहिस्तेखानावर महाराजांचा छापा पडला.त्या दिवसापासून ते पुढे मिर्झाराजा आणि दिलेरखान दुसरी प्रचंड मोहिम घेऊन याच पुण्यात येईपर्यंत,म्हणजेच मार्च १६६५ पर्यंत मोगलांचा मुक्काम पुण्यात होताच.या पावणेदोन वर्षात मोगली सरदारांनी काय काय मिळवलं? काहीही नाही. जसवंत आणि भावसिंह हे सिंहगडाला गराडा घालून बसले होते.प्राप्ती काय? शून्य.मधूनमधून मराठ्यांच्याच हातचा मार खात होते.
याच काळातील शिवाजी महाराजांची कमाई लक्षात घ्यावी. सुरतेची खंडणी ही त्यांची प्रचंड आथिर्क कमाई.मुधोळकर बाजी घोरपड्यांचा समूळ फडशा, कुडाळवर खवासखानाचा पूर्ण पराभव,सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास प्रारंभ, जिजाऊसाहेबांची महाबळेश्वरास सुवर्णतुळा दानधर्म, कारवारवरील आरमारी स्वारी अन् याशिवाय अनेक लहानमोठी स्वराज्यातील कामे यशस्वी.हा हिशोब पाहिल्यावर मोगल आणि मराठे यांचा उद्योग कोणत्या काळ काम आणि वेगाने चालला होता हे लक्षात येते.महाराजांचा कामाचा हा झपाटा पाहिला की,त्यांच्या ध्येयवादाची कल्पना येते. साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर आपण मराठे आणि आपला महाराष्ट्र स्वराज्य मिळवीत आहोत,याची सावध जाणीव महाराजांना आणि त्यांच्या सवंगड्यांना होती. पाहा, या साऱ्या उद्योगात उपभोगाला, उनाड चैनबाजीला,आळसाला अन् आरामाला कुठे जागा सापडते का ? नाही,नाही,नाही. जीणशीर्ण अवस्थेतून स्वतंत्र होणाऱ्या राष्ट्राने या चंगळबाजीच्या वासालाही उभे राहू नये.पहिल्या दोन पिढ्यांनी करायचे ते राष्ट्र उभारणीसाठी कष्ट,कष्ट आणि कष्टच.त्याची गोड फळे खायची ती पुढच्या पिढ्यांनी.आपण फक्त करायची साधना आणि आराधना.आपण जगले पाहिजे व्रतस्थ वारकऱ्यासारखे.
हे सारे शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनात अखंड दिसून येते.म्हणूनच त्याही वेळचे लोक म्हणत की,हे राज्य म्हणजे देवताभूमी,हे राज्य श्रीच्या वरदेचे आहे.हे राज्य व्हावे हे श्रीचे मनात फार आहे.मराठीयांचे गोमटे करावे यासाठी अवघा डाव मांडिला.हे सारं स्वराज्यावर औरंगजेबाच्या वतीने चालू न येणाऱ्या राजपुतांना,बुंदल्यांना, जाटांना आणि शाही छावणीत इमानेइतबारे चाकरी करणाऱ्या पंडितांना कधी दिसलेच नाही का ? दिसले असेल,पण उमजले नाही. कारण देश आणि समाज यांच्याशी काहीतरी आपल्याला करावयास हवे ही भावनाच शून्यात होती. खाना पिना,मजा करना या पलिकडे त्यांना जीवनच नव्हते.
जसवंतसिंगने सिंहगडला वेढा घातल्याला पाऊण वर्ष होऊन गेले होते.परिणाम शून्यच.अखेर एके दिवशी जसवंतसिंहाने गडावर सुलतान ढवा केला. म्हणजे काय ? म्हणजे एकवटून गडावर हल्ला चढविला.पण तो हल्ला गडावरच्या मराठ्यांनी पार चुरगाळून काढला.हल्ला वाया गेला.पण मराठ्यांनीही एके दिवशी (२८ मे १६६४ ) गडावरून बाहेर पडून पायथ्याशी असलेल्या जसवंतसिंहाच्या छावणीवर भयंकर हल्ला चढविला.त्यांनी मोगलांना झोडपून काढले.खुद्द जसवंतसिंहालाही जखमा झाल्या.जसवंतसिंह आणि भावसिंह अवघ्या मोगल फौजेनिशी पुण्याकडे धूम पळाले. पूर्ण पराभव.हे दोन सिंह जिवंत सुटले हीच कमाई.
म्हणजे थोडक्यात हिशोब असा की शाहिस्तेखानच्या या टोलेजंग मोहिमेत मोगलांची कमाई काय ? तर फक्त चाकणचा छोटासा किल्ला.खरोखर हा सारा इतिहास चित्रपटाच्या (डॉक्युमेंटरीज) माध्यमातून तुम्हा उमलत्या तरुणांपुढे मांडला पाहिजे. वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.
कारवार किनाऱ्यावरील बसनूर उर्फ बसिर्लोखर महाराजांचा आरमारी छापा पडला.पण या मोहिमेमागे किती पद्धतशीर योजना त्यांनी केली असेल याचा अभ्यासकांनी विचार करावा. आधी हेर पाठवून तेथील लष्करी आणि राजकीय स्थितीची पूर्ण माहिती मिळवून नंतरच ही सागरी मोहिम त्यांनी केली.त्यात यश चांगले मिळाले.पण अपेक्षेप्रमाणे पुरेपूर मिळाले नाही.जेथे यश मिळाले नाही त्याचाही त्यांनी नंतर पुरेपूर अभ्यास केलेला दिसतो.प्रत्येक विषयात ते अभ्यासाला आणि योजनाबद्ध आराखड्याला महत्त्व देत असत. आमचे आजचे थोर समाजसेवक बाबा आमटे तरुणांना उद्देशून एक गोष्ट निक्षून सांगतात,मलाही त्यांनी ती सांगितली.ती अशी ‘भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा‘ किती महत्त्वाचा इशारा आहे हा नाही ? अगदी हेच सूत्र महाराजांच्या कार्यपद्धतीत आढळते.
पण भान ठेवून केलेल्या योजनेत जर कुणी कार्यकर्ता अनुयायी चुकला किंवा त्याने जाणूनबुजून कुचराई केली,तर बेभान होऊन केलेले काम अपेक्षित होते. थोडाफार असाच प्रकार कारवार मोहिमेत कोणा तरी हेरगिरी करणाऱ्या गुप्तचराकडून घडला. आपला मराठी माणूस अचूक वागावा,अचूक चालावा आणि अचूक बोलावा ही महाराजांची अपेक्षा नेहमीच असे. पण त्यातूनही असा क्वचितच का होईना,पण चुकार गडी निघत असे.कारवार मोहिमेत अशी चुकीची वा अपुरी गुप्त बातमी आपल्याच हेरांनी दिल्यामुळे आपणांस थोडे अपयश आले हे महाराजांनी हेरले.पण त्यांनी कानाडोळा केला नाही.त्यांनी त्या संबंधित हेराला शासनही केले. करायलाच हवे होते.नाहीतर चुका करायची चटक लागते.कोणाची तरी चिठ्ठी आणली की, मोठमोठ्या गुन्ह्यातील प्रतिष्ठित आरोपी अलगद सुटतात,नंतर मानाने मिरवतातही हे बरे नव्हे.
या कारवार मोहिमेच्या काळातच महाराजांचा वाढदिवस (फाल्गुन वद्य तृतीया) येऊन गेला.हा त्यांचा पस्तीसावा वाढदिवस.पण तो साजरा केल्याची नोंद नाही. इतकंच नव्हे त्यांनी आपला कोणताही वाढदिवस साजरा केला नाही. आज मात्र आमच्या तरुण,तडफदार,तेजस्वी हिरोंना विसाव्या वर्षांपासून प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस जाहिरातबाजीने साजरा करण्याची चटक लागली आहे. सिद्धीच्या मागे लागावे, प्रसिद्धीच्या नव्हे.शिवरायांस आठवावे.जीवित तृणवत मानावे. महाराजांनी स्वराज्य साधनाची लगबग कैसी केली,ते स्मरावे. स्वत:चा आरोग्यसंपन्न शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची जरुर महत्त्वाकांक्षा ठेवावी. त्यासाठी निर्व्यसनी असावे,असो. बहुत काय लिहिणे ?
मोहिम संपवून महाराज भूमार्गाने परतले.मोहिमेवर येत असलेले मिर्झाराजे पुण्याच्या दिशेने सरकत होते.ते आणि दिलेरखान पुढच्या मोहिमांची चर्चा करीत असावीत असे दिसून येते. दोघांचेही हेतू एकच होते. शिवनाश! पण पद्धती वा मार्ग जरा भिन्नभिन्न होते.दिलेरचे म्हणणे असे की,‘या शिवाजीराजाचे किल्ले एकूण आहेत तरी किती ? फार फार तर चाळीस. ते सर्वच किल्ले आपण युद्धाने जिंकून घेऊ. हा विचार आपल्या प्रचंड सैन्यबळावर दिलेर मांडीत होता. हा विचार केवळ शिपाईगिरीचा होता. त्यात सरदारी नव्हती. डोके कमीच होते.मिर्झाराजांचा विचार वेगळा होता.त्यात अभ्यास दिसून येतो. मिर्झाराजांचे म्हणणे थोडक्यात असे शिवाजीराजाचे किल्ले घेणे वाटते तितके सोपे नाही.कारण त्या किल्ल्यातील मराठी माणसं अजिंक्य आहेत.ती फितवा फितुरीने विकत घेणे वा लढूनही जिंकून घेणे जवळजवळ अशक्य आहे.या माणसांचे म्हणजे लढाऊ सैनिकांचे घरसंसारच जर आपण तुडवून काढले आणि त्यांची बायकापोरे,शेतीवाडी आणि त्यांची खेडीपाडी पार मुरगाळून काढली तर गडागडांवर असलेले हे मराठी आपोआप भुईवर गुडघे आणि डोकं टेकतील.त्यामुळेच शिवाजीराजा हा आपोआप शरण येईल.
असा विचार आणि पुढे प्रत्यक्ष तो विचार कृतीत आणू पाहणारा मिर्झाराजा जयसिंग हा एकमेव शत्रू वा सेनापती ठरला.बाकीचे सगळे हाणामारी आणि जाळपोळ करणारे केवळ दंगेखोर.दिलेर आणि मिर्झा हे दोन सेनापती आपापले विचार घेऊन पुण्यात दाखल झाले. महाराजांनी एक तिसराच प्रयत्न करून पाहिला. मोगलांचे बळ अफाट आहे आणि मिर्झाराजा हा सेनापतीही शहाण्या डोक्याचा आहे.जर हे प्रचंड मोगली वादळ आपल्या अंगावर न येऊ देता परस्पर विजापुरच्या आदिलशाहकडेच वळविता आले तर स्वराज्याला मोगली धक्का लागणार नाही,या हेतूने महाराजांनी मिर्झाराजाकडे अशी बोलणी वकिलामार्फत केली की,हा विजापूरचा बादशाह आदिलशाह दिल्लीचा शत्रू आहे. त्याचा तुम्ही पुरा मोड करा. आम्ही तुम्हांस मदत करू.
म्हणजे विजापूर खलास करून टाकायचं अन् त्यात आपणही चार ओंजळी कमवायच्या असा हा महाराजांचा डाव होता. तो डाव मिर्झाराजांनी अचूक ओळखला. आणि त्यांना दादच दिली नाही. मोगली फौज त्यांनी थेट पुण्यावर आणली. पुणे ही त्यांची केंद छावणी झाली. शाहिस्तेखानापासून पुणे मोगलांच्याच ताब्यात होते. आता आपण टाळू पाहात असलेले मोगली आक्रमण टळत नाही,हे महाराजांना कळून चुकले. संकट कितीही मोठे अंगावर आले तरीही आपला आब न सोडता ताठ उभे राहायचे हा महाराजांचा नेहमीचा स्वभाव.
मिर्झाराजा आणि दिलेरखान यांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे मराठ्यांविरुद्ध डाव खेळायचं ठरविलं.मराठी स्वराज्याची जाळपोळ, लूट जनतेवर अत्याचार ही मराठ्यांना शरण आणण्याकरिता मिर्झाराजाने ठरविलेली खेळी त्याने सुरू केली. पुण्यात कुबाहतखानास,कार्ला, मळवली, वडगांव या मावळ भागात कुतुबुद्दीनखान आणि पुण्याभोवतीच्या भागात इंदमणबुंदेला,रायसिंग सिसोदिया इत्यादी सरदारांना ही धूमाकूळ घालण्याची कामगिरी सांगून धामधुमीस प्रारंभही केला. (मार्च. १६६५ ) ब्रिटीश भूमीवर सतत बॉम्बवर्षाव करून ब्रिटीश सैन्याचे धैर्य खचविण्याचा हिटलरने असाच प्रयत्न दुसऱ्या महायुद्धात केला होता हे आपल्याला आठवतंय ना ? अशाच घनघोर प्रसंगी राष्ट्राचे चारित्र्य दिसून येते. ते खचते तरी किंवा धगधगते तरी.
परीक्षा होती स्वराज्यातील जनतेची.मराठी सैनिकांना हा मोगलाई वणवा दिसत होता. आपली घरेदारे आणि बायकापोरे पार चिरडून निघत आहेत,हे मराठ्यांना उघडउघड दिसत होते.समोरासमोर मोगलांशी झुंजायला मराठी माणूसबळ कमी पडत होते.तरीही प्रतिकार चालूच होता.स्वराज्यास आरंभ झाल्यापासून आत्तापर्यंत (१६४६ ते १६६५ ) मराठी सैनिक सतत लढतोच आहे.विश्रांती नाहीच अन् आता तर ढगफुटीसारखे मोगली हत्ती आपल्यावर तुटून पडले आहेत.हे मराठ्यांना दिसत होतं. महाराजांनाही दिसत होतं. नकाशा पाहिला तर हा मोगली धूमाकूळ मुख्यत: पुणे जिल्ह्याच्या मध्य आणि पश्चिम भागावर मिर्झाराजांनी केंदित केला होता.
पण इथेच शिवशाहीचा मावळा सैनिक आपलं प्रखर धैर्य,शौर्य, सहनशीलता,त्याग,निष्ठा आणि नेतृत्त्वावरील विश्वास अन् प्रेम अगदी नकळत,अगदी सहज, अगदी उत्स्फूर्त अन् अगदी हसतहसत जगून वागून दाखवित होता.यालाच राष्ट्रीय चारित्र्य म्हणतात.या काळातील या आक्रमक आगीच्या वर्षावात कोणत्याही किल्ल्यावरचा वा दऱ्याकपारातल्या ठाण्याछावणीतला मराठा सैनिक हताश,निराश,गर्भगळीत वा अगतिक झालेला दिसत नाही. हे कशावरून ? फितुरी नाही. आपापल्या कामात कसूर नाही अन् महाराजांकडे केविलवाण्या विनविण्याही नाहीत की महाराज आमचे संसार मातीला मिळताहेत.महाराज हे युद्ध थांबवा.शरण जा.तह करा. आम्हाला वाचवा.
मराठी स्वराज्याच्या पाठीचा कणा वज्रासारखा आणि गर्दन शेषासारखी ताठ दिसून आली ती या मिर्झा-दिलेर यांच्या आक्रमणाच्या काळातच.असा हा कणा होता की,वाकणारही नाही अन् मोडणारही नाही. असे हे कोकण,असे हे मावळ
दिलेरखानाने आपली किल्ले घेण्याची मोहिम सुरू करण्याचे ठरविले.प्रथम पुरंदर आणि सिंहगड हे किल्ले ‘लक्ष्य‘ म्हणून निश्चित केले.मोगली सर्जाखानाने सिंहगडास मोर्चे लावले.यावेळी सिंहगडावर जिजाऊसाहेब आणि महाराजांच्या एक राणीसाहेब होत्या.या नेमक्या कोणत्या राणीसाहेब होत्या,त्यांचे नाव सापडत नाही.पण जिजाऊसाहेब सिंहगडात असल्यामुळे आधीच बलाढ्य असलेला सिंहगड अतिबलाढ्य बनला.सिंहगडचा किल्लेदार यावेळी कोण होता त्याचेही नाव समजत नाही.पण गेल्याच वर्षी (दि.२८ मे १६६४ ) जसवंतसिंह राठोड आणि भावसिंह हाडा या दोघांवर जबरदस्त हल्ला करून त्यांचे मोर्चे पार उधळून लावून अन् त्यांना पिटाळून लावणारा जो मराठा किल्लेदार होता,तोच हा आताही असावा.
पुरंदर किल्ल्याला एकजोड किल्ला आहे.त्याचं नाव वज्रगड. म्हणजे दिलेरखानाने पुरंदर वज्रगड आणि सिंहगड हे किल्ले प्रथम घेण्याचे निश्चित केले. दिलेरखान आणि त्याच्याबरोबर मिर्झाराजेही पुरंदरच्या दिशेने निघाले.त्यांचा मार्ग पुणे ते हडपसर-लोणी-फुरसुंगी-चोराची आळंदी-सोनोरी-सासवड ते पुरंदर असा होता.दिलेरखानाचा कामाचा झपाटा विलक्षण गतीमान होता.आळस आणि चैनबाजी त्याच्या स्वभावातच नव्हती.मोगलांकडील एकूण सेनानायकांत या शंभर वर्षात हा दिलेरखान म्हणजे एकमेव वेगळा अपवाद ठरावा असा इस्लामी सेनानायक होता.एखादे काम अंगावर घेतले की ते पुरे करण्याकरिता तो अहोरात्र बेचैन असायचा.दिलेरखान म्हणजे मूर्तिमंत निष्ठा,मूर्तिमंत तळमळ,मूर्तिमंत तडफड.खान आणि मिर्झाराजे पुण्याहून निघाले आणि ३० मार्च १६६५ या दिवशी सोनोरीच्या डोंगराच्या दक्षिण पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावात पोहोचले.त्यांच्याबरोबर अफाट युद्धसाहित्य आणि लवाजमा होता.तरीही अवघ्या १५-१६ दिवसांत पुण्याहून ते सोनोरीस पोहोचले.सैन्य निदान पाऊणलाख तरी होतेच.येथे एक आठवण देतो.हेच अंतर फक्त ३० हजार सैन्यानीशी चालून जायला शाहिस्तेखानास पूर्ण नऊ दिवस लागले होते. दि.१ मे ते ९ मे १६६० अर्थात दिलेरखानसारख्या सतत भडकत राहणाऱ्या बारुदगोळ्याची शाहिस्तेखानसारख्या गचाळ सेनानीशीच काय पण कोणत्याही इतर इस्लामी सेनानीशी तुलना करता येणार नाही.
मोगलांनी तोफखाना मोठाच आणला होता.त्यात तीन तोफा प्रचंड होत्या. दि. ३१ मार्च १६६५ रोजी मध्यरात्री अचानक मराठ्यांच्या शेपाचशे स्वारांच्या टोळीने खानाच्या या सोनोरीजवळच्या छावणीवर एकदम वळवाच्या पावसासारखा हल्ला चढविला.छावणी झोपलेली होती.त्या प्रचंड छावणीवर हा हल्ला तसा लहानसाच होता.पण इतका भयंकर होता की, मोगलांची क्षणात तारांबळ उडाली.मराठे सुसाट वादळासारखे आले.अचाट वेगाने तुटून पडले.त्यांनी भन्नाट कापाकापी केली अन् सुसाट पसार झाले.कसे आले,कोठून आले,कोठे गेले पत्ताच नाही. आले गेले मनोगती.दिलेरला मराठ्यांचा पहिला परिचय असा झाला. दि.१ एप्रिल रोजी खान तशाच वेगाने १५ कि.मी.वर असलेल्या पुरंदरच्या पायथ्याशी जाऊन पोहोचला.खानाने लगेच मोचेर्बंदी सुरू केली. स्वत: खान जातीने नेतृत्त्व करीत होता. मिर्झाराजे या वेढ्यापासून दीड कि.मी. असलेल्या नारायणगावापाशी आपली छावणी ठोकून राहिले.
एक दिवस दिलेरच्या वेढ्यात भयंकर भडका उडाला.खानाचा दारुगोळ्याचा साठा अचानक पेटला.सगळी दारू प्रचंड स्फोटाने एकाक्षणात खाक झाली. भयानक नुकसान झाले.हा अपघात? की मराठ्यांनी केलेला आघात? नक्की माहित नाही. पण बहुदा मराठ्यांच्या गुप्तचरांनीच ही ठिणगी टाकली असावी.
पुरंदरच्या भोवती अक्षरश: तोफा बंदुकातून आग गडावर फेकली जात होती.मराठी इतिहासातील एक रौद संग्राम म्हणून या युद्धाचा अध्याय दाखवावा लागेल.
यावेळी मराठी सैन्याची पथके जागोजाग मोगलांना सतावीत होतीच.पण मनुष्यबळ कमी पडत होते.महाराज निश्चयाने उभे होते. त्यांची मनोभूमिका त्यांच्याच शब्दात अशी, ‘पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठीच मी जन्माला आलो आहे.माझ्या भूमीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य.ते बजावण्यास मी कधीही चुकणार नाही.'
मोगलांचा धूमाकूळ पुणे जिल्ह्यात चालू होता.तो त्यांनी केंद्रीत केला होता.त्यामुळे आग भयंकर होती. याचवेळी कोकण भक्कम आणि निर्धास्त होते.महाराजांचे आगरी, भंडारी,कोळी,प्रभू ,कोकणी मराठे कोकणची अन् विशेषत: किनारपट्टीची राखण करीत होते. मिर्झाराजाने यावेळी औरंगजेबास डाक पाठवून विनंती केली की, गुजराथेतून मराठी कोकणावर तुम्ही मोगली फौजा पाठवा.हे कोकण झोडपले पाहिजे. औरंगजेबाने हे केले नाही का ? माहित नाही.पण पुर्वी शाहिस्तेखानाने कोकणावर पाठविलेल्या एकूण एक सरदारांचा कोकणी मराठ्यांनी पार धुव्वा उडवून दिलेला होता. पूर्ण फजिती.हे औरंगजेबाच्या लक्षात असावे.म्हणूनच बहुदा त्याने कोकणातील आगरी,कोळी,भंडाऱ्यांची कलागत काढली नाही.दिलेर आणि मिर्झाराजा यांनीही पुण्याहून कोकणावर आपल्या फौजा पाठविण्याचे धाडस केले नाही.कोकणच्या माणसांची इथे ओळख पटते.असे हे कोकण , असे हे मावळ,चिवट, चपळ, चमत्कारिक. पुरंदरचा दख्खन दरवाजा.
पुरंदर गड बुलंद आहे बेलाग आहे.प्रचंड तर घटोत्कचासारखा आहे.असा हा गड चटकन मिळावा असा प्रयत्न दिलेरखान करीत होता.महिना उलटून गेला होता.अजूनही गड खानाला चटकन मिळत नव्हता.
अन् एक चित्तरकथाच गडाच्या दक्षिणेस काळदरीत घडली. खानानं गडाचा दख्खन दरवाजा तोफांच्या सरबत्तीने अस्मानात उडविण्याचा घाट घातला.दोन प्रचंड तोफा मोठ्या कष्टाने काळदरी या गावापासून गडाच्या या दख्खन दरवाजापासून थोड्या अंतरावर असलेल्या डोंगरमाथ्यावर चढविण्यात आल्या.खाटल्यावर पहुडलेल्या घटोत्कचानं आपला एक गुडघा उंचावावा तसा हा डोंगरमाथा दिसतो.भोवती झाडी,समोर उंचावर तो दरवाजा.हा दरवाजा जर कब्जात आला तर पुरंदरच्या थेट बाले किल्ल्यावरच आलमगिरी झेंडा लावता येईल हा दिलेरचा डाव.हे काम अत्यंत अवघड होते.पण तोफांच्या माऱ्याने दरवाजा उडवून ते साधता येईल असा खानाचा विश्वास होता.या तोफांच्या मोर्च्यावर एक मोगली तुकडी आणि दोन प्रख्यात सरदार खानाने नेमले.दाऊदखान कुरेशी आणि रसूल बेग रोजभानी हे ते दोघे अहिमही होते.म्हणजे हा दरवाजा आता अशा तोफांच्या आणि मोगली सरदारांच्या तोंडासमोरच उभा होता.त्या मानाने दरवाजा बऱ्याच उंचीवर गडाच्या खोबणीत होता.
अन् या तोफांचा मारा दरवाज्यावर सुरूही झाला.दोन-तीन दिवस उलटले.दरवाजा पक्का होता.(अजूनही आहे.) अन् याचवेळी एका रात्री गडद अंधारातून आणि गडाच्या अंगावर असलेल्या झाडीझुडपांतून सुमारे चारशे मावळे,काळदरीकडून गडावर उंदरासारखे या दरवाजाच्या रोखाने घुसले.चढू लागले.या मावळ्यांच्या पाठीवर धान्याची आणि बारुदाची म्हणजे तोफा बंदुकांच्या दारुची लहानमोठी पोती होती. महाराजांनी राजगडावरून पुरंदरगडावर मुरारबाजींना ही रसद गुपचूप पाठविली होती. सुमारे दोनशे पोती होती.मोगली सैन्याच्या आणि तोफांच्या तडाख्यातून हे मावळे मोठ्या हिमतीने,कष्टाने आणि चतुराईने गड चढत होते.दाऊदखान कुरेशी आणि रसूलबेग रोजभानी यांना या चोरांच्या चतुराईची चुकूनही चाहूल लागली नाही.दख्खन दरवाज्यावरच्या मराठ्यांनी अचूकपणे दिंडीदरवाजा उघडला. ही मराठी कुमक आणि रसद गडात अगदी सुखरूप पोहोचली. दख्खन दरवाजा बंद झाला. मोगली तोफा उडचत होत्या.
रात्र संपली,दिवस उगवला. मुरारबाजींना ही नवीन कुमक पाहून केवढा आनंद झाला असेल नाही? खास महाराजांनी गडाला पाठविलेली ही मदत.
अन् रात्र संपल्यावर दिवसाउजेेडी दाऊदखानला अन् रसूलबेगला बातमी लागली की,रात्रीच्या अंधारातून आपल्या समोरच्या झाडीतून मोठी थोरली कुमक मराठ्यांनी गडावर नेली.दोघेही सरदार थक्क झाले,सुन्न झाले, गप्प झाले,गप्पच राहिले.कारण ही आपली फजिती आपणच कशी कुणाला सांगायची! अन् जर गडाच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या दिलेरखानाला ही फजिती समजली,तर तो संतापेल. अन् काय करील याचा नेम नाही, हे ते दोघे ओळखून होते.म्हणून गप्पच बसले.तो दिवस मावळला, रात्र झाली. तोफा उडतच होत्या. अस्वलानं शिकावं तशा.
गडाच्या बाले किल्ल्यावर याच रात्री एक भयंकर धाडसी कवटाळ किल्लेदाराने योजले. त्याने चाळीस मावळ्यांना सज्ज केले.मोगलांच्या उडणाऱ्या तोफांवरच झडप घालण्यासाठी केवढे धाडस! या चाळीसातील काहींच्या जवळ टोकदार मोठे लोखंडी खिळे आणि हातोडे होते. ही सशस्त्र टोळी दख्खन दरवाजाच्या दिंडीतून गुपचूप बाहेर पडली.झाडीतून लपत छपत तोफांकडे उतरू लागली. या छाप्याची कल्पनाही दाऊद आणि रसूल यांना आली नाही.या मराठ्यांनी एकदम अंधारातून येऊन मोगलांवर झडप घातली. मोगलांचा गोंधळच उडाला. झटापट पेटली.हातोडेवाल्या मावळ्यांनी गर्दी करून तोफांच्या छिदात खिळे घातले. घाव घातले. तोफा क्षणात निकामी झाल्या. काम झाले.मावळे जितक्या झपाट्याने आले तितक्याच झपाट्याने झाडीत पसार झाले. चार-सहा मावळे मारले गेले.
दख्खनची दिंडी उघडली गेली. मावळे किल्ल्यात शिरले.दिंडी बंद झाली.खानाच्या तोफा ठार बंद पडल्या होत्या. काळगडावर मावळी कुमक पोहोचली.आज आपल्या तोफा बेकाम होऊन निपचित पडल्या. तोबा!
या गोष्टी लपून राहिल्या नाहीत. दिलेरखानाला त्या समजल्या.तो आगीसारखा भडकला.संतापून तो या बंद पडलेल्या तोफांच्याकडे दौडत आला. दाऊद आणि रसूल गुन्हेगारासारखे मान खाली घालून उभे होते.संतापलेल्या दिलेरखानाने आपला क्रोध शब्दात उधळावयास सुरुवात केली.अत्यंत कठोर भाषेत दाऊद आणि रसूल यांची तो अब्रू सोलून काढीत होता.थांबतच नव्हता.तो त्यांना बेवफादार, हरामखोर, नालायक, बत्तमीज अशा घनघोर शिव्यांनी झोडपीत होता. कितीतरी वेळ.
त्यांनी दोघांनी तरी किती ऐकून घ्यायचे ? जबाबदारी त्या दोघांवर होती हे खरं.पण आता त्याबद्दल किती शिव्या घालायच्या? अखेर एक क्षण असा आला की , दाऊदखान कुरेशीने मान वर करून दिलेरखानालाच जाब विचारला,तुमच्याच छावणीत दारूगोळ्याचा सारा साठा भडकून उडाला,कोण जबाबदार होतं त्याला?आम्ही? की तुम्ही?’
दाऊदचा सवाल मुँहतोड होता. अन् मग! दाऊदखान आणि रसूल बेग यांची लांब दुसऱ्या छावणीत बदली करण्यात आली! ते परिंड्याच्या किल्ल्याकडे रवाना झाले.पुरंदर झुंजतच होता. दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.
दिलेरखान हा मोगल सेनापती पठाण होता.पण् त्याची निष्ठा सर्वस्वी औरंगजेबाच्या पायाशी होती.वास्तविक पठाण जमातीचे मोगलांशी वैरच होते.कारण दिल्लीची सत्ता पठाण वंशाकडून खेचून घेऊन बाबर हा दिल्लीचा पहिला मोगल बादशाह झाला होता.पण हे आसले काही नाते लक्षातही न घेता दिलेरखान त्यांची सेवा करीत होता.इतकी तळमळून अहोरात्र शाही चाकरी करणारा माणूस राजपुतांच्याशिवाय इतर कोणत्याही समुदायात मिळणे अशक्य होते.औरंगजेबाच्या मनात संशयाने कायमचेच कुरुप केलेले होते.त्याचा कोणावरही विश्वास नसायचा.
स्वत:च्या मुलामुलींवर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. मिर्झाराजांवरही नव्हता.पण त्याचे राजपुती कर्तृत्त्व,शौर्य आणि मोगल बादशाहीबद्दलची स्वामीनिष्ठा औरंगजेब जाणून होता.म्हणूनच मिर्झाराजांवर त्याने महाराष्ट्रावरील मोहिम सोपविली. पण तिथेही संशयी स्वभाव व्यक्त झालाच.मिर्झा व सीवा दोघेही राजपूत.ते कदाचित आपल्या- विरुद्ध एक झाले तर?आपली नुकसानी झाली तर?म्हणून मिर्झावर सावध लक्ष ठेवण्यासाठीच औरंगजेबाने दिलेरला या मोहिमेत बरोबर दिले होते.हे मिर्झाराजाने ओळखले होते.म्हणूनच अनेकदा मतभेद आणि अवमान गिळून टाकून मिर्झा दिलेरच्या कलाकलाने वागत होता.पुरंदरच्या वेढ्यात मिर्झा आणि दिलेर यांचे अनेकदा खटके उडाले.मिर्झाने शक्य तेवढे स्वत:ला सावरीत सावरीत अलगद पडते घेतलेले दिसून येते. दिलेरखान पुरंदरसाठी अत्यंत नेटाने हट्टाला पेटला होता.त्याचे एकूण या मोहिमेतील वर्तन पाहिले की,दुसऱ्या महायुद्धातील एखाद्या जनरल पॅटनची किंबहुना हिटलरचीच आठवण होते. पण येथे दिलेरच्या बाबतीत ते वर्तन कौतुकाचेच वाटते.
पुरंदरच्या पूर्व पहाडावर असलेल्या ‘काला बुरुजावर‘ दिलेरने मोठ्या कष्टाने तोफा डागल्या व मारा सुरू केला.पण मराठ्यांच्या या बुरुजावर असलेल्या दारुच्या साठ्याचा स्फोट झाला अन् बुरुज उडाला. ऐंशी मराठे हशम एका रकमेने उडाले.ठार झाले.दिलेरला हे अचानक यश मिळाले.आनंदाच्या भरात किंचितही न रेंगाळता त्याने ताबडतोब या खिंडारावर आपल्या फौजेचा एल्गार केला. स्वत: दिलेरखान उभा होता. त्याला वाटले की,आपण किल्ल्यात घुसणार,नक्की आत्ताच किल्ला मिळणार.पण मराठे तेवढेच अक्राळविक्राळ होते.काळा बुरुज उडालेला,ऐंशी मराठी माणसं चिंधड्या झालेली समोर दिसूनही मराठे कचरले नाहीत.त्यांनी मागेच असलेल्या सफेद बुरुजावरून या मोगली हल्ल्यावर जबर प्रतिहल्ला चढविला.तो एवढा तिखट होता की,हल्ला करणारे मोगल माघारा पळत सुटले.ही मराठी जिद्द पाहून दिलेर चकीत झाला.पण तेवढाच भयंकर संतापला.अन् मग तो संताप पुरंदरावर त्याने आगीसारखा ओकावयास सुरुवात केली.काळ सरकत होता. दिवस उलटत होते.पण दिलेरच्या काळजात निराशेची रात्र होतच नव्हती.गडही मिळतच नव्हता. तेव्हा दिलेरने आपल्या सेनाधिकारी सरदारांसमोर संतापून आपली पगडी घालणार नाही.असा हा हट्टी,संतापी दिलेर, औरंगजेबाला असे सरदार मिळाले पण ते त्याला सांभाळता आले नाहीत.माणसं कशी सांभाळावीत,त्यासाठी आपल्या काळजाचा तुकडा कापून द्यावा लागला तरी तो द्यावाच हे शिकावं शिवाजीराजांकडून औरंगजेबाला हे कसं जमणार?अखेरपर्यंत पुरंदरगड दिलेरला जिंकून घेता आलाच नाही.गडावर मराठी सैन्याला नेता नव्हता.मुरार बाजी ठार झाले होते.तरीही पुरंदर झुंजतच होता.नेता नसतानाही एक दिलाने,एक मनाने आणि एक निष्ठेने अशी मरणाच्या तोंडावर उभे राहून झुंजणारी माणसं स्वराज्याला महाराजांनी घडविली.खऱ्या अर्थानं पुरंदरावर यावेळी लोकशाही होती.खऱ्या अर्थानं लोकशाही यशस्वी होते ती अशीच.आपसांत क्षुद्र,स्वार्थी भांडणे भांडून नव्हे!
आमच्या लोकशाहीचे दर्शन लोकसभेत आणि विधानसभेत आपल्याला नेहमीच घडते. आपण पावन होऊन जातो.दिलेर आणि मिर्झाराजे हे दोघेही औरंगजेबाकरीता आणि मोगली तख्ताकरीता जिवाचं रान करीत होते.या दोघांच्याही आयुष्याची अखेर कशी झाली? हताश आणि दु:खमय.याच मिर्झाराजाला औरंगजेबाने उदयराज मुन्शी या, मिर्झाराजाच्याच नोकराकडून विष घालून पुढे (दि. ११ जुलै १६६७ ) बुऱ्हाणपूर येथे मारले. आणि दिलेरचं काय झालं? आयुष्यभर त्याने औरंगजेबाची जीव उगाळून सेवा केली.पुढे संभाजीराजांच्या विरुद्ध मांडलेल्या युद्धात दिलेर असाच लढत होता.मराठे हरत नव्हते. मोगलांना यश मिळत नव्हते. चिडलेल्या औरंगजेबाने दिलेरलाच दोष दिला. ‘तुमच्याच अंगचोरपणामुळे आपण हार खातो आहोत‘ असा आरोप औरंगजेबाने घेतला. (इ.स. १६८५ ) त्यावेळी दिलेरनं मान खाली घातली.त्याला काय यातना झाल्या असतील त्या त्यालाच ठाऊक.आयुष्यभर ज्याची सेवा केली,तो आपल्याला अंगचोर म्हणतोय.
दिलेरने आपल्या तंबूत एकांती विष पिऊन आत्महत्या केली.हे पाहिल्यावर आठवावेत शिवाजीराजे.त्यांचे कैसे बोलणे होते? कैसे चालणे होते? त्यांची सलगी देणे कैसे असे? तानाजी, कान्होजी जेधे,जिवा महाला, बाजी प्रभू,दौलतखान,बाळ प्रभू चिटणीस,येसबा दाभाडे,धाराऊ गाडे,हिरोजी फर्जद अन् असेच कितीतरी हिरे आणि हिरकण्या महाराजांच्या हृदयातच जाऊन बसलेल्या दिसतात.प्रेम ही एक अलौकिक शक्ती आहे.ती नेत्यांनी अन् अनुयायांनीही कधी विसरू नये.तिचं दर्शन घडावं.प्रदर्शन करू नये.स्वार्थी व्यत्यय कामामध्ये येऊ नयेत.यशाचे प्रत्यय यावेत.खरे प्रेम अबोलच असते.
ऐसी कळवळ्याची जाती, लाभाविण करिती प्रिती.
शिवकाल म्हणजे ठायी ठायी या प्रेमाचा प्रत्यय. एक दिव्य,तेवढेच दाहक तेज…
अफझलखानची स्वारी तशीच शाहिस्तेखानाची आणि सिद्दी जौहरचीही स्वारी अशा स्वाऱ्या अफाट बळानिशी शत्रूपक्षांनी स्वराज्यावर केल्या की,स्वराज्य शिवाजीराजांच्या आणि जागृत झालेल्या मराठी जनतेच्या सकट पूर्ण नेस्तनाबूत करावे असा निर्धारच होता,पण तो कमीतकमी बळ असूनही शिवाजीराजांनी पूर्ण उधळून लावला.साडेतीनशे वर्ष मरगळून गुलामगिरीत पडलेल्या मराठ्यांनी हा चमत्कार कसा काय घडवून आणला? हा चमत्कार महाराष्ट्र धर्म नावाच्या एका अद्भूत तत्त्वज्ञानाने घडवून आणला.ही गोष्ट शिवशत्रूंना ओळखता आली नाही.
आत्ताही मिर्झाराजा आणि दिलेरखान यांच्या स्वारीचा प्रारंभ मिर्झाराजांनी लक्षचंडी होमाने आणि कोटी लिंगार्चन व्रताने केला.अफझलखानाने तुळजाभवनीवर घाव घालताना काढलेले उद्गार इतिहासाला ज्ञात आहेत.त्याने देवीला सवाल केला होता म्हणे की, ‘बताओ तेरी करामत! बताओ तेरी अजमत!‘ करामत म्हणजे पराक्रम आणि अजमत म्हणजे चमत्कार.या दोन्हीचाही प्रत्यय अफझलखानाला आला.त्याचा पूर्ण नाश मराठ्यांनी केला.त्याला प्रत्यय आला.पण महाराष्ट्र धर्माचे वर्म आणि मर्म उमगले नाही.
पण आता दिलेर,मिर्झाराजा यांच्या या अफाट मोहिमेत ते मर्म आणि वर्म निश्चितपणे मिर्झाराजांच्या थोडेफार लक्षात आले.अनुभवाने मिर्झाराजांना दिसून आले की,हे मराठी वादळ स्वाथीर् लुटारुंचे नाही.यांच्या पाठीमागे उदात्त स्वातंत्र्याचा, सद्धर्माचा आणि सुसंस्कृतीचा विवेक आहे, हट्ट आहे.आपण मात्र कोणा एका धर्मवेड्या बादशाहाचे सेवक आहोत.त्याची शाबासकी मिळवून त्याच्या दरबारात मोठ्यातला मोठा सरदार होण्याची आपली धडपड आहे.आपले लक्षचंडी यज्ञ आणि कोटिलिंगार्चने पुण्य मिळवण्यासाठी नाहीत.या मराठ्यांची घरेदारे आणि खेडीपाडी आपण बेचिराख करीत सुटली आहोत,तरीही हे मराठे वाकायला तयार नाहीत.हे सारे मिर्झाराजांना प्रत्यक्ष अनुभवावयास मिळत होते.पण तरीही ते आपले राजपुती इमान पाळीत होते.दिलेरखान या इमानदार राजपुताचा मत्सरच करीत होता.खानाला मिर्झाराजांच्या प्रामाणिक निष्ठेबद्दल सतत संशयच वाटत होता.हे मिर्झाराजांच्याही लक्षात आलेले होते.तो दिलेरला सांभाळीत सांभाळीत विचार करीत होता की,औरंगजेबाची सेवा,माझा स्वत:चा फायदा आणि या थोर विचारांच्या शिवाजीराजाचेही जमेल तेवढे कल्याण आपण कसे करू ?
पुरंदरचा वेढा अतिशय त्वेषाने दिलेरने चालू ठेवला होता.तिकडे सिंहगडालाही असाच हलकल्लोळ चालू होता.दोन महिने उलटून गेले तरीही हे दोन्हीही गड वाकलेले नव्हते. मराठी खेडीपाडी जळत होती. तरीही मराठी जनता नमण्याची चिन्हेही दिसत नव्हती. दिलेरसारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अक्षरश: अहोरात्र पुरंदरला धडका देत होता.
या पुरंदर युद्धात एक महान महाराष्ट्रधर्माचे ब्रीद प्रखर तेजाने प्रकट झाले. दि. १ एप्रिल १६६५ पासून अहोरात्र दीड महिना पुरंदरगड मेरू पर्वतासारखा या अग्निमंथनात घुसळून निघत होता.गडाचे नेतृत्त्व मुरारप्रभू बाजीप्रभू नाडकर उर्फ देशपांडे या सरदारी तलवारीच्या एखाद्या योध्यासारखे होते.एकूण हा पुरंदरचा भयानक संग्राम आणि मुरार बाजी देशपांडे याचे नेतृत्त्व सविस्तर बिनचूक लिहायला प्रतिभा हवी, ‘चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड‘ लिहिणाऱ्या अल्फ्रेड टेनिसनची वा राम गणेश गडकऱ्यांचीच.
पुरंदराभोवती युद्धतांडव तर चालूच होते.एके दिवशी ( बहुदा दि. १६ मे १६६५ ) या मुरार बाजीच्या मनात एक धाडसी विचार आला.ते धाडस भयंकरच होते.गडावरून सुमारे सहाशे योद्धे सांगाती घेऊन उत्तरेच्या बाजूनने एकदम मोगलांवर अन् खुद्द दिलेरखानवरच तुटून पडायचे,अगदी कडेलोटासारखे, असा हा विचार होता.हा विचार की अविचार? विचारपूर्वक अविचार.एकच वर्षापूवीर् सिंहगडाभोवती मोचेर् लावून बसलेल्या जसवंतसिंह या मोगली राजपूत सरदारावर सिंहगडच्या मराठी किल्लेदारानं अवघ्या काहीशे मावळ्यांच्यानिशी असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढविला होता.तो पूर्ण यशस्वी झाला होता.मार खाऊन जसवंतसिंह आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती.अगदी तसाच हल्ला करण्याचा विचार आता मुरार बाजीच्या मनात आला होता.तो या जोहारास सिद्ध झाला.त्याने एकदम दिलेरखानाच्याच रोखाने गडावरून खाली झेप घेतली. भयंकर कल्लोळ उडाला.वीज कोसळावी तसा दिलेर तर थक्कच झाला.तो आवेश अफलातूनच होता.सहाशे मराठे प्रचंड मोगली दलावर तुटून पडले होते.दिलेरखानाने या हल्ल्यावर आपलाही मोगली हल्ला तेवढ्याच त्वेषाने चढवला.
मुरार बाजीचे या आगीतील शौर्यतांडव पाहून खान त्याही स्थितीत विस्त्रित झाला.खुश झाला.त्याने मुरारवरील मोगली हल्ला स्वत:च हुकूम देऊन हटविला,थांबविला.तो निथळता मुरार खानासमोर काही अंतरावर झुंजत होता,तो थांबला. दिलेरखानाने त्याला मोठ्याने म्हटले, ‘अय बहाद्दूर,तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुँआ हूँ। तुम हमारे साथ चलो। हम तुम्हारी शान रखेंगे! ‘
हे उद्गार ऐकून मुरारबाजी उलट भयंकरच संतापला.हा खान मला फितुरी शिकवतोय.याचाच त्याला भयंकर संताप आला.मुरार बाजीने त्याच संतापात जबाब दिला. ‘मी शिवाजीराजाचा शिपाई.तुझा कौल घेतो की काय ?’
आणि मुरार बाजी दिलेरच्या रोखाने तुटून पडला.पुन्हा युद्ध उसळले.खानाने बाण सोडून मुरार बाजीला ठारही केले.एक महान तेज सूर्यतेजात मिसळले गेले.
हे तेज म्हणजेच महाराष्ट्र धर्माचे तेज.मराठ्यांचा शिवकालीन इतिहास म्हणजे याच तेजाचा आविष्कार. राजकारण आणि रणांगण विवेकी असावे
मुरारबाजी देशपांडे यांचे मरण हा तुमच्या आमच्या पुढील एक सवाल नाही का? का जगायचं ? कसंतरीच जगायचं का? अय् किल्लेदार,तुझ्या राजाला सोडून तू आमच्याकडे ये.तुला इथे सर्व काही मिळेल. ये,हे आवाहन शत्रू करतो आहे आणि मुरार बाजी जबाब देतोय राजनिष्ठेचा. स्वराज्यनिष्ठेचा अन् मग मुरार बाजी शत्रूकडून ठार मारला जातो आहे.या मुरार बाजीचा संसार तरी कोणचा होता? त्याच्या सुखाच्या कल्पना तरी कोणच्या होत्या ?
आमचे संसार आज नेमके कसे आहेत?आमच्या सुखाच्या कल्पना तरी कोणत्या आहेत ? टेबलाखालून नोटांचे गठ्ठे घेणं हा आमचा विजय.त्यावर जगणं हा आमचा विजयोत्सव.अन् आमच्या नेत्यांच्या घोषणा आणि आश्वासनं अशी की आपला भारत लवकरच जगातील महासत्तांच्या रांगेत उभा राहील.
पटतं का हे? शक्य आहे का हे ?
मुरार बाजी पुरंदरावर मारला गेला.पण मिर्झाराजा जयसिंहाच्या स्वराज्यदहनाच्या कार्यक्रमात होरपळत असलेल्या मराठी माणसांची एकेक एकेक नि:शब्द आहुती स्वराज्याचं आणि महाराष्ट्र धर्माचं बळ वाढवतच होती.त्या शिवकाळात अगदी निश्चित मराठी स्वराज्यही केवळ दक्षिणेकडील नव्हे,तर संपूर्ण जगातीलच महासत्ता होती. इराणच्या शाह अब्बास बादशाहनं औरंगजेबाला पत्र लिहून म्हटलं होतंच ना की, 'तुम्ही कसले ‘ आलमगीर‘? जगाचे बादशाह ? तो लहानसा शिवाजीराजा तुमच्याने आवरला जात नाही. त्याला आवरून दाखवा.
इथेच जागतिक पातळीवर आमच्या राष्ट्राचं रूप आणि स्थान व्यक्त झालं. हे रूप आणि स्थान व्यक्त केलं अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांनी.अगदी अठरापगड सामान्य नागरिकांनी.एक असामान्य इतिहास याच सामान्यांनी घडविला. शिवाजीराजा आणि त्याचं हिंदवी स्वराज्य पार बुडवून टाकायला आलेले लाखालाखांचे सरदार मराठ्यांनी फुंकरून उडवले.
डोळ्यसमोर घडत असलेला पुरंदरचा संग्राम मिर्झाराजांना गदगदा हलवत होता.आपल्या आणि शिवाजीराजांच्या जगण्यातला फरक दाखवत होता.मिर्झाराजांच्या जागे होण्यालाही तरीही मर्यादा होतीच. त्यांचा मोगली धिंगाणा थांबलेला नव्हता.
पुरंदरही अजून लढतच होता.येक मुरारबाजी पडीले म्हणोन काय जाहले?आम्ही हिम्मत धरोन भांडतो.असे म्हणत गडावरचे मराठे अजूनही लढतच होते.नेता पडला तरीही झुंजत राहण्याची शिकवण महाराजांनी महाराष्ट्राला दिली.पुढच्या काळात तानाजी सिंहगडावर पडला तरीही मराठ्यांनी गड जिंकलाच. सेनापती प्रतापराव गुजर पडले तरीही मराठ्यांनी आक्रमक बहलोलखानाचा पराभव केलाच. पुढे तर शिवाजी महाराजच मरण पावले तरीही मराठ्यांनी औरंगजेबाचा २५ वर्षे झुंजून पूर्ण पराभव केलाच.शिवाजी महाराजांनी इतिहासाचा नवा अध्याय सुरू केला.तोपर्यंत आमचा इतिहास म्हणजे,राजा किंवा सेनापती पडला की पराभव झाला नसला तरीही पळून जाणे, असा होता.पण इथे इतिहासच बदलला.प्रत्येकाने म्हणजे सैनिकाने आणि नागरिकानेही आपापले काम चोख करावे, राज्य राखावे असा इतिहास घडू लागला.घडला म्हणूनच शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतरही शिवाजीनंतर कोण आणि शिवाजीनंतर काय असा प्रश्नच निर्माण झाला नाही.
ही केवळ कोणाला तरी उगीच कोपरखळी देण्याची माझी भावना नाही. ती वृत्तीच नाही. इतिहासानेच सिद्ध झालेले हे अमृताचे एक आचमन आहे.
केव्हा चालून जायचे,केव्हा थांबायचे,अन् गरजच पडली तर केव्हा माघार घ्यायची हे शिवचरित्रातून शिकावे. मिर्झाराजा जयसिंह आणि दिलेरखान यांच्या या अघोरी आक्रमणाला तीन महिने पुण्याभोवतीच्या मावळ्यांनी खडतर झुंज दिली,फार सोसलं. एरवी आयुष्यभर अत्यंत पवित्र आणि धर्मनिष्ठ जीवन जगणारा मिर्झाराजा इथे स्वराज्याविरुद्ध राक्षसासारखा कठोर बनला होता.जनता सोसत होती.सैनिक झुंजत होते.पण महाराजही व्याकुळ मनाने विचार करीत होते की,हे किती सोसायचं माझ्या माणसांनी? गेली २० वर्षे माझी माणसं सतत झुंजताहेत, सोसताहेत.विश्रांती नाही.आता आपणच चार पावलं माघार घेऊ या.म्हणून महाराजांनी मोगलांशी तह करायचा विचार केला आणि पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूरजवळ स्वत: महाराज मिर्झाराजांना भेटावयास गेले. तह झाला. स्वराज्यातील २३ किल्ले आणि भोवतीचा प्रदेश महाराजांनी मोगलांस द्यावा हा महत्त्वाचा मुद्दा तहात होता.तो मिर्झाराजांनी (आणि दिल्लीहून औरंगजेबानेही) मान्य केला. इतरही दोन कलमे होती.हा तह महाराजांनी अतिशय सावधपणे केला.आम्ही माणसं तहात नेहमी हरतो.गमावतो तर खूपच.पण काहीवेळा तर युद्ध जिंकूनही तहात सर्वस्व गमावतो. हे येथे घडले नाही.
एक गोष्ट प्रकर्षाने या एकूण लढ्यात दिसून आली.मिर्झाराजा दिलेर संपूर्ण स्वराज्य जिंकून घेऊन,शिवाजीराजाला समूळ नष्ट करण्यासाठी आले होते.तो त्यांचा सर्वस्वी हट्ट होता.पण तीनच महिन्यात मराठ्यांनी दिलेला संघर्ष पाहिल्यानंतर फक्त २३ किल्ल्यांवर समाधान मानण्याचा विचार या दोघांना मुकाट्याने करावा लागला.यातच नेतृत्त्वाचे आणि अनुयायांचे बळ व्यक्त झाले.हा शिवशाहीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ठरला. NIL NIL NIL NIL NIL NIL
No comments:
Post a Comment